ज्या व्यक्तीच्या केवळ विचारांनी, कृतीने जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती निर्माण होते, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासातून किती आमूलाग्र बदल होत असेल, हे सांगायलाच नको. परमेश्वरालाही भेदाभेद मान्य नाही, असे वेद-पुराणांतील अनेक दाखले सर्व संतांनी दिले. समाजसुधारकांनी वर्षानुवर्षे प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर या कार्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला मिळालेला शाप आहे, असे वाटणार्या व्यक्तींपैकी एक अनंत हरी गद्रे यांनी उर्वरित आयुष्य अस्पृश्यता निवारणासाठी घालविले. मात्र, एवढ्यापुरते अनंतरावांचे कार्य मर्यादित नव्हते. पत्रकारिता, साहित्य, नाट्य, प्रकाशन, चित्रपट, जाहिरात या क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त असलेला हा मुलखावेगळा माणूस.
दि. 17 ऑक्टोबर 1880 रोजी कोकणातील देवरुख या गावी वडील हरी गद्रे यांच्या पहिल्या पत्नी मथुरा यांच्या पोटी जन्म झाला. अनंतरावांना दामोदर हा सख्खा, तर शिवराम हा सावत्र भाऊ, सावित्री आणि कमला या सावत्र बहिणी. दोन्ही भाऊ व त्यांच्या मुलांनी वडिलांनी सुरू केलेला व्यापार देशभर पसरविला. मात्र, अनंतरावांनी आर्थिक अडचणीतसुद्धा या व्यापार्याचा विचार केला नाही. देश-धर्मासाठी काहीतरी वेगळे करावे, हा ध्यास त्यांच्या मनात आधीपासूनच होता. बालपणापासून प्राप्त झालेले धार्मिक-सांस्कृतिक आचरण, संस्कृतप्रेम, स्पष्ट उच्चार, नाटकांची आवड, सचोटी, साधी राहणी, गरजूंना मदत करण्याची वृत्ती, निस्वार्थी प्रेमभावना या बीजरुपी संस्काराचे पुढे वटवृक्षात रुपांतर झाले. गावात सातवीपर्यंत शिक्षण घेऊन माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. दुर्दैवाने आजारपणामुळे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले नाही. शिक्षण सुरू असतानाच 1908 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी सत्यभामा नावाच्या मुलीशी अनंतरावांचे लग्न झाले. उदरनिर्वाहासाठी म्हणून अनंतराव अर्धवेळ इंग्रजी शिकवण्याची नोकरी व सोबत कीर्तन करू लागले. स्वतः रचलेली गद्य-पद्ययुक्त आख्याने त्यांनी बसवली होती. त्यांनी त्या काळात एक आख्यान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर निर्माण केले होते. प्रगल्भतेची चुणूक आणि समरसतेची दृष्टी यातून जाणवते. उक्ती आणि कृतीसमान असणार्यांपैकी अनंतराव.
अनंतरावांनी छोटेसे सुगंधालयाचे दुकान थाटले. त्या काळातील पुणे टिळकमय होते. पहिले महायुद्ध, भारतीय स्वातंत्र्ययुद्ध, महात्मा गांधी प्रभाव अशा संमिश्र घटनांचा हा काळ. राजद्रोहाचा कारावास भोगून टिळक 1914 रोजी पुण्यात आले. टिळकांसोबत काम करायची आंतरिक ओढ होतीच. टिळकांच्या कार्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने अच्युत कोल्हटकरांनी ’संदेश’ नावाचे वृत्तपत्र दि. 14 जानेवारी 1915 रोजी सुरू केले आणि अनंतराव वार्ताहर म्हणून काम करू लागले. अच्युतरावांच्या निमित्ताने अनंतरावांना पत्रकारितेच्या क्षेत्रात एक गुरूतुल्य व्यक्ती लाभली.
1917 मध्ये अनंतरांचे वडील श्रीहरीपंत व 1920 मध्ये लोकमान्य टिळक यांच्या निधनाने अनंतरावांच्या जीवनात अचानक पोकळी निर्माण झाली. त्यांनी मुंबई येथे स्थलांतर केले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी 1922 मध्ये सुरुवातीला काही वर्षे ‘मनोरंजन व प्रबोधनात्मक मौज’ व ‘नवे मौज’ असे साप्ताहिक सुरू केले. अजूनही ‘मौज’ दिवाळी अंक स्वरूपात प्रकाशित होतो. सोबतच नऊ नाटके लिहिली व सादरही केली. पुन्हा पत्रकारितेकडे वळून, 1933 मध्ये ‘निर्भीड’ नावाचे नवीन साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या ‘कुमारी’ या नाटकाने ‘हाऊसफुल्ल’ हा शब्द निर्माण केला. विक्रमी सलग 101 प्रयोग झाले. मित्र आचार्य अत्रे यांच्या ‘झेंडूची फुले’, ‘गीतगंगा’, न. चि. केळकर, दा. न. शिखरे, वि. स. खांडेकरांच्या कादंबर्याही त्यांनी प्रकाशित केल्या होत्या. आचार्य अत्रेंच्या ‘त्राटिका’ आणि ‘कवडीचुंबक’ नाटकात आणि ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटातही अनंतरावांनी एक छोटीशी भूमिका बजावली होती.
चित्रपट क्षेत्रातील नावलौकिकप्राप्त ‘मिनर्वाह मूव्हीटोन’चे मालक मोदी बंधूंची ओळख ही आर्थिक आधार देणारी ठरली. यांच्या चित्रपटांची जाहिरात अनंतराव करीत असत. पुढे जाऊन अनंतरावांनी पत्रकारिता, नाटक, प्रकाशन, हिंदू महासभा, जाहिरात हे सर्व सोडले. अस्पृश्यता निवारणाचा ध्यास घेतला. सोहराब मोदी शेवटपर्यंत त्यांना दरमहा पगार देत राहिले. मोदी यांनी अनंतरावांना आयुष्यभर साथ दिली. यात अनंतरावांचे निस्वार्थी चरित्र नक्कीच कारणीभूत आहे. त्यांनीदेखील मोदींविषयी कृतज्ञताभाव कायम ठेवला व आपल्या कार्याचे श्रेय देत राहिले.
फाळणीच्या, दंगलीच्या काळात मुलगा वसंत 15 दिवसांच्या आजारानंतर निधन पावला. पत्रकार म्हणून मरावे, ही माझी इच्छा मुलगा वसंत याने पूर्ण केलेली आहे. हिंदू महासभेचे कार्यकर्ते असणार्या अनंतरावांनी मुलाच्या मृत्यूच्या दुसर्या दिवशीही सात-आठ महिला आणि मुलींची संकटग्रस्त भागातून सुटका केली होती. ते म्हणत, “ज्याचे आयुष्य संपले, तो गेला. आता तो काही परत येणार नाही. परंतु, मला देशबांधवाचे संरक्षण हे माझे कर्तव्य सोडता येणार नाही.”
अनंतरावांवर सावरकरांचा मोठा प्रभाव होता. कोणतीही कृती धार्मिक आधारावर केली की अधिक प्रभावी ठरते, असे त्यांना वाटले. पूर्वी परळ येथील आंबेडकरांसोबतचे सहभोजन व पतित पावन मंदिरातील सहभोजन पाहिले आणि सहभोजने महाराष्ट्रात जागोजागी घडवून आणण्याचा अनंतरावांनी सपाटा लावला. त्यांच्या मते, अस्पृश्यता ही मनात आहे. म्हणून हिंदू धर्मावर निव्वळ टीका करून फारसे काही साध्य होणार नाही. धर्मातीलच काही बहुमान्य परंपरांचा उपयोग करून अनिष्ट प्रथा दूर करायला हव्यात; त्यातून सामाजिक परिवर्तन अधिक प्रभावीपणे घडवता येईल, असे त्यांना वाटायचे. सर्व जातींमध्ये आढळणारी सत्यनारायणाची पूजा आहे आणि म्हणून सहभोजनाला धार्मिक अधिष्ठान देण्यासाठी ‘सत्यनारायण-सहभोजन’ ही कल्पना अनंतरावांनी प्रत्यक्षात रुजवली. सत्यनारायण पूजेतला सोवळेपणा हद्दपार करण्याच्या दृष्टीने झुणका-भाकरीचा प्रसाद बहुजनांच्या हातून वाटायचा, अशी प्रथा पाडली. झुणका-भाकर तयार करण्यासाठी जिन्नससुद्धा बहुजनांच्या घरातूनच येतील, याची काळजी घेतली जात असे. सहभोजनाला त्यांनी अधिक समाजाभिमुख वळण दिले. ते म्हणत, हरिजनांची शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक उन्नती झाली पाहिजे. मात्र, याने त्यांचे समाधान होणार नाही. समता ही अत्यावश्यक बाब आहे.
अनंतरावांनी झुणका-भाकर सत्यनारायण चळवळीची पाच तत्त्वे सांगितली होती:
1) सहासन 2) सहभोजन 3) सहपूजन 4) सहवसन 5) सहबंधन.
पहिली तीन तत्त्वे निश्चितच त्यांच्या चळवळीने साधली जात. संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला भेदणारा एक भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असा कार्यविधी अनंतरावांनी पुढे या चळवळीत सुरू केला. तो म्हणजे, पूजा करणार्या लक्ष्मीनारायणाचे पाय धुवून त्यांच्या पायाचे तीर्थ स्वतः अनंतराव व सत्यभामाबाई प्राशन करू लागल्या. याची प्रचंड चर्चा होऊ लागली. ज्या काळात अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाला बंदी होती, विहिरीवरचे, तळ्यावरचे पाणी घेण्यास बंदी होती, त्या काळात एक ब्राह्मण जोडपे बहुजन समाजातील व्यक्तीच्या पायाचे तीर्थ जाहीररित्या प्राशन करत आहे, ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील अभूतपूर्व होती. तीर्थप्राशनामागील आपली भूमिका स्पष्ट करताना अनंतराव लिहितात, “मी स्वतः जन्माने ब्राह्मण असल्याने माझ्या पोटातील अहंकाराचे पाप मारून टाकण्यासाठी हरिजनांच्या पायाचे तीर्थ प्राशन करतो. जातीजातींतील भेदभाव नष्ट होऊन सर्व समाजांत समता, समरसता नांदो, अशी त्यावेळी हरिजवळ शुद्ध मनाने प्रार्थना करतो.” शेवटी ते मंत्र म्हणायचे,
‘समाजमृत्युहरणं, जातिद्वेषनिवारणं, हरिजनपादोदकं तीर्थं, जठरे धारयाम्यहम्!’ या चळवळीतून झुणका-भाकर संप्रदाय, झुणका-भाकर सद्भावना प्रचारक मंडळ, झुणका-भाकर अनाथाश्रम असे विविध उपक्रम सुरू झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्यापूर्वी अनंतरावांना भेटायला बोलावून आपला प्रेमाचा संदेश दिला की, “गद्रे, मी तुमच्या झुणका-भाकरीच्या विरुद्ध नाही. तुम्ही एखाद्या तालुक्यात तीन महिने हिंडून प्रचार करता, पण तेवढ्याने भागणार नाही. तुम्ही अनेक प्रचारकांचे साहाय्य घेऊन एकेका तालुक्यात तीन तीन वर्षे चिकाटीने कार्य केले पाहिजे. तुमच्या कार्याकडे माझे लक्ष आहे. तुम्ही आपल्या प्रचारात भगवान बुद्धांच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाचाही अंतर्भाव करा.”
संत गाडगेबाबांच्या समोर अनंतरावांनी जोडप्याचे पाय धुवून त्यांनी तीर्थ म्हणून प्राशन केले व आपल्या पत्नीलाही ते दिले. हे बघितल्यावर गाडगेबाबा म्हणाले, “गद्रे काका, तुम्ही छान! तुमचा झुणका-भाकर छान! तुम्ही महाराष्ट्रभर फिरा आणि सत्यनारायण करून हे शिवाशिवीचे भूत कायमचे काढून टाका.” यानिमित्ताने गाडगेबाबांशी झालेला स्नेह पुढेपण कायम राहिला. गाडगेबाबांच्या अखेरच्या आजारात अनंतराव 24 तास त्यांच्यासोबत होते. “तरुणपणी ज्या गुरुच्या शोधार्थ मी हिमालयात भटकंती केली होती आणि तरीही जो गुरु मला लाभला नाही, तो गुरु मला गाडगेबाबांच्या रूपाने मिळाला,” असे अनंतराव म्हणत असत.
पुढे अनंतरावांनी महाराष्ट्राच्या 33 जिल्ह्यांत झुणका-भाकर सत्यनारायण करण्याचा संकल्प सोडला.
सरकारतर्फे त्यांना प्रवासासाठी एक व्हॅन व एक लक्ष रुपये मिळले. सफाई, सर्व संतांच्या छायाचित्रांसह मिरवणूक, नाट्यप्रयोग, नकला, कीर्तन असे विविध कार्यक्रम लोकांपुढे सादर व्हायचे. त्यासाठी लागणार्या विजेची व्यवस्था करता यावी, म्हणून संपूर्ण दौर्यात विद्युतनिर्मिती यंत्र अनंतराव सोबत घेऊन फिरायचे. सर्व गदारोळात अनंतरावांचा संयम, ममता, समता आणि समरसता हे गुण कधीही विचलित झाले नाहीत. अनंतराव बहुजन जोडप्याच्या पायाचे तीर्थ घेत, तेव्हा खेड्यातील स्पृश्य मंडळींना आश्चर्य वाटे. एवढा थोर माणूस जर असे करतो, तर दैनंदिन वागणुकीत आपण बहुजनांना का दूर ठेवावे, ही कल्पना जमलेल्या सर्वांच्या मनात येत असे. अनंतरावांच्या या अस्पृश्यता निवारणातील योगदानामुळेच करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी त्यांना ‘समतानंद’ ही उपाधी दिली आहे.
सुमारे दोन दशके अनंतरावांनी महाराष्ट्रभर जे काही कार्य केले, त्या कार्याने महाराष्ट्र ढवळून निघाला. समाजात होणारे हे बदल लगेच जरी आचरणात येत नसले, तरीसुद्धा या गोष्टींचा प्रभाव नक्कीच पडत असे. सुधारणांचा वेग सावकाशच असतो. 1941 ते 1967 या कालावधीत तब्बल साडेतीन हजार सार्वजनिक झुणका-भाकर सत्यनारायण समतानंदांनी केले.
- शैलेश पाठक