मतदान करतानाच नव्हे, तर प्रत्येक दैनंदिन कृती करताना स्वतःपासून सुरू होणारी ही चढती भाजणी लक्षात घेऊन कृती केली, तर राष्ट्र परमवैभवाच्या शिखरावर हळूहळू पोहोचू शकते आणि तिथे प्रदीर्घ काळ स्थिर राहू शकते आणि या चढत्या भाजणीचा विसर पडला की राष्ट्र फार वेगाने घसरणीला लागते. देशाच्या भौगोलिक सीमा आक्रसू लागतात! भारतवर्ष नावाच्या देशाच्या सीमा कोठून कोठपर्यंत आक्रसल्या आहेत ते जरा नीट बघा. राष्ट्राच्या सीमा आक्रसल्या, की देशाच्या सीमा आपोआप आक्रसतात! भारताची फाळणी हे त्याचे विदारक उदाहरण आहे! म्हणूनच म्हणतात, राष्ट्रहित सर्वोपरि!
आज दि. १ जून रोजी सायंकाळी मतदानाची सातवी आणि अंतिम फेरी समाप्त होताच, विविध मतदानोत्तर सर्वेक्षण चाचण्यांचे निष्कर्ष धडाधड येऊ लागतील आणि त्यावरील माध्यमतज्ज्ञ समूह वादविवाद थेट दि. ४ जून रोजी सकाळी मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होईपर्यंत झडत राहतील! मतमोजणी जसजशी पुढे सरकत जाईल, तसतसे सेक्युलर, सांप्रदायिक, लोकशाही, हुकूमशाही करत करत आरोप-प्रत्यारोप थेट मतदानयंत्रांपर्यंत येऊन पोहचतील! असे करत असताना आपण संविधानिक यंत्रणांविषयी जनतेच्या मनात संभ्रमावस्था, अविश्वास निर्माण करत आहोत, हे यांच्या लक्षात कसे येत नाही? भारतीय मतदाता जागृत झाला आहे, परिपक्व झाला आहे वगैरे वगैरे तात्विक मुलामा द्यायला मात्र ही तज्ज्ञ मंडळी विसरत नाहीत! गेली काही वर्षे का कोण जाणे, पण वेगवेगळी सर्वेक्षणे आणि प्रसारमाध्यमे प्रत्यक्ष मतमोजणीपूर्वी जनतेसमोर एक भ्रामक चित्र सादर करतात, ज्याचा फुगा प्रत्यक्ष मतमोजणीनंतर फुटतो, ज्यातून अनेक समज-गैरसमज निर्माण होतात, मतदानयंत्रांविषयी आक्षेप हा त्यातलाच एक! प्रसारमाध्यमे जेव्हा निष्पक्ष पत्रकारिता विसरून राजकीय पक्षांच्या भूमिकेत शिरतात, तेव्हा त्यांची विश्वासार्हता पणाला लागत असते! मुख्य प्रवाहातील मुद्रित आणि दृकश्राव्य प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण, खरेच भारतीय मतदाता जागृत झाला आहे का?
परिपक्व कर्तव्यकठोर, जबाबदार नागरिक झाला आहे का? तसे असते, तर गेल्या ७० वर्षांत मतदानाची टक्केवारी वाढत जाऊन आज ती कुठल्या कुठे पोहोचली असती? मतदान करण्यासाठी ‘चला हो मायबाप’ म्हणत मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांना, राजकीय पक्षांना, निवडणूक आयोगाला एवढे प्रयत्न करावे लागले नसते. आपण मतदान करून किंवा मतदानाला दांडी मारून कोणावर उपकार करत नसतो किंवा कोणावर सूड उगवत नसतो, तर तसे करून आपण आपले स्वतःचे, आपल्या भावी पिढ्यांचे आणि पर्यायाने आपल्या राष्ट्राचे भवितव्य घडवत असतो किंवा बिघडवत असतो. खुन्नस, हेवेदावे, भाऊबंदकी, जातपात वगैरे निकष वापरून मतदान करणे, न करणे केव्हाही हानीकारकच! माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे राव? कोणीही सत्तेवर आले, तर मला काय त्याचे? कर्तव्य पालनाच्या बाबतीत ही एवढी बेफिकीर वृत्ती आली कोठून? रामप्रहरी चावडी चौकात गावकरी घोळक्याघोळक्याने दबक्या आवाजात बोलत होते. कोणी डोळे चोळत, कोणी हातावर राखुंडी घेऊन दात घासत, कोणी घागर हातात घेऊन, कोणी हातात लोटा घेऊन, जो जशा अवस्थेत असेल, तो तशा अवस्थेत चावडी चौकात पोहोचला होता!
काल रात्री शेजारच्या गावात रझाकारी टोळधाड आली होती. कोणाची तिजोरी पळवली, कोणाच्या पडवीतली धान्याची पोती पळवली, कोणाच्या गोठ्यातली गाय ओढून नेली, तर कोणाची तरणीताठी पोर ओढून नेली, देऊळ-देव्हार्यांची विटंबना तर सर्रास करण्यात आली. चावडी चौकात हळूहळू जमलेली गर्दी वांझोट्या चर्चेनंतर हळूहळू विरत गेली. काही दिवसांनंतर शेजारच्या आणखी एका गावात रझाकारी टोळधाड पडल्याची वार्ता आली. चावडी चौकात गावकरी पुन्हा जमले, हळहळले, वांझोटी चर्चा करून आपापल्या घराकडे परतले! शेजारच्या कुठल्या ना कुठल्या गावात रझाकारी टोळधाडीने घातलेल्या हैदोसाच्या बातम्या आता नियमितपणे येऊ लागल्या, तशी चावडी चौकात जमणारी गर्दीही रोडावत गेली! गोठ्यातली गोमाता ओढून नेली जात असताना तिने फोडलेला हंबरडा, वयात आलेली तरणीताठी लेक-सून ओढून नेली जात असताना तिने आणि तिच्या आप्तस्वकीयांनी अयशस्वी प्रतिकारानंतर फोडलेला हंबरडा... चावडी चौकात मोजकीच जुनीजाणती मंडळी जमली होती. रझाकारी टोळधाडीने उद्ध्वस्त झालेल्या गावी जाऊन आपण त्यांना धीर दिला पाहिजे, त्यांचे सांत्वन केले पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, शेजारधर्म पाळला पाहिजे.बरोबर, अगदी बरोबर, गेले पाहिजे.
ठरले तर मग. आपण पाच-दहा निवडक मंडळी उद्या सकाळी शेजारच्या गावाला जाऊ, त्यांची विचारपूस करू! बोला, कोणकोण येतंय? चुळबूळ चुळबूळ सुरू झाली, काहींनी अडचणी सांगत काढता पाय घेतला. मी आलो असतो हो, पण... अहो, तुम्हाला काही समजते की नाही? आँ? आवतान धाडून रझाकारी टोळधाड आपल्या गावात कशासाठी बोलावत आहात? आपण शेजारच्या गावात मदत करायला गेल्याचे त्या रझाकारी टोळधाडीच्या कानावर पडले, तर ती टोळधाड उद्या आपल्या गावावर येऊन आदळेल त्याचे काय? ज्या गावात रझाकारी टोळधाड प्रथम घुसली, त्या गावाने एकत्र येऊन टोळधाडीला पिटाळून लावले असते, तर आपल्यावर ही आफत आलीच नसती? काही नको त्यांच्या मदतीला जायला. एके दिवशी त्याच गावात भल्या पहाटे बामणआळीतून आरडाओरडा ऐकू येऊ लागला. अरे वाचवा, वाचवा, अरे माझी गोमाता ओढून नेत आहेत, अरे माझी लेक, माझ्या काळजाचा तुकडा ओढून नेत आहेत, धावा रे मदतीला... बामणआळीतला कोलाहल हळूहळू शांत झाला, घरातच जागा झालेला पण घराबाहेर न पडलेला गाव परत गाढ झोपी गेला!
कधी सोनारगल्ली, तर कधी माळीवाडा. कधी तेलीगल्ली, तर कधी पाटीलवाडा. कधी गवळीगल्ली, तर कधी धनगरवाडा. टोळधाड पडली नाही, अशी एकही गल्ली, एकही घर-वाडा शिल्लक राहिले नाही. गल्लीतील सगळ्यांनी एकत्र येऊन कडवा प्रतिकार केला असता तर? सगळ्या गावाने एकत्र येऊन प्रतिकार केला असता तर? पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांनी एकत्र येऊन प्रतिकार केला असता तर? जीवावर बेतले असूनही सगळे एकमेकांच्या मदतीला का धावले नाहीत? मूठभर टोळधाडीसमोर सारा गाव हतबल? सारी पंचक्रोशी हतबल? राजा दाहीर यांच्या सिंधवर पडलेल्या मोहम्मद बिन कासीमच्या पहिल्या रझाकारी टोळधाडीपासून ते आजतागायत आमच्या मनोवृत्तीमध्ये जराही फरक पडलेला नाही. सिंधच्या मदतीला कोणीही धावले नाही आणि तिथेच रझाकारी टोळधाडीच्या लक्षात आले की, हे सगळे काफीर सुट्टे सुट्टे आहेत, एकेकाला फोडून झोडून संपविणे अवघड नाही, सारा भारत गिळंकृत करणे अवघड नाही! मुघल ते इंग्रज या सार्यांनी हे ओळखले होते! काश्मीरमधून हाकलून दिलेले सनातनी हिंदू आपल्याच मायभूमीत इतरत्र निर्वासितांचे लाजिरवाणे आयुष्य जगत आहेत. आपल्याच देशात पश्चिम बंगाल, केरळ वगैरे प्रांतातील सनातनी जीव मुठीत घेऊन जगत आहेत, स्थलांतर करत आहेत! का? उत्तर एकच; मला काय त्याचे? ही आमची कूपमंडूक वृत्ती! परस्पर मत्सर, हेवेदावे, फंदफितूरी, भाऊबंदकी, कमीतकमी श्रमात जास्तीतजास्त भौतिक सुखांची लालसा, सनातनी क्षात्रतेजाचा अभाव, सनातनी राष्ट्रीय एकजुटीचा अभाव, जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा अभाव, राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव, राष्ट्रीय दृष्टिकोनाचा अभाव, राष्ट्रीय विचारसरणीचा अभाव, राष्ट्रीय-सामाजिक बांधीलकी, सामुहिक दायित्व याविषयी कमालीची अनास्था...
भारताच्या इतिहासाचे दुर्दैव हे आहे की, भारतीय हे स्वतःचेच शत्रू आहेत आणि ते इतिहासातून काहीच बोध घेत नाहीत, म्हणूनच इतिहासाची पुनरावृती पुन्हा पुन्हा होत आली आहे. राजा पोरसचा पराभव करण्यासाठी विधर्मी विदेशी अलेक्झांडरला मदत करणारा अंभी याच देशातील होता ना? पृथ्वीराज चौहानचा बदला घेण्यासाठी मोहम्मद घोरीला पाचारण करणारा जयचंद आमचाच होता ना? छत्रपती शिवरायांना औरंगजेबाच्या आग्रा दरबारी घेऊन जाऊन फसगतीने नजरबंद करणारे आमचेच होते ना? मुघलांना भारतात घुसण्यासाठी खैबरखिंडीचा रस्ता आम्हीच दाखविला होता ना? मानमरातबखिताब यासाठी इंग्रजांना क्रांतिकारकांची माहिती आम्हीच पुरवित होतो ना? स्वदेशी, स्वधर्मीला लाथाडून विदेशी, विधर्मीला बोकांडी घ्यायला आम्हीच आसुसलेले असतो ना? आम्ही ‘अकबर दि ग्रेट’ म्हणतो! ‘अलेक्झांडर दि ग्रेट’ म्हणतो!, पण आम्हाला चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य आठवत नाही, आचार्य चाणक्य आठवत नाही, राजा रणजितसिंह यांचे महान बलिदान आठवत नाही! मातृभूमीसाठी सर्वस्वाची आहुती देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रभुतींची अक्षम्य उपेक्षा, अक्षम्य हेळसांड आणि ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात आलेल्या धर्मप्रसारकांना भारताचा सर्वोच्च बहुमान? आमच्या या गुलाम, पराभूत मानसिकतेची लाज-शरम आम्हाला कधी वाटणार आहे की नाही? आमच्या या गुलाम, पराभूत मानसिकतेचे जाज्वल्य राष्ट्रभक्तीत परिवर्तन कधी होणार आहे की नाही? ‘मला काय त्याचे?’ ही आत्मघातकी वृत्ती सोडून ‘राष्ट्रहित सर्वोपरि; म्हणत जगायला आम्ही कधी शिकणार आहोत?
वैयक्तिक हितापेक्षा कुटुंबहित अधिक महत्त्वाचे असते. कुटुंबहितापेक्षा जात, पंथ, संप्रदाय, समाजहित चढत्या क्रमाने अधिक महत्त्वाचे असते. जात, पंथ, संप्रदाय, समाजहितापेक्षा धर्महित अधिक महत्त्वाचे असते. धर्महितापेक्षा ग्राम, शहर, नगर, महानगर, प्रांत-प्रदेश, देश, राष्ट्रहित चढत्या क्रमाने अधिक महत्त्वाचे असते. असुरक्षित देशात-राष्ट्रात कोणाचेच हित साधले जाऊ शकत नाही! धर्म, देश, राष्ट्र या ज्या सनातन संकल्पना आहेत, त्या त्याच अर्थाने वापरल्या आहेत! मतदान करतानाच नव्हे, तर प्रत्येक दैनंदिन कृती करताना स्वतःपासून सुरू होणारी ही चढती भाजणी लक्षात घेऊन कृती केली, तर राष्ट्र परमवैभवाच्या शिखरावर हळूहळू पोहोचू शकते आणि तिथे प्रदीर्घ काळ स्थिर राहू शकते आणि या चढत्या भाजणीचा विसर पडला की राष्ट्र फार वेगाने घसरणीला लागते. देशाच्या भौगोलिक सीमा आक्रसू लागतात! भारतवर्ष नावाच्या देशाच्या सीमा कोठून कोठपर्यंत आक्रसल्या आहेत ते जरा नीट बघा. राष्ट्राच्या सीमा आक्रसल्या, की देशाच्या सीमा आपोआप आक्रसतात! भारताची फाळणी हे त्याचे विदारक उदाहरण आहे! म्हणूनच म्हणतात, राष्ट्रहित सर्वोपरि! राष्ट्र सर्वप्रथम, सर्वात शेवटी मी! वन्दे मातरम्!