पोलिसांचे आयुष्य आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर मांडले गेले. मराठीतच म्हणायचे तर ‘दे दणादण’, ’माझा छकुला’, ‘पछाडलेला’, ’पोलीस लाईन’, ’शेंटीमेंटल’, ’मुंबईचा फौजदार’ किंवा मग सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांचे गाजलेले चित्रपट असो, त्यातही त्यांनी मनाला भिडणारा हवालदार कायम साकारला. असे हे ज्यावेळी कलाकार पोलिसांची वर्दी अंगावर चढवतात, त्यावेळी त्यांच्या मनातल्या भावना नेमक्या काय असतात, हे आगामी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर काही कलाकारांशी संवाद साधून जाणून घ्यायचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेला हा प्रयत्न...
खाकी वर्दी अंगावर चढवली की, आत्मविश्वास द्विगुणित होतो!
चित्रपटात ठरावीक पात्रं साकारताना कलाकार त्या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत जाऊन विचार करायला लागतो. ज्यावेळी एखादा कलाकार पोलिसांची भूमिका साकारत असतो, त्यावेळी त्यांना जबाबदारीची जाणीव ही क्षणोक्षणी होते. याबद्दल अभिनेते मंगेश देसाई म्हणतात, “आपण कोणामुळे बिनधास्त जगू शकतो आणि राहू शकतो, तर ते आहेत पोलीस. पोलिसांची भूमिका साकारण्यापूर्वी आणि भूमिका साकारल्यानंतर माझं पोलिसांबद्दलच मत बदललं आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, त्या खाकी वर्दीत ताकद आहे. ती वर्दी अंगावर चढवताच एक वेगळाच आत्मविश्वास येतो आणि जबाबदारी वाटते. जर का त्या भूमिकेपुरती वर्दी चढवल्यावर आम्हाला देशभावना अधिक जाणवत असेल, तर खर्या पोलिसांना किती जबाबदारीची जाणीव असेल, हे लक्षात येते; तर मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ पोलिसांवरील चित्रपट गाजवणारे दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे म्हणतात की, “खाकी वर्दी ज्यावेळी मी अंगावर चढवली, त्याक्षणी मी खर्या आयुष्यातच पोलीस झालो आहे, अशा भावना माझ्या मनात आल्या आणि त्या फार सुखद भावना होत्या.” महिला पोलिसाची उत्कृष्ट भूमिका साकारणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते की, “पोलीस अधिकार्यांची भूमिका मी दोन वेळा साकारली आणि दोन्ही वेळेस मला ती भूमिका फार महत्त्वाची वाटली. ती खाकी वर्दी अंगावर चढवल्यानंतर ते पद किती महत्त्वाची असते आणि ती कमवण्यासाठी किती कष्ट लागतात, त्याची जाणीव झाली.”
पोलिसांबद्दल वक्तव्य विचारपूर्वक करावे
मंगेश देसाई म्हणतात की, “अनेकवेळा आपण सहजरित्या एखाद्या पोलीस अधिकार्यांबद्दल वक्तव्य करून जातो. पण, आपण हे लक्षात घेत नाही की, त्यांच्यावर किती जबाबदारी असते आणि सामान्य माणसांशी कोणतेही रक्ताचे नाते नसतानाही, त्यांनी सर्वांची जबाबदारी उचलण्याचे स्वतःहून ठरवले असते. ज्यावेळी ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत ‘पीआय’ची भूमिका साकारण्यास सुरुवात केली, त्यावेळी मला हे समजले, ही सहजपणे पोलिसांबद्दल एखादे वक्तव्य करणे आणि त्यांच्या जागी उभे राहून ती कामगिरी करणे, यात खूप धाडस लागते.” तर मुक्ता म्हणते की, “ज्यावेळी विनोदी चित्रीकरण पोलिसांवर केले जाते, त्यावेळी असे वाटते की, विनोदी अंगाने त्यांचे काम दाखवणे योग्य नाही आहे.”
पोलिसांनी दिलेली दाद स्मरणात राहिली...
‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत पोलिसांची भूमिका साकारल्यामुळे मंगेश देसाईंना अनेक लोकं ओळखायला लागली. याबद्दलचा किस्सा सांगताना देसाई म्हणतात की, “ज्यावेळी मी प्रवास करत असतो किंवा कुठेही कार्यक्रमाला जातो, तर तिथे मला लोकं विचारतात की, तुम्ही पोलीस खात्यात काम करता का? एकदा मी नेपाळहून मुंबईला परत येत होतो. तिथे विमानतळावर माझी झडती न घेताच मला पुढे पाठवलं, तर मी त्या रक्षकाला विचारलं की, माझी झडती का नाही घेतली. त्यावर ते अतिशय नम्रपणे मला म्हणाले की, ‘तुम्ही तर आमच्याच खात्यातले आहात, तर ही पोलिसांची भूमिका केल्यामुळे मला मिळालेली दाद खरंच कायम स्मरणात राहणारी आहे.”
अनेकवेळा आपण छोट्या-मोठ्या तक्रारी घेऊन पोलीस चौकीत जातो. यावरून एक किस्सा आठवत मुक्ता म्हणाली की, “माझ्या घराखालून माझी गाडी चोरीला गेली होती आणि त्याची तक्रार करण्यासाठी मी पोलीस चौकीत गेले. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले की, लोकं अगदी क्षुल्लक कारणासाठीदेखील पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी येतात. त्यांच्या खात्याचे ते काम नसले, तरीही त्यांच्याकडे येऊन मदत मागतात आणि पोलीस कधीच त्यांच्या मदतीसाठी नकार देत नाहीत.”
‘इन्सपेक्टर महेश जाधव’ ही भूमिका अजरामर करणारे महेश कोठारे वर्दीतल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणतात की, “पोलिसांसाठी कोणताही कार्यक्रम आयोजित केला, तर त्या कार्यक्रमाला मी आवर्जून जातो. एकदा अशाच एका कार्यक्रमाला गेलो असता मला खर्या जीवनातील ‘इन्सपेक्टर महेश जाधव’ भेटले आणि मला फार आनंद वाटला. पोलिसांची ती खाकी वर्दी परिधान केल्यानंतर ऊर्जा अंगात संचारायची. माझ्या प्रत्येक चित्रपटात प्रामाणिक आणि भ्रष्टाचारापासून दूर असलेलेच पोलीस मी दाखवले. कारण, मला त्यांच्याप्रती फार आदर आहे आणि मला माझ्या प्रत्येक चित्रपटातून तो पोलिसांपर्यंत पोहोचवायचा होता.”
पोलिसांबद्दल आदर हवाच...
“सैनिक, पोलीस यांच्यामुळेच आपण चिंतामुक्त होऊन जीवन जगू शकतो. त्यामुळे वर्दीतील प्रत्येक अधिकार्यांचा आदर केलाच पाहिजे,” असे यानिमित्ताने मंगेश देसाई विशेषत्वाने अधोरेखित करतात. तसेच पोलिसांची वर्दी घातल्यामुळे त्यांच्या अडचणी त्यांच्या जवळून जाणून घेता आल्या. याबद्दल मुक्ता म्हणाली, ’‘एक कलाकार म्हणून आम्ही नाट्यगृह अस्वच्छ आहेत, अशी तक्रार करतो, तर प्रामुख्याने ज्या महिला पोलीस आहेत, त्यांना तर आपली ड्युटी पूर्ण करण्यासाठी अस्वच्छतेचा सामना केवळ वर्दीचा मान राखण्यासाठी करावा लागतो. उदरनिर्वाहासाठी जरी पोलीस काम करत असले, तरी सामाजिक जबाबदारी पोलिसांवर अधिक असते.” तर मंगेश देसाई म्हणाले की, “आपल्यासारखं पोलिसांनीही कुटुंब आहे. पण, त्यांना हवी तेव्हा रजा घेता येत नाही, सणासुदीच्या दिवशी कुटुंबासोबत नेहमीच साजरा करता येत नाही. कारण, त्यांनी तो पेशा स्वीकारला आहे. पण, माझं कायमच लोकांना सांगणं आहे की, पोलीस हे तुमचे नोकर नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना किंवा वागताना आदराने आणि नम्रपणे वागा. कारण, आपल्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी स्वखुशीने स्वीकारली आहे. त्यांच्याबद्दल फार नकारात्मक वक्तव्य करू नका.”
रसिका शिंदे-पॉल