समर्थशिष्या वेणाबाई

    28-Oct-2021
Total Views | 166

vividha 2_1  H



काही आधुनिक लेखकांनी समर्थशिष्या वेणाबाईंच्या जीवनावर कादंबरी लेखन केले आहे. वेणाबाईंचे एकंदर आयुष्य, त्यांनी अनुभवलेले प्रसंग, मनाला चटका लावणारे आहेत. वेणाबाईंचे एकंदर जीवनचरित्र व वाङ्मय अभ्यासण्याजोगे आहे. बखरकारांनी श्री समर्थचरित्र सांगताना वेणाबाईंच्या कार्याचा उल्लेख केला आहे. णाबाई यांचा जन्म इ. स. १६२७ च्या सुमारास कोल्हापूर येथे देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.




लहानपणापासून वेणाबाई बुद्धिमान, हुशार, शांत स्वभावाच्या होत्या. त्या विरक्त वृत्तीच्या होत्या. वेणाबाईंचे वडील गोपजीपंत देशपांडे हे एक चारित्र्यसंपन्न गृहस्थ होते, असे गिरीधरस्वामींनी लिहिले आहे. ते विद्वान असून अनेक धार्मिक ग्रंथांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांनी वेणाबाईंना लिहिण्या-वाचण्यास शिकवले. त्यांच्याकडून वेणाबाईंना ‘अध्यात्म रामायण’ ग्रंथाचा परिचय झाला. तत्कालीन पद्धतीप्रमाणे बालपणीच वेणाबाईंचा विवाह झाला व त्या मिरजेला सासरी आल्या. त्या दहा वर्षांच्या होण्यापूर्वीच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. वेणाबाईंच्या सासुबाई स्वभावाने चांगल्या होत्या, म्हणून पती निधनानंतरही त्या तेथेच राहिल्या. फावल्या वेळात त्या ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ वाचत. एक दिवस समर्थ भिक्षेसाठी त्यांच्या घरी आले असता, ही लहान मुलगी मोठा ग्रंथ वाचत आहे, हे पाहून रामदासांना कौतुक वाटले. त्यांनी विचारले, “हा कोणता ग्रंथ आहे व तो तुम्ही समजून उमजून वाचता का?” वेणाबाई म्हणाल्या, “हा ‘एकनाथी भागवत’ ग्रंथ आहे. मी तो भक्तिभावाने वाचते, पण तो आचरणात कसा आणायचा हे कळत नाही.” तिच्या उत्तरातील चातुर्य पाहून समथर्र् हसले आणि ’जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत आशीर्वादासाठी हात उंचावत निघून गेले. समर्थांचे ते शब्द आणि रूप वेणाबाईंच्या मनात ठसले आणि हेच आपले गुरू, मार्गदर्शक व उद्धारकर्ते आहेत, हे तिने मनोमन ठरवले. पण, नंतर तिला स्वामींची भेट झाली नाही. पुढे काही काळानंतर त्या माहेरी कोल्हापूरला आल्यावर तिथे समर्थांची कीर्तने चालू आहेत, असे तिने ऐकले. आईवडिलांच्या परवानगीने ती रोज कीर्तनाला जाऊ लागली. एक दिवस समर्थांच्या पायावर डोके ठेवून तिने अनुग्रह मागितला. समर्थांनी ‘राममंत्रोपदेश’ दिला. कीर्तन संपल्यावर रोज ती रामदासांना आध्यात्मिक शंका विचारत असे. निंदकांना ते पाहावले नाही. टवाळखोर म्हणू लागले की, ही तरुण विधवा या बुवाच्या नादी लागली. या वाह्यात, वात्रट निंदकांनी गावभर ही बातमी पसरवली. लोक म्हणू लागले की, हिला कोणाचा धाक नाही. हिचे आईवडील हिला मारून का टाकत नाहीत? आईवडिलांनी वेणाबाईला घराबाहेर जाऊ नको म्हणून सांगितले, पण ती ऐकेना. सद्गुरुउपदेशाची गोडी तिला लागली होती. अखेरीस जननिंदा असह्य झाल्याने वेणाबाईंना तुपाबरोबर जालीम विष देण्यात आले. ते विष किती भयंकर परिणामकारक होते, याबद्दल आत्मारामबुवा लिहितात,



कराडप्रांतीचे विष महादारुण।
पोटीं प्रवेशता मोहरीप्रमाण।
पाणी न मागतां जाय प्राण।
ठाऊक असे बहुतेकां॥


हे जहाल विष पोटात गेल्यावर वेणाबाई तळमळत एका खोलीत पडल्या. त्यांनी समर्थांचा धावा केला. शेजार्‍यापाजार्‍यांना वेणाबाईला सर्पदंश झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, रामदास्वामी अचानक छडी हातात घेऊन तिथे आले. त्यांना कोणीही अडवले नाही. स्वामी वेणाबाईंच्या खोलीत गेले. हातातील छडी वेणाबाईंच्या अंगावरून फिरवून समर्थांनी तिचे विष उतरवले. उठून तिने समर्थचरण धरले. विष पोटात गेल्याने गौरवर्णाची वेणाबाई निळीकाळी झाली होती. ते पाहून समर्थ हसत हसत म्हणाले, “हे आता ठीक झाले. महंतांचे कष्ट सोसण्यास तुझी काया योग्य झाली.” कारण -


फिरावे लागते अरण्यांत।
सोसावे लागते उष्णशीत।
नाजुकपणाचे हे नव्हे कृत्य।
नीळ कवच घातले श्रीरामें।



त्या प्रसंगानंतर वेणाबाईंनी घर सोडले. समर्थांबरोबर त्या संप्रदायात सामील झाल्या. गुरू रामदासांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. आपल्या अंगच्या गुणांनी वेणाबाईंनी संप्रदायात मानाचे स्थान मिळवले होते. सर्व स्त्री शिष्यांत त्या एकट्या उत्तम कवयित्री होत्या. त्यांनी लिहिलेल्या, ‘संकेत रामायण’ व ‘सीतास्वयंवर’ या काव्यातील वर्णनशैली चित्तवेधक आहे. तसेच वेणाबाईंनी ‘कौल’, ‘रामगुहक संवाद’ ही काव्ये लिहिली. त्यांनी लिहिलेले काही अभंगही उपलब्ध आहेत. वेणाबाईंची भाषा घरगुती वळणाची व सहजरम्य आहे. ’सीता स्वयंवर’ या काव्यात वेणाबाईंनी तत्कालीन देशस्थ ब्राह्मणांच्या चालीरितीचे, लग्नविधीचे, सोहळ्याचे सुरेख वर्णन केले आहे. लग्नात कोणत्या प्रसंगी कोणती पक्वान्ने करावीत, वाढावीत याचे बारकाईने तपशील दिले आहेत. ल. रा. पांगारकर म्हणतात की, “तत्कालीन चालीरिती समजण्यासाठी या काव्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. वेणाबाईंचे काव्यकौशल्य आणि भाषेचा साज या ग्रंथातून व्यक्त झाला आहे. भक्ती आणि प्रेम वेणाबाईंच्या अंत:करणात ओसंडून वाहत असल्याने ते त्यांच्या काव्यात उतरले, यात नवल नाही.” शंकरराव देव म्हणतात, “वेणाबाईंनी आपली भक्तिप्रेमाची दृष्टी कुठेही ढळू दिली नाही.” ते योग्यच आहे. वेणाबाईंची हुशारी व पारमार्थिक अधिकार पाहून समर्थांनी स्त्री शिष्यांना मर्यादेत राहून बसून कीर्तन करावे लागे.


वेणाबाई वाचोनी कांहीं।
इतरा कन्येसी सभेसी
कीर्तनआज्ञा नाही।
एकासनी बैसोनी कीर्तन करणे पाही। प्रसंगानुसारे मयार्र्दे॥


संप्रदायात आल्यावर वेणाबाई समर्थसेवेत दाखल झाल्या व दिलेली सर्व कामे करत राहिल्या. समर्थांनी इ.स. 1655 मध्ये मिरजेला स्वतंत्र मठ स्थापन केला. वेणाबाईंच्या अंगची गुणवत्ता व पारमार्थिक अधिकार पाहून स्वामींनी वेणाबाईंची तेथे ‘मठाधिपती’ म्हणून नेमणूक केली. वेणाबाईंना ‘वेणास्वामी’ ही पदवी बहाल करण्यात आली. वेणाबाई महंत बनल्या. सर्वसाधारणपणे शिष्य व महंत यात फरक असा की, शिष्यांना दुसर्‍याला मंत्रोपदेश देण्याचा अधिकार नसे. शिष्य मठ चालवू शकत नसत. महंतांना मंत्रोपदेश देण्याचा व शिष्य करण्याचा अधिकार असे. महंतांनी दिलेली कामे शिष्यांना करावी लागत. महंतांना दुसरे महंत नेमून संप्रदाय वाढवण्याचा अधिकार असे.



महंते महंत करावे।
युक्तिबुद्धीने भरावें।
जाणते करून विखरावे।
नाना देशीं॥ (दा.११/१०/२५ )


मिरजच्या मठाचे ‘मठाधिपती’ या नात्याने हे सारे अधिकार वेणास्वामींना प्राप्त झाले, तरीही त्यांची नम्रता ढळली नाही अथवा अहंकार कधी त्यांना शिवला नाही. वेणाबाईंच्या शिष्य परिवारात अनेक स्त्रिया होत्या. बाईयाबाई, भीमाबाई, सकूबाई, मुधाबाई, बाकूबाई अशी कितीतरी नावे सांगता येतील. ‘समर्थ प्रताप’ हा समर्थांच्या चरित्रविषयक ग्रंथ लिहिणारे गिरिधरस्वामी हे वेणाबाईंच्या शिष्या बाईयाबाई यांचे शिष्य.वेणास्वामींना मिरजेच्या मठाचा कारभार उत्तम प्रकारे सांभाळून शिष्य संप्रदाय वाढवला. बखरीतील उल्लेखानुसार, बीडकर मंडळी वेणाबाईंच्या मिरजेतील शिष्यसंप्रदायात सामील झाली आणि त्यांच्याकडेही मठ करणेविशी आग्रह धरलं म्हणून तेथे वेगळा मठ स्थापन झाला. वेणास्वामींनी गिरमाजी गोसावी यास त्या मठावर संप्रदाय वाढवण्यासाठी पाठवले.




सर्वांनी सुखी असावे, असे वेणाबाईंना वाटे. त्या उत्तम संघटक होत्या. एका संंप्रदायातील वासुदेव कण्हेरीकर या विद्वान पंडिताने स्वतःची अक्कल चालवून वेगळा ‘त्रयोदशाक्षरी’ मंत्र तयार केला व तो आपला संप्रदाय करू लागला. परमार्थांत बिघडलेल्या या पंडिताला समर्थ म्हणाले, “भुललासी कुसंगे मनासाठी। सत्य गुरूधर्म अव्हेरून॥” आणि समर्थांनी त्यांना शिक्षा केली. वासुदेव बाबाला पश्चाताप झाला. पण, समर्थांपुढे जाण्याचे त्यांना धाडस होईना. एक दिवस वेणाबाईंचा अभंग ऐकून समर्थ म्हणाले, “मी प्रसन्न आहे. काय हवे ते माग.” वेणाबाई म्हणाल्या, “तुम्ही असता आमच्या सौख्याला काय उणे, पण केलेल्या चुकीबद्दल वासुदेवबाबांना पश्चाताप झाला आहे. त्यांना क्षमा करून त्यांचाही आपण उद्धार करावा, ही विनंती आहे.” समर्थांनी वेणाबाईंची विनंती मान्य करून तीर्थप्रसाद व बोध आणि समज देऊन वासुदेवशास्त्र्याला परत संप्रदायात घेतले. वेणाबाई मिरजेच्या मठात होत्या, तरी रामजन्मोत्सवाला त्या चाफळला जात. काही दिवस गडावर गुरूसहवासात राहत. जाताना बरोबर त्या उत्तम प्रतीचा तांदूळ घेऊन जात. वेणाबाई उत्तम स्वयंपाक करत. रामदासांना त्यांच्या हातचे जेवण आवडे. गडावर असेपर्यंत रामदासांचे जेवण त्या स्वतःच तयार करत. एक दिवस समर्थ वेणाबाईस म्हणाले की, “तुझ्या प्राकृत सीतास्वयंवर ग्रंथावर कीर्तन कर. ते आम्हाला ऐकायचे आहे.” चैत्र वद्य १४ शके १६००  (इ.स.१६७८ ) या दिवशी समर्थांसमोर वेणाबाईंनी अखेरचे कीर्तन केले. कीर्तनाला श्रोत्यांची गर्दी होती. कीर्तन संपूवन आरती झाल्यावर त्या समर्थांपाशी गेल्या. आपली वीणा समर्थांच्या हाती देऊन समर्थांना साष्टांग नमस्कार केला आणि तेथेच प्राण सोडला. समर्थांनी स्वतः तिचे कलेवर उचलले व शिष्यांकरवी सर्व विधान करवून प्रेताचे दहन केले. सज्जनगडावर तिची समाधी आहे. शेवटी वेणाबाई म्हणतात, हृदयी धरले गुरूचरण। प्राणांतीही विसंबेना॥ हे वाक्य त्यांनी खरे करून दाखवले.


- सुरेश जाखडी







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121