भविष्यातील विश्वगुरू भारत!

    19-Jun-2021
Total Views | 434

india_1  H x W:


कोरोना महामारी हे भारतावरचे आणि एकूणच जगावरचे संकट असले, तरी या संकटावर मात करणार्‍या भारताची ओळख एक शक्तिमान राष्ट्र म्हणून जगाला झाली असून, इथून पुढे भारताची वाटचाल विश्वगुरू होण्याच्या दिशेने होणार आहे.


अमेरिकेत ११ सप्टेंबर, २००१ रोजी ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर हल्ला झाला आणि जगाला दहशतवादाची ओळख झाली. कोरोनाचे उगमस्थान चीन असल्याचे अनेक पुरावे समोर आल्याने चीनच्या क्रूर आणि कपटी चेहर्‍याचीही आता जगाला ओळख झाली. कोरोना संसर्गाचा कहर उडालेला असताना भारताने जगातील ७० देशांना सुमारे साडेसहा कोटी लसी पुरविल्याने विश्वबंधुत्व जपणारा देश अशी भारताची ओळख जगाला झाली. याशिवाय बांगलादेश, श्रीलंका, मालदीव इत्यादी शेजारी देशांना भारताने ‘पीपीई किट’, औषधी इत्यादींचा पुरवठा केला. कोरोनावर लस शोधण्यासाठी सारे जग प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना भारताने अल्पावधीतच लस शोधून काढल्याने सारे जग चकीत झाले असून, ‘क्वाड युनियन’ने (अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत सदस्य असलेली संघटना) भारताला १०० कोटी लसी तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

भारताच्या भविष्यकालीन वाटचालीचे चित्र रेखाटण्यापूर्वी चीनबद्दल जाणून घेणे आवश्यक ठरते. चीन हा साम्यवादी विचारसरणीचा देश मानला जातो. पण, १९८०च्या दशकात चीनने भांडवलशाहीचा स्वीकार केला. २० वर्षांची दीर्घकालीन विकास योजना आखून कृषी, उद्योग व संरक्षणक्षेत्रात चमकदार कामगिरी केली. ३० वर्षांपूर्वी चीनमध्ये अन्य देशातील कॉर्पोरेट कंपनीचे एकही युनिट नव्हते, तर आज त्यांची संख्या नऊ लाख झालेली आहे. जगाच्या एकूण ‘जीडीपी’त चीनचा हिस्सा आठ टक्के होता, तो आज २२ टक्के झाला आहे. स्वतःची शक्ती वाढल्याची जाणीव होताच चीनने विस्तारवादी भूमिका घेतली. तैवानची कुरापत काढणे, भारताच्या गलवान खोर्‍यात उपद्रव वाढविणे इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील. आज जागतिक व्यापार अतिशय गुंतागुंतीचा झाला आहे. एकमेकांची मदत घेतल्याखेरीज जगातील कोणताही देश उत्पादनात नैपुण्य प्राप्त करू शकणार नाही, अशी स्थिती आलेली आहे.



भारतामधील इलेक्ट्रॉनिक्स व औषधी व्यवसाय हा पूर्णपणे चीनमधून आयात होणार्‍या कच्च्या मालावर अवलंबून आहे. त्यामुळे चीनशी व्यापारसंबंध एकदम तोडणे भारताला आजमितीला शक्य नाही. मागील वर्षी भारतीय व्यापारी संघाने चिनी राख्या खरेदी न करण्याचा निर्णय घेतला त्याचा चीनला ४५० कोटी रुपयांचा फटका बसला. भारतीय नागरिकांनी राखी, पणती, दिव्यांची माळ, पतंग, मुलांची खेळणी, गणपती मूर्ती यांसारखे जिन्नस देशातील किंवा गावातील उत्पादकांकडून खरेदी केले, तर भारतीय उद्योगांना बळकटी प्राप्त होण्यासाठी मदत होईल यात शंका नाही. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची उलाढाल १,५०० कोटी डॉलर्सची आहे. त्यातील विदेशी उत्पादनांचा वाटा १,३०० कोटी डॉलर्स असून भारतीय नागरिकांनी भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करणे हाच त्याला एकमेव पर्याय आहे.भारताची बलस्थाने कोणती आहेत याचा आढावा घेणे आवश्यक ठरते. भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. परकीय चलनाचे भांडार असा विचार केला तर भारत जगात चौथ्या स्थानी आहे. उद्योगासाठी किती सुविधा आहेत किंवा सोपेपणा आहे, याची क्रमवारी करण्याची जागतिक पद्धत आहे. मागील काही वर्षांत भारताची प्रगती १४२ वरून ६७ क्रमांकावर झाली आहे. सैन्यदलाची संख्या, संरक्षण सिद्धता, कृषी उत्पादन, रेल्वे व रस्त्यांचे जाळे इत्यादी अनेक निकष लावले तर भारताची वाटचाल अधिक उदात्त, उन्नत स्थान प्राप्त करण्याच्या दिशेने होत असल्याचे दिसते.

जागतिक व्यापारात स्वतःचे स्थान बळकट करायचे तर उत्पादन हे न्यूनतम लागतीमध्ये असावे लागते, म्हणजे नफा वाढू शकतो. जसे कापूस उत्पादनात भारत अग्रेसर असला तरी तयार कपड्यांची जी जागतिक बाजारपेठ आहे त्यात चीन, बांगलादेश यांचा वरचष्मा आहे. निष्कर्ष असा की, ‘स्किल डेव्हलपमेंट’मध्ये मोठी झेप घेणे भारताला आवश्यक ठरते. कच्च्या मालाचा पुरवठा कमी किमतीत होण्यासाठी मालवाहतूक व्यवस्था सुलभ व गतिमान होणे आवश्यक ठरते. त्या अनुषंगाने औद्योगिक संकुल-इंटस्ट्रियल क्लस्टर याचे महत्त्व अधोरेखित होते.विश्वसनीयता हा व्यापारात यशस्वी होण्याचा मंत्र आहे. कोरोना महामारीत ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स’ची मागणी वाढतच असल्याने चीनने त्याच्या किमती तिप्पट वाढविल्या असे दिसून आले. चीनशी तुलना करू बघता भारताने काही देशांना मानवतावादी भूमिकेतून मोफत औषधीपुरवठा केला याची नोंद जगाने घेतली आहे.


कोरोना महामारीचे सावट येत्या काही दिवसांत निघून जाईल यात शंका नाही. कोरोना महामारीमुळे वैद्यकक्षेत्रात प्रगती करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. संशोधन, औषधी व अनुषंगिक सामग्रीची निर्मिती, निर्मितीची कालमर्यादा आणि सेवा अशा अनेक बाबतीत भारताचे नाव जागतिक स्तरावर आदराने घेतले जाते. देशाचे सरासरी वय मोजण्याच्या पद्धतीनुसार भारताचे सरासरी वय ३५ तर चीनचे सरासरी वय ६० आहे. चीन देशाने तिसरे अपत्य होऊ देण्यास नुकतीच मंजुरी दिली, त्यामागे देशाचे सरासरी वय कमी करणे हेच कारण आहे. भारतातील युवाशक्ती हे भारताचे बलस्थान आहे. ‘ग्लोबल हेल्थ सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणजे आरोग्यविषयक जागतिक सुविधा देणार्‍या देशाची आवश्यकता निर्माण झाली आहे. भारत देश, भारतीय नागरिक बुद्धिमत्ता आणि सेवाभावी वृत्ती याचे प्रतीक आहेत. यापुढील आवश्यकता आहे ती कौशल्य विकासाची! कमी वेळेत, कमी किमतीत गरजेचे जिन्नस ग्राहकापर्यंत पोहोचविणे, असे आव्हान भारतासमोर आहे.

भारताने कोरोना प्रतिबंधक लस त्वरेने तयार केली. भारतीय लसीचा दर्जा जगाने मान्य केला. भारतातील लसीकरण मोहीम व त्याची गती पाहून सारे जग चकित झाले आहे. भारत सरकारचे ‘आत्मनिर्भर भारत’ हे धोरण म्हणजे जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. चीनसारखे देश सैन्यबळाच्या आधारे महासत्ता झाले. पण, भारतासारखा देश हा विश्वबंधुत्व जोपासणारा देश असल्याची ओळख या कोरोना महामारीच्या काळात जगाला झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक समित्यांवर भारताची निवड होणे हा त्याचाच भाग आहे. कोरोना कधी जाईल आणि कोरोनानंतर जग कसे असेल, याची चर्चा अनेकदा होत असते. कोरोना निश्चित जाईल यात शंका नाही. पण, आरोग्यविषयक समस्या येतच राहतील. अशा वेळी जगाला भारतासारख्या विश्वबंधुभाव जपणार्‍या देशाची आवश्यकता आहे. भारत देशाजवळ क्षमता आहे, पुरेसे मनुष्यबळ आहे, कणखर नेतृत्व आहे, कौशल्य विकासाची ऊर्मी आहे. त्यामुळे येत्या काळात भारत देश परम वैभवाचे स्थान प्राप्त करणार यात शंका नाही.


- हेमंत कद्रे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121