स्थलांतरित पक्ष्यांचे अभयारण्यात आगमन
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठ महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले नाशिकमधील नांदूर मधमेश्वर अभायरण्य पर्यटकांसाठी खुले होणार आहेत. २० नोव्हेंबरपासून अभयारण्याचे दार पर्यटकांसाठी खुले होईल. महत्त्वाचे म्हणजे अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात झाल्याने पर्यटक आणि पक्षीप्रेमींसाठी विशेष पर्वणी असणार आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यामधील गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर वसलेले नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य विविध पक्ष्यांच्या अधिवासामुळे समृद्ध आहे. १९०७ ते १९१३ च्या दरम्यान या संगमावर मोठा बंधारा बांधण्यात आला. गेल्या शतकभरात त्यामध्ये गाळ साचून पाणवनस्पतींची वाढ झाली. त्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांकरिता उत्कृष्ट अधिवास निर्माण झाला. हे स्थळ आता हजारो पक्ष्यांचे आश्रयस्थान बनले आहे. यंदा या अभयारण्याला आंतरराष्ट्रीय 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळाल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. कोरोनामुळे राज्यभर लागलेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, अनलाॅकच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबरपासून पर्यटक आणि पक्षीप्रेमींसाठी अभयारण्य खुले करणार असल्याची घोषणा वन विभागाने केली आहे.
हिवाळा सुरु झाल्यामुळे अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. अभयारण्यामधील वन अधिकारी आणि गाईड यांच्या माध्यमातून स्थलांतरित पक्ष्यांची नोंद करण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पट्ट कादंब, शाम कादंब, सुरय, थापट्या बदक, ब्राम्हणी बदक, सोनुला बदक (गढवाल), पाणलावा, तुतारी (सॅण्डपायपर), सामान्य क्रौंच यांसारखे स्थलांतरित पक्ष्यांचे थवे अभयारण्यात दाखल झाल्याची माहिती वनपाल अशोक काळे यांनी दिली. या कालवधीत अभयारण्य खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे पर्यटक खास करुन पक्षीप्रेमींना पक्षी दर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. २० नोव्हेंबरपासून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अभयारण्य पर्यटनासाठी खुले असेल. या कालावधीत पर्यटकांनी शासनाने आखून दिलेले कोव्हिड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहिले, असे काळे यांनी नमूद केले.
अभयारण्यास भेट देणाऱ्या व्यक्तींनी मास्क लावणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक असेल. पर्यटकांनी स्वत: सोबत सॅनीटायझर ठेवावे. ज्या पर्यटाकांचे तापमान ३८ अंश ते १०० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे आणि आॅक्सिजनची पातळी ९५ पेक्षा कमी असल्यास, त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - अनिल अंजनकर, वनसंरक्षक, वन्यजीव (नाशिक)