बीड : (Beed) बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते २८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विविध आरक्षण आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आज मध्यरात्रीपासून २८ तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
आमच्याकडे सगळे पुरावे, वाल्मिक कराडवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करा : धनंजय देशमुख
सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे मंगळवार, दि. १४ जानेवारी रोजी एसआयटी पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत. याविषयी देशमुखांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, "आम्ही आज तेली साहेबांची भेट घेणार आहोत. खंडणी ते खून प्रकरण यातील ते कटकारस्थान करणारे जे आरोपी आहेत त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करून ३०२ अंतर्गत फाशीची शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे. या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. माझ्या भावाची हत्या ही खंडणीच्या प्रकरणामुळे झाली. त्यामुळे आमची मागणी आहे की, दोन्ही प्रकारणाचे आरोपी एकच आहेत. एसआयटी पथकात आम्ही दोन नावे सुचवली होती. मात्र, त्यांचा अद्याप पथकात समावेश झालेला नाही. नवीन एसआयटीमधील कोणत्याही अधिकाऱ्यावर आमचा आक्षेप नाही, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.