लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेल्यानंतर १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत अभूतपूर्व घटना घडली... आज १ ऑगस्ट २०२२, टिळकांची १०२ वी पुण्यतिथी... त्यानिमित्त दै.'मुंबई तरुण भारत'च्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन या लेखमालेतील विशेष लेख...
लखनौ करारानंतर चिरोल वर खटला भरण्यासाठी टिळक विलायतेला गेले, प्रचंड खटपट करून चिरोलवर खटला भरण्यासाठी आपण जात असलो तरी निकाल आपल्या बाजूने लागेलच याबद्दल टिळकांना फारशी खात्री नव्हतीच. झालेही तसेच, निकाल त्यांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे पदरचे सुमारे दोन अडीच लाख रुपये गेले होते, इकडे भारतात लगेचच हा खर्च भरून काढण्यासाठी फंड गोळा करायला लोकांनी सुरुवात केली. टिळक भारतात परत येईपर्यंत जमलेला निधी होता, तब्बल अडीच लाखांचा...!
टिळक भारतात परत आले आणि त्याच दिवशी मुंबईत शांतारामच्या चाळीत त्यांच्या स्वागतासाठी भव्य सभा भरवण्यात आली. कामगार संघटनानी त्यांचा सत्कार केला, गिरणी कामगारांनी त्यांना मानपत्रे दिली. शिवाय पुण्यात तर त्यांचे स्वागत हत्ती आणि घोडे यांनी सजवलेल्या ताफ्याने करण्यात आले. पुणे नगरपालिकेच्या वतीने त्याना जाहीर मानपत्र अर्पण करण्यात आले. एखाद्या नगरपालिकेने एखाद्या नेत्याला जाहिरपणे मानपत्र अर्पंण करावे ही ब्रिटीशांच्या राज्यातल्या परतंत्र भारतात पहिलीच वेळ होती हे महत्वाचे.
टिळकांसाठी भारतात जितका निधी स्वयंस्फुर्तीने लोकांनी गोळा केला तेवढा निधी इतर कुणासाठी क्वचितच जमा झाला असेल. टिळकांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्राने एकत्रित जमवून त्यांना दिलेली थैली थोडीथोडकी नव्हती. तब्बल एक लाख रुपयांची रक्कम होती ती. नंतर थोड्याच काळात ही चिरोल केसच्या नुकसानभरपाईची रक्कम ! भारतातून परतल्यानंतर हा पैसा स्वीकारताना टिळक म्हणाले होते, "लोकहो, हा निधी गोळा करून आपण मला खरोखर विकत घेतले आहे.”
टिळक आता फक्त बळवंतराव, किंवा बाळ गंगाधर राहिले नव्हते, ते तर लोकमान्य झाले होतेच पण त्याहीपलीकडे ते लोकांचे “टिळक महाराज” झाले होते. महिला, पुरुष, तरूण पोरं, म्हातारे बापडे सगळेच जण स्वतःला विसरून टिळक जातील तिथे लाखोनी गर्दी करत होते. बायका आपापली तान्ही पोरे टिळकांच्या पायावर ठेवत, अमृतसर कॉंग्रेसच्या वेळी तर टिळकांच्या नुसत्या दर्शनासाठी लाखो स्त्रिया मंडपाच्या बाहेर उभ्या होत्या. टिळक महाराजांचा नुसता पदस्पर्श सुद्धा एखाद्या संजीवनी बुटीसारखा वाटायला लागला होता. हे झाले सामन्यांचे, यावेळी साहित्यिक कवीं, नाटककारांचे काय चालले होते ? टिळक महाराजांच्या शौर्यकथा घराघरातल्या आया आपल्या लेकरांना सांगू लागल्या, भारतीय कवींच्या प्रतिभेला देशभक्तीचे पाझर फुटले, टिळकप्रेमाने नटलेल्या बहारदार कविता लिहिल्या जाऊ लागल्या, वीररसाने भारलेली नाटके रचली रचून रंगभूमीवर त्याचे प्रयोग हाऊसफुल झाले.
नाटक कंपन्यानाही टिळकांची नावे दिली जाण्याचा काळ होता तो, किर्लोस्कर नाटक कंपनीतून वेगळे झाल्यानंतर चिंतामणराव कोल्हटकर, दिनानाथ मंगेशकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी एकत्र मिळून “बलवंत’ संगीत नाटक मंडळी ही संस्था काढली तेंव्हा तिला दिलेलं 'बलवंत' हे नाव टिळकांना समोर ठेवूनच सुचलेलं होतं. एका गावात टिळक आले आहे ते कळल्यानंतर चालू नाटक अर्ध्यावर टाकून सगळे लोक नाट्यगृह सोडून निघाले, ते थेट टिळकांच्या दर्शनाला ! नाटक थांबवावे लागले. इतकं पुरेसं नाही म्हणून टिळकांच्या विचारांचं आणि कृतींचं दर्शन व्हावं या हेतूने त्या काळात दत्तोपंत पटवर्धन यांच्यासारखी कीर्तनकार मंडळीनी टिळक चरित्राची आख्याने लावायला सुरुवात केली होती. ज्या कीर्तनाच्या संमेलनांना जाऊन टिळकांनी स्वतःच राष्ट्रीय कीर्तनाचा नवा पायंडा आपल्या देशात पाडला होता, त्याच कीर्तन माध्यमाचा महत्वाचा विषय टिळक स्वत;च होऊन बसले होते.
गोपाळ विनायक उर्फ आप्पासाहेब भोंडे हे नाव आजच्या तरुणांच्या गावीही नसेल, पण ते आपल्याकडचे आद्य नकलाकार. त्या काळामध्ये भोंडे हे पुढाऱ्यांच्या हुबेहूब नकला करत. टिळकांची नक्कल करण्यात तर त्यांचा हातखंडा होता, किंवा टिळकांची नक्कल करण्यामुळेच ते महाराष्ट्रामध्ये नकलाकार म्हणून प्रसिद्ध झाले असे म्हणायला हरकत नाही. कथा, कविता, कीर्तन, नाटक, नकला या सगळ्याचा विषय टिळक महाराज झाला असतांना चित्रपट कसा मागे राहिलं. भारतात चित्रपट कला रुजण्याचा तो काळ. अशातच चित्रमहर्षी बाबुराव पेंटर पुढे सरसावले, आणि त्यांनी मुंबईला कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनात लोकमान्यांचे चित्रीकरण केले. पुरेसे भांडवल हाताशी नसतानाही तानीबाई कागलकर यांनी पैसा पुरवला आणि ही फिल्म पूर्ण झाली. लोकमान्य टिळक भाषण करताहेत या प्रसंगाची ती फिल्म होती. पुढे बाबुराव पेंटर यांनी सैरंध्री या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केली, पुण्यात त्याच्या प्रयोगाला खुद्द टिळक आले, आणि त्यांनी सुवर्णपदक देऊन बाबूरावांचा सन्मान केला. या सगळ्या कलांचा वापर राष्ट्र्जागृतीकडे करून घेण्याचा टिळकांचा मानस होता हे वेगळे सांगायला नको.
टिळक लोकमान्यतेच्या शिखरावर होते. विलायतेच्या टिळकांच्या प्रवासाने त्यांना दिलेला क्षीण फक्त शारीरिक नव्हता, मानसिकही होता. भारतात परतल्यावर सरकारला सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर टिळकांनी “प्रतियोगी सहकारीता” हा शब्द मोठ्या कल्पकतेने आणि खुबीने वापरला. गांधींचे आणि टिळकांचे यावरून वाजलेही. तरी शौकत अली, महमंद आली टिळकांच्या सोबत होते. शौकत आली तर ‘टिळक हे माझे राजकीय गुरु आहेत’ असे जाहीरपणे सांगत. अजमेरच्या ख्वाजा दर्ग्यात मुसलमान बंधूनी टिळक महाराज की जय असा जयजयकार करून टिळकांचा सत्कार मोठ्या गर्दीने केला होता. बऱ्याच खटपटीनंतर आतातरी हिंदू मुसलमान एकत्रित ब्रिटीशांशी लढतील इथवर टिळकांनी तयारी करून ठेवली होती. शिवाय ब्राह्मणेतर चळवळीला स्वराज्याच्या मार्गाला लावण्यात विठ्ठल रामजी शिंदे टिळकांच्या बाजूने उभे होते.
राजकारण ऐन रंगात आले होते, मतभेदाचे मळभही दूर झाले होते. या सगळ्यात ताईमहाराज प्रकरण तेवढे टिळकांची पाठ सोडेना, केळकरांच्या म्हणण्याप्रमाणे टिळकांचे रक्त आटवणाराच प्रकार होता तो. त्याचा शेवटचा निकाल लावण्यासाठी पुण्याहुन निघाले, निघतांना त्यांना अंमळ ताप होताच पण अंगाच्या तपापेक्षा ताईमहाराज प्रकरणाने त्यांच्या डोक्याला जो ताप दिला होता त्याचे निवारण महत्वाचे होते, त्यासाठी त्यांची धडपड चालली होती, यावेळी मात्र दैवही अनुकूल होते, टिळकांच्या प्रयत्नाला यश आले, सत्व उजळले, ताईमहाराज प्रकरणाचा निकाल टिळकांच्या बाजूने लागला, टिळक मोकळे झाले, डोक्याचा एक ताप गेला, पण अंगाचा मात्र वाढला.
२० जुलै रोजी दिवान चमनलाल टिळकांना भेटायला आले तेंव्हाही त्यांची तब्येत बरी नव्हतीच. चमनलालांच्या आग्रहावरून टिळक त्यांच्या गाडीत बसले. मोटार मात्र वरून उघडी होती, हवापालटाने टिळकांना बरे वाटेल या आशेने चमनलाल यांनी टिळकांना कुलाब्याची सफर घडवून आणली खरी, झाले मात्र उलटेच, रात्रीतून टिळकांचा ताप जास्तीच वाढला. न्युमोनियाची लक्षणे स्पष्ट दिसू लागली. तापाने १०४ डिग्री गाठली. हळूहळू टिळकांची शुद्ध हरपू लागली. तरीही इतक्यात आपल्याला काही होत नाही असेच टिळक आपल्या बोलण्यातून दाखवत होते, पुण्याहून मुलगा श्रीधर आला टिळक त्यालाही म्हणाले, मला काही झाले नाही, तुला मात्र मुंबई पाहण्याची भारी हौस त्यासाठी आलास माझ्या आजाराचे निमित्त करून” आल्यागेलेल्या लोकांसोबत ते हास्यविनोद करत. भेटायला आलेल्या आपल्या मुलींना पाहून टिळक म्हणाले, ‘पुन्हा सगळ्या जमल्या का तुम्ही ? तुम्हाला उठसूट माहेरी यायची सवयच आहे !’ त्यांचे भाचे धोंडोपंतांना तर टिळक म्हणालेच, काळजी नको करुस धोंडू, अजुन पाचेक वर्ष मी मरत नाही”
कौटुंबिक बाबीत टिळकांचा जीव आजीबात अडकलेला नव्हता, टिळक तर आसुसले होते ब्रिटीशांशी नव्या दमाने दोन हात करण्यासाठी, त्यांची स्वातंत्र्याकांक्षा अत्यंत प्रबळ होती. त्यांचे नातू ग. वि. केतकर यांनी लिहिल्याप्रमाणे टिळक जे बोलत होते ते देशाच्या राजकारणाचेच होते, आपल्या पारतंत्र्याचीच काळजी त्यांना लागली होती, स्वातंत्र्याची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांची शेवटची काही वाक्ये ग. वि. केतकरांनी आठवणीत दिली आहेत, – २८ जुलैला रात्री टिळक म्हणाले, “१८१८ साली असे झाले, परवा हे १९१८ साल आले, A hundred years history आम्ही असे दीन झालो.
” पेशवाई गेली आणि इंग्रज आले, गोऱ्यांच्या जुलमी पारतंत्र्याचे हे शल्य टिळकांच्या हृदयात अत्यंत खोलवर रुतून बसले होते, अखेरच्या क्षणीही मनाला खेद वाटत होता तो ह्या पारतंत्र्याचा. पण यावर आपण मात करेल असा दुर्दम्य आशावाद याच महापुरुषाने भारतीयांच्या मनात जागवला होता, २९ जुलै च्या रात्री १ वाजता एखाद्या व्याख्यानाच्या थाटात बोलावे तसे टिळक उसळले आणि म्हणाले, “ माझी अशी खात्री आहे, आणि आपणही असा विश्वास बाळगा की हिंदुस्थानला स्वराज्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही” लगेचच २ वाजता अस्पष्टपणे ते बोलले, ‘आपण व जनता यांनी जे परिश्रम केले त्याबद्दल मी आपले आभार मानतो.’ यापुढचे टिळकांचे बोलणे फारसे नीट आणि स्पष्ट ऐकू येईल असे राहिले नाही.
टिळकांच्या आजाराची बातमी एव्हाना भारतभर पसरली, टिळकांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून लोक प्रार्थना करू लागले, मुंबईच्या ज्या सरदारगृहात टिळक होते त्यांच्या मालकांनी पूजाअर्चा सुरु केल्या, टिळकांना बरे वाटावे म्हणून लोकांनी उस्फुर्तपाने दानधर्म सुरु केला, देवपूजा, रुद्राभिषेक, शांतीपाठ, जप यांतून मिलेल्या राक्षांच्या पुड्या सरदारगृहाच्या दिशेने निघाल्या. ज्योतीष्यांकडून कुंडल्या पाहून उपाय सांगायला सुरुवात झाली. अच्युत बळवंत कोल्हटकर तर टिळकांच्या ताब्येतीची बातमी लोकांपर्यंत पोहोन्चावी म्हणून त्यांच्या “संदेश” वर्तमानत्राचा संध्याकाळचा अंक काढायला लागले.गेल्या दोन दिवसात मुंबईच्या तार खात्याला टिळकांची तब्येत कळवणे याशिवाय दुसरे कामच राहिले नव्हते.
मुंबईतले सगळेच्या सगळे डॉक्टर गेल्या आठेक दिवसांपासून आपापली रुग्णालये बंद ठेवून चोवीस तास टिळकांच्या तब्ब्येतीसाठी सरदारगृहात मुक्काम ठोकून होते. टिळक मात्र फारसा प्रतिसाद देत नव्हते, माणूस ओळखत नव्हते, केंव्हा काय होईल सांगता येत नव्हते, ३१ जुलैची ती रात्र होती. टिळक कासावीस झले होते, त्यांच्या मणक्यातील पातळ पदार्थ काढला तर बरे वाटेल या आशेने तो द्रवही काढून टाकण्यात आला, दादासाहेब खापर्डेनी आल्याच्या रसातून हेमगर्भाची मात्रा चाटवली, पण सारेच व्यर्थ, हळूहळू सगळ्यांचाच धीर सुटत चालला होता, सरदारगृहात मंत्रपठण करणाऱ्या ब्रह्मवृंदाने दर्भाचे उच्चासन तयार केले, त्यावर या कर्मयोगेश्वराला ठेवण्यात आले, मंत्रपठण टिपेला पोहोंचले असता एकदम शांतता झाली, दादासाहेब खापर्ड्यानी तर हंबरडाचं फोडला, आपले दोन्ही हात उंचावर ते मोठ्याने ओरडले, “दुसरे रामदास स्वामी गेले !”
भाबड्या आशेने म्हणा किंवा कशानेही, या सगळ्या धावपळीत ३० तारखेला कुणीतरी टिळकांना जागं करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या गीतेचे रहस्य टिळकांना पुरेपूर उमगले होते त्या गीताकर्त्याचा म्हणजेच श्रीकृष्णाचा फोटो कुणीतरी टिळकांच्यासमोर धरला, आणि हे काय आहे ? म्हणून त्यांना विचारले, टिळकांना ग्लानी आलेली होती, बराच वेळ निरखून पाहिल्यावर टिळक म्हणाले, “हे श्रीकृष्णाचे चित्र आहे, त्याच्या चरित्राचे सर्वांनी अनुकरण करावे. नंतर लगेचच त्यांनी हात जोडले, आणि त्या ग्लानीत टिळक श्लोक म्हणू लागले, तो, साक्षात गीतेचा श्लोक होता, श्लोक म्हणून संपला आणि टिळकांचे डोळेच झाकले गेले, हात खाली पडले, प्रकृती क्षीण झाली, टिळकांचे बोलणेच बंद झाले, नंतरचे अखेरचे दोन दिवस टिळक काहीही बोलले नाहीत, त्यांच्या मुखातून निघालेला शेवटाचा श्लोक होता श्रीकृष्णाचा, या कर्मयोगेश्वराच्या, लोकमान्याच्या मुखातून निघालेले शेवटचे शब्द होते,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ||
......हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते, अखेर मध्यरात्र उलटली, बारा वाजून गेले, १ ऑगस्ट १९२० चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली, त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत असा एकही माणूस त्या जनसमुदायात अढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोप पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार ? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये." टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेंचे ! ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.
टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली, याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली, मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले, तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्यात जनसमुदायाला सांगितली. खेळ आपसूकच बंद झाला, ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला.
पण पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला, टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा असा संन्नाटा थिएटरभर पसरला होता, या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात, “पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले, जमिनीला कान लावून ऐकणार्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे !" रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते, लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती.
शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते, ते सांगतात, ”प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांणा बघितल्यावर त्याला भडभडून येत असे, एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शावापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला, एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे ?” असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.
“श्री शिवाजी महाराजांचा मृत्यु, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या, अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे.” अशा शब्दात या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्ह्टकरांनी ! टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली, आणि पुणेकरांची मनेच हादरली, रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले, नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली. टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती, इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा, कारण पुणे ही टिळकांची कर्मभूमी !
पण मुंबईकरही हट्टाला पेटले होते, त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे ‘लोकमान्य’ झालेले होते. तात्यासाहेब केळकर निघाले, पुण्याला आले, त्यांना केसरीचा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच केसरीच्या आधीच्या अंकातुन लोकांना सांगण्यात आले होते, "लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही, लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील," आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहिती होतं, की पुढच्या केसरीच्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी वाचायला लागणार म्हणून ! केसरीचा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला. ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली, त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच्या सगळ्या कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही, टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.
आणि....इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरु झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू ,मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता. आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता, टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघागर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, "टिळक महाराज की जय !”
लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते, टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते, घराच्या गच्चीवरून फुलांची वृष्टी होत होती, माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते, खापर्डे गांधी हेही लोकांच्या जथ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते. या महानिर्वाणयात्रेत पस्तीस चाळीस वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता, लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती, तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय अशी अवस्था होती, हे पाहून तिचा मुलगा म्हणाला, "आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक !"
धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते, रस्त्यावर चिखल झाला होता, माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती, मुंबईच्या पारशी व्यापार्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती, त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले तोच त्या समुद्रकिनार्यावरील लोकसागराला अचानक भारती आली, साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चीतेकडे धावत सुटले. लोकमान्यांना अग्निडाग दिला, आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले आता आपण तरी जागून काय करायचे असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चीतेमध्ये उडीच घेतली.
तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला, त्याला दवाखान्यात गेले,पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला. संध्याकाळचे सात वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य याची डोळा अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, “आम्ही त्या रात्री दहापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यँत पायावर उभेच होतो, अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले, हृदयात काय होत होते हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूंच्या धारा कोणत्या, हे समजेना. अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना."
जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली, मृत्युलेख लिहिले पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरतर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते, त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता, या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते, “लोकमान्य ! तुम्हाला आता कुठे पाहू ? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू ? तुम्हाला कुठे शोधू ? तुम्हाला कुठे धुंडाळू ? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते.
लोकमान्य ! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल ? कुठे दिसाल ? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्या वरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य आमचे प्राण तुमच्या स्वाधीन ! आमचे मन तुमच्या स्वाधीन ! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन ! लोकमान्य आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात ! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू ? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू ? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य ! इतका सर्वव्यापी होता की त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती; या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी,तपस्वी; या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर पुरेपुर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी की रे लागते ! लोकमान्या ,तुझ्याशिवाय जीव तुटतो रे !
४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास ? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस ? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या अश्रूंच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस ? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस ? भारत देशाच्या कुलदीपक तिलका आम्हास असहाय्य दीन,अनाथ केलेस ? बोला, लोकमान्य बोला ! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा ?...कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्या बरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे ! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे ! लोकमान्य बाळ गंगाधर ! तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे, महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे ! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण तुमचीच निवड करतांना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले ?”
त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले, त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली, ती पुडी हृदयाशी लावली, काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते ते स्वतःच्या पायावर चालत, पण आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने. फुलांच्यामाळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या. केळकर लिहितात, “जातांना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले पण येतांना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जातांना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येतांना त्यांनी चिताभस्माचे रूप धरण केले होते. जातांना ते आपल्या पायांनी गेले, येतांना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जातांना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येतांना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जातांना ते वासनापूर्ण होते येतांना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जातांना ते लोकांविषयी बोलत होते, येतांना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जटा जटा त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले येतांना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला.”
ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना, पण यात वेगळे काहीच नाही असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात, "टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार ? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या ? कोणकोणते बेत गुढ स्वरूपात होते ? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या त्याचा शोध आता कसा लागणार ? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील ? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय ? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का ? शिकंदर, किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय ? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात.
पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडिने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे हे एका आयुष्याला अशक्यच आहे ! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल पण पराक्रमी कधीही असणार नाही, आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण ! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार ? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही तो याच कारणामुळे होय."
“टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर लोकमान्य ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. लोकमान्य या शब्दाने यापुढील हिंदुस्थानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये.” केळरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्ष झाले, टिळक जाऊन १०० वर्ष झाले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतीशाताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या “सिंहगर्जनेचे सिंहावलोकन ! “लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक” हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल तोवर टिकून राहो, लोकमान्यांच्या विचारांना कृतीशीलतेची पावले लाभोत, आणि टिळकांचे विचार “चिरंजीव” होवोत या चिमण्या प्रार्थनेसह ‘सिंहगर्जनेचे सिंहावलोकन’ इथेच पुरे करतो.....!
- पार्थ बावस्कर
( लेखक, व्याख्याते, इतिहास अभ्यासक )
( मुंबई तरुण भारत मधील, सिंहगर्जनेचे सिंहावलोकन या लेखमालेतील अखेरचा विशेष लेख )