मुंबई : गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले असून प्रथमच राज्य शासन हा उत्सव साजरा करत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवावी, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी सर्व राज्य आणि केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत राज्य तसेच केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वांद्र्यातील एमएसआरडीसी महामंडळ येथे बैठक झाली. यावेळी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आयुक्त, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई विद्यापीठ, सीमा शुल्क, बेस्ट, एमआयडीसी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एचपीसीएल, बीपीसीएल, मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय जीवन विमा प्राधिकरण यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव घोषित केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता राज्य शासन प्रथमच गणेशोत्सव साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी. गणेशोत्सवाच्या १० दिवसाच्या काळात आपापल्या विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत ऑपरेशन सिंदूरद्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात यावा. तसेच आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी संकल्पना यांचा गौरव करण्यात यावा,” असेही निर्देश त्यांनी दिले.
सर्व धर्म, जात, भाषांना जोडणारा गणेशोत्सव उत्सव असावा
“गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता २२ देशांमध्ये साजरा होतो. सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने आणि आता राज्य शासनामार्फतही साजरा होणारा हा गणेशोत्सव सर्व धर्म, जात, भाषांना जोडणारा उत्सव असावा. या गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी १० कोटी रुपयांची बक्षिसे ठेवली जाणार असून समाजमाध्यमांवरून विशेष मोहीम राबवली जावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनोस्कोचा दर्जा मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विषय घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावेत. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेत, यासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपणसुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चित्रपट महोत्सव, शैक्षणिक कार्यक्रम आदी विषयांवर निबंध, चित्रकला, ब्लॉग स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात,” अशा सूचनाही मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या.