२८ मे रोजी सावरकर जयंतीनिमित्त हजारो सावरकरभक्त दादरमध्ये एकवटणार

२८ मे रोजी सावरकर जयंतीला पर्यटन विभागाच्या पुढाकारातून भव्य पदयात्रेचे आयोजन

    24-May-2023
Total Views |
dadar rally On the occasion of V D Savarkar Jayanti

मुंबई
: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी 'वीरभूमी परिक्रमा'अंतर्गत 'सावरकर विचार जागरण सप्ताहा'चे आयोजन दि. २१ मे ते २८ मे दरम्यान करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी दि. २८ मे रोजी दादर, मुंबई येथे भव्य पदयात्रा व प्रकाशोत्सवाचे आयोजन पर्यटन विभाग, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुंबई व लगतच्या महानगरांतील हजारो सावरकरभक्तांची शक्ती दादरमध्ये एकवटणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आदींसह मुंबई व लगतच्या महानगरांतील राष्ट्रीय विचारधारेच्या संस्था-संघटना, सांस्कृतिक-धार्मिक संस्था-संघटना, शैक्षणिक संस्था, नागरिक-कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे. या अभिनव उपक्रमामध्ये दि. २८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता दादर पश्चिम येथील सावरकर सदन येथून स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक अशी भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे.

त्यानंतर स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील स्वा. सावरकरांच्या पुतळ्याजवळ पदयात्रा येऊन स्वा. सावरकरांना मानवंदना देईल व त्यानंतर स्वा. सावरकर लिखित 'जयोस्तुते' गीताच्या सामूहिक गायनाने पदयात्रेची सांगता होईल. या पदयात्रेला यशस्वी करण्याकरिता पर्यटन विभागासह स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, विवेक व्यासपीठ व इतर अनेक राष्ट्रीय विचाराच्या संस्था-संघटनांतर्फे गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणात जनसंपर्क सुरु आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार यांसह अनेक ठिकाणांहून मोठ्या संख्येने या पदयात्रेकरिता राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत.

दादर पश्चिम येथे बालमोहन विद्यामंदिराजवळ असलेले सावरकर सदन येथे स्वा. सावरकरांचे त्यांच्या अखेरच्या काळात अनेक वर्षे वास्तव्य होते. तसेच, याच ठिकाणी त्यांनी आत्मार्पण केले होते. त्यामुळे या ऐतिहासिक स्थानाचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्व मोठे आहे. तसेच, स्वा. सावरकरांच्या विचार व जीवनकार्याचा प्रचार-प्रसारासाठी दादर पश्चिम येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यामुळे या दोन स्थानांदरम्यानची ही पदयात्रा अनेकार्थाने महत्वाची आहे. तसेच, वीरभूमी परिक्रमा व सावरकर विचार जागरण सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाद्वारे प्रथमच स्वा. सावरकरांच्या जीवनकार्याचा इतक्या व्यापक स्तरावर गौरव होत असून याकरिता महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग व विवेक व्यासपीठाने पुढाकार घेतला आहे. यामुळे राज्यातील वातावरण 'सावरकरमय' होत असल्याने राज्यातील तमाम सावरकरप्रेमी नागरिक, संस्था-संघटनांमध्ये उत्साहाचे व आनंदाची भावना व्यक्त होत आहे.

अशा या अभिनव व भव्य पदयात्रेस मुंबई व लगतच्या प्रदेशातील अधिकाधिक नागरिक, कार्यकर्ते, युवा, महिला-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व सावरकरप्रेमी नागरिकांची शक्ती दाखवत साऱ्या समाजास सकारात्मक संदेश द्यावा, असे आवाहन पर्यटन विभाग, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

'वीरभूमी परिक्रमा' व 'सावरकर विचार जागरण सप्ताह'

स्वा. सावरकरांचे वास्तव्य लाभलेल्या महाराष्ट्रातील ठिकाणांचे जसे की भगूर [सावरकरांचे जन्मस्थान], नाशिक, पुणे, सांगली, रत्नागिरी व मुंबई येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करत 'स्वा. सावरकर टुरिझम सर्किट' निर्मितीचा संकल्प राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकताच घोषित केला होता. तसेच, या सर्किटला 'वीरभूमी परिक्रमा' असे नावही देण्यात आले होते. यासह सावरकरांच्या जीवनकार्याला अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता पर्यटन विभाग व विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून 'विचार जागरण सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत दि. २१ मे ते २८ मे दरम्यान येथे उल्लेखलेल्या सर्व ठिकाणी मिळून तब्बल ४० हून अधिक कार्यक्रम संपन्न होत असून त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.