अहिल्यादेवी या सर्वगुणसंपन्न प्रशासक होत्या. राजकीय मुत्सद्देगिरीसह धर्माचे ज्ञान आणि समाजमनाची जाण, हे त्यांचे वैशिष्ट्य. आपल्या 28 वर्षांच्या राज्यकारभारात अनेक प्रसंगांनी अहिल्यादेवींची परीक्षाही पाहिली. परंतु, ध्येयव्रती आणि मुत्सद्दी अहिल्यादेवींनी सर्व आव्हानांवर आपल्या चाणाक्ष बुद्धीने लीलया मात केली. अशा या कर्तव्यपरायण राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा समग्र परिचय करुन देणारा हा लेख...
भारत देशाला प्राचीन कालखंडापासून अनेक कर्तबगार स्त्रियांचा वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची उभारणी करण्यात कर्तबगार पुरुषांप्रमाणेच स्त्रियांचाही महत्त्वपूर्ण सहभाग आहे. या महिला नुसत्या कांतिमान नाहीत, तर स्फूर्तीदात्या आहेत. काहींनी थोर पुरुषांना जन्म दिला व त्यांच्या कर्तृत्वाची उभारणी केली, तर काहींनी प्रत्यक्ष तलवार गाजवून स्फूर्ती दिली. काहींनी आदर्श प्रशासन व राजकारण करून, कल्याणकारी राज्याची उभारणी केली. प्रत्येकजण आपापल्या परीने श्रेष्ठ होत्या. अहिल्यादेवी होळकर त्यापैकीच एक.
अहिल्यादेवींनी मराठा कालखंडात उल्लेखनीय कामगिरी बजावली. 18व्या शतकातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील ते एक कर्तबगार महिला नेतृत्व होते. वास्तविक, पाहता अहिल्यादेवींचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखमय होते. पती व सासर्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर मुलाचाही मृत्यू झाला, मुलगी सती गेली. त्यांच्या घराण्यातील 20 स्त्रिया सती गेल्या. परंतु, इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर वैयक्तिक दुःखही लोककल्याणाच्या मार्गापासून विचलित करू शकत नाही, हे अहिल्यादेवींनी आचरणातून सिद्ध करून दाखविले.
अहिल्यादेवींचे धार्मिक अधिष्ठान
अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाच्या अनेक बाजू आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे धार्मिक बाजू. त्यांनी तत्कालीन कालखंडात सामाजिक दृष्टिकोनातून जे लोककल्याणकारी कार्य संपूर्ण भारतभर केले, त्यातून राज्यव्यवस्थेला जे नेतृत्व दिले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे.
मुस्लीम राजवटीने केलेला विध्वंस यामुळे झालेल्या नुकसानामुळे, भारताची जडणघडण करताना धार्मिक कार्य कशा प्रकारचे करावे, याचे चिंतन त्यांनी केले. सामाजिक विषमतेच्या काळात राज्यकारभाराला, धार्मिक व सामाजिकतेची जोड़ दिली. मुस्लीम राजवटीने केलेल्या क्रूर अत्याचारांमुळे त्यांचे मन विषण्ण झाले. मराठा कालखंडातील पेशवाई मोठ्या प्रमाणात विविध कारणांंनी गाजली. यामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कार्यातून महत्त्वाची भूमिका बजावली.
अहिल्यादेवींच्या व्यक्तिपरिचयाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, अहिल्यादेवी अत्यंत ग्रामीण भागात व ज्या कुटुंबात जन्मल्या तेथील समाजव्यवस्थेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. विशेषकरून त्यांच्या आईच्या संस्कारांंचा पगडा त्यांच्यावर होता. त्यांच्या आई, गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात दानधर्म करीत असत. त्याप्रमाणे अहिल्यादेेेवींनी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. जगातील प्रख्यात व्यक्तींचा अभ्यास केला असता असे दिसते की, तत्कालीन विचारांचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर झाला होता. त्याचप्रमाणे अहिल्यादेवींवर गावात व मंदिरात चालणार्या पोथी, पुराण, भजन व कीर्तन, त्यातून सांगणारे आदर्श तत्त्वज्ञान, लोककल्याणकारी मार्ग यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. विवाहानंतर त्या सासरी इंदूरला आल्यानंतर, त्यांना अत्यंत कर्तव्यदक्ष व स्पष्टवक्त्या सासू गौतमाबाईंचा सहवास लाभला. त्यांच्या या गुणांचा प्रभाव अहिल्यादेवींवर पडलेला दिसतो. तत्कालीन कालखंडात आजच्यासारखी शिक्षणाची व्यवस्था नव्हती. परंतु, राजघराण्यातील स्त्रियांना शिक्षणासाठी पुरोहिताची नेमणूक करून शिक्षण दिले जात होते, त्याप्रमाणे अहिल्यादेवींना ते दिले होते.
अहिल्यादेवींच्या मोडी हस्ताक्षरातील पत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना मोडी, मराठी व संस्कृत भाषाही अवगत होती, असे दिसून येते. अहिल्यादेवी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ग्रंथसंग्रह होता. त्यामध्ये धार्मिक, सामाजिक, राजकीय संदर्भात ग्रंथ होते. त्यातून त्यांंंना मानवतावादी आचारविचारांचे महत्त्व समजले. मानवतावादी खर्या धर्माचे ज्ञान मिळाले. राज्यव्यवस्थेचा इतिहास ग्रंथातून त्यांनी आत्मसात केला. अवगत झाला. प्राचीन राज्यव्यवस्थेचे ज्ञान मिळाले. धर्मग्रंथातील धार्मिक विचार, कार्यपद्धती त्यांनी समजून घेतली. प्राचीन तीर्थक्षेत्रांचे महत्त्व व इतिहासही त्यांना समजला. त्यांच्या कार्यपद्धतीला या ग्रंथातून विचारांची जोड़ मिळाली. अहिल्यादेवींच्या ग्रंथसंपदेत मातोश्री अहिल्यादेवींचा ग्रंथसंग्रह श्रीहरी अध्याय, गीतगोविंद सटीक पत्र, चित्रसृष्टी मीमांसा, मुहूर्त चिंतामणी, कान्यकुब्ज माहात्म्य, निर्णयसिंधू, वेदांची पोथी, महाराष्ट्र विराटपर्व वही, व्यंकटेशस्तोत्र वही, जन्माष्टमी पूजा, जम्बूरमार्ग प्रस्ताव, मथुरामाहात्म्य, पुष्करक्षेत्र माहात्म्य, वृत्तर्कपत्रे, अध्यात्मरामायण सप्तकाण्ड, आश्रमवास, स्वर्गारोहण, सभापर्व धाकटासाचा, वनपर्व विराटपर्व, उद्योगपर्व, भीष्मपर्व, द्रोणपर्व, निर्णयसिंधू पोथी, ज्ञानेश्वरी पोथी, रुक्मिणी स्वयंवर, व्यंकटेश स्तोत्र, भगवद्गीता पंचरत्नी, पूजा प्रकार, ज्ञानेश्वर नमन, अणुवेदान्त, देवीमानस पूजा, मल्हारीकवच, भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, मल्हारीकवच दुसरे, मल्हारस्तवराज, नारायण वर्म, अपामार्जन, चंडिकापूजा विधान, रुद्रन्यास, सिंहस्थस्नानविधी, भैरवतंत्रोक्तमन्यू स्तोत्र, उत्सर्जनउपाकर्म, सर्वसारतिथी निर्णय, वापिकुलोत्सर्ग, प्रयोग, विष्णुप्रतिष्ठा पद्धती, श्रवणघातचा, निर्णय, गीतापंचरत्नेवही, चातुर्मास्य प्रयोग, रसमंजरी सटीक, विष्णुसहस्त्रनामभाष्य, वायुस्तुती सटीक, वैनिदान, अन्हीकवेदोक्त, रघुवंशसटीक, दशपौर्णिमासपत्रे, यंत्रविभाग, गायत्रीपद्धति, किरकोळवेदोक्त सूक्त, शिक्षा उपनिषद, प्रकृतिहोत्र, नरउपनिषद, नारायण उपनिषद, ग्रहमण, नवग्रहयंत्र, अमरकोष तीन कांड, पद्मपुरणोक्त मल्हारीसहस्त्रनाम, ब्रह्मपंचकिसहिष्टक, नैमिषारण्यमाहात्म्य पंचक्रोश, भागवत द्वादश स्कन्द, रामायण सप्तकाण्ड वाल्मीकी मयूख, तिथ्यक, स्मृत्यर्थसार प्रायश्चित प्रकर्ण, कालमाधव, कार्तिकमाहात्म्य पद्मपुरणोक्त भागवत माहात्म्य, मार्गशीर्ष माहात्म्य, आर्चादीप, भारत समग्रपर्व, हरिवंश, सर्वसारतिथिनिर्णय, यमुना माहात्म्य, कन्यादान विधी, संवर्तकप्रणीत धर्मशास्त्र, स्वप्नाध्याय इत्यादी ग्रंथ होते. या ग्रंथसंपदेतून अहिल्यादेवींना प्रेरणा व स्फूर्ती मिळाली, त्यातूनच त्यांनी 30 वर्षे लोककल्याणकारी राज्यकारभार केला. छ. शिवाजी महाराजांच्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा आदर्श त्यांच्यासमोर होता.
सम्राट अशोक, हर्षवर्धन यांच्या पदरी चांगले पुराणिक होते, ते राजाला राजकीय सल्ला देत. अहिल्यादेवी होळकरांच्या पदरीही अंबादास नावाचा पुराणिक होता. त्यांनी पोथी-पुराणातील तत्त्वज्ञान व राज्यकारभाराविषयी ज्ञान अहिल्यादेवी दिले. पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती जाण्यास निघाल्या. परंतु, सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांचे मतपरिवर्तन केले. सती जाण्यापासून परावृत्त केले. सूनेलाच मुलगा मानून त्यांना राज्यकारभारविषयक शिक्षण दिले. येथे त्यांचा हा विचार तत्कालीन समाजाला आदर्श होता. अहिल्यादेवी लढाईच्या वेळी स्वतः रणभूमीवर जात व तेथील तोफा, दारूगोळा, सैनिक यांची व्यवस्था यांचे निरीक्षण करत असत. त्यामुळे त्यांना रणनीतीचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले. मल्हाररावांनी त्यांना केलेल्या सूचनांतून, त्यांना राज्यकारभाराचे विषयज्ञान मिळत गेले. त्यांनी केलेत्या कामांतून मल्हाररावांचा विश्वास संपादन केला. यातून अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.
कूटनीतिज्ञ अहिल्यादेवी
त्यांची कार्ये, कूटनीती, राष्ट्रराज्यातील तह, करारनामे व राजकारणाची “सत्तेचे पाठबळ प्राप्त करणे आणि आपले हितसंबंध सुरक्षित ठेवणे हाच राजकारणाचा अर्थ होय,” अशी व्याख्या मार्कसने केली आहे. “ज्या आधारावर राजकीय सिद्धांत निर्माण होतात, त्यासाठी काही विशिष्ट घटना घडाव्या लागतात. त्या घटना व्यक्तीच्या आणि नेतृत्वाच्या राजकीय व्यवहाराद्वारे घडतात, त्यालाच राजकारण म्हणतात. कोणाला काय मिळते? कसे मिळते? याचा अभ्यास म्हणजे राजकारण,” असे लॉसवेल म्हणतो. वरील सैद्धांतिक मांडणीचा विचार करता, अहिल्यादेवी होळकरांच्या हाती असणारे राज्य तत्कालीन अनेक मुत्सदींनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अहिल्यादेवींनी आपल्या रणनीतीच्या जोरावर ते यशस्वी होऊ दिले नाही. त्यांनी आदर्श राज्यकारभार व पारदर्शक प्रशासन करून, त्यातून जनतेचा व सैनिकांचा पाठिंबा मिळविला आणि स्वतःचे हितसंबंध सुरक्षित ठेवले. तसेच शेजारील राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले.
न्यायप्रिय अहिल्यादेवी
अहिल्यादेवींच्या न्यायीपणाबद्दल तत्कालीन कालखंडात सर्वत्र ख्याती होती. आजच्यासारखे लिखित कायदे त्यावेळी नव्हते. परंतु, अहिल्यादेवींची धारणाशक्ती प्रबळ होती. त्यांना अन्यायाचा तिटकारा होता. त्यांचे न्यायदान उत्तम न्यायाधीशाप्रमाणे होते. मुघलांच्या काळात, राज्यात न्यायालये फार कमी होती. होळकरांच्या राज्यात नियमबद्ध न्यायालयांची सुरुवात, अहिल्यादेवींच्या काळापासून सुरू केली गेली. शिंदे आणि होळकर यांच्यातील जमिनीच्या वादाचा निर्णय लावण्यात यावा म्हणून, शिंदेंनी पंच म्हणून अहिल्यादेवींची नेमणूक केली होती. वास्तविक पाहता, एका पक्षाचे फिर्यादी स्वतः अहिल्यादेवी होत्या. अशा प्रकारचा विश्वास अहिल्यादेवींच्या न्यायव्यवस्थेबद्दल होता.
18व्या शतकात संपूर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण होते, परंतु अहिल्यादेवींच्या राज्यात शांतता होती. त्या कोणत्याही शेतकर्याकडून नियमापेक्षा जादा वसूल घेत नसत. खरीप पिके कापल्यावर महसुलीची निश्चिती केली जात असे. तत्कालीन कालखंडात महापूर, टोळधाड, गारांचा वर्षाव, अवर्षण, नैसर्गिक प्रकोप आणि फौजेच्या हालचालीमुळे पिकांचे नुकसान होत असे, अशा परिस्थितीत अहिल्यादेवी शेतकर्यांस सार्यात सूट देत असत. अहिल्यादेवींचे शेतकर्यांविषयीचे धोरण आजच्या राज्यव्यवस्थेला अनुकरणीय. अहिल्यादेवींचे दूरदृष्टीचे नेतृत्व होते. त्यांनी बदलत्या व्यवस्थेनुसार आपल्या पारंपरिक सैनिक व्यवस्थेत बदल करून, पाश्चात्य पद्धतीची फौज कर्नल जे. पी. बॉईड नावाच्या अमेरिकन अधिकार्यांमार्फत करून घेतली होती. यामध्ये आधुनिक पद्धतीने सैनिकांना प्रशिक्षण दिले होते. नारो गणेशाने तुकोजीच्या मदतीने सैन्यात, अहिल्यादेवींच्या विरोधात फितुरी करण्याचा प्रयत्न केला होता. सैनिकांनी उत्तर दिले की, “एकवेळ आम्ही पेशव्यांच्या विरोधात लढण्यास तयार आहोत, परंतु अहिल्यादेवींच्या विरोधात आम्ही लढणार नाही.” अशा प्रकारची विश्वासार्हता त्यांनी सैनिकांमध्ये निर्माण केली होती.
कोणत्याही राज्यव्यवस्थेमध्ये धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर, निर्णयाची अंमलबजावणी कराणारा प्रशासकीय वर्ग हा कार्यक्षम व विश्वासू असावा लागतो, तरच राज्यव्यवस्था सुव्यवस्थितरित्या चालते. तशा प्रकारची विश्वासार्हता व कार्यक्षमता अहिल्यादेवींनी त्यांच्या राज्यव्यवस्थेतील सेवकांत निर्माण केली होती. त्यामुळे अहिल्यादेवींच्या राज्यातील प्रशासनव्यवस्था व राज्यकारभार आदर्श होता.
राजकारण आणि समाजातील संबंध अतिशय घनिष्ठ आहे. कारण, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. राजकारण हे समाजाच्या जीवनाचे अंग आहे. समाजामध्ये अनेक घटकांचा व कार्याचा समावेश होतो. समाजाशिवाय राजकारणाचा जन्म होऊ शकत नाही आणि समाजाच्या अभ्यासाशिवाय राजकारणाचा अभ्यास करणे योग्य ठरत नाही. समाज ही एक व्यवस्था असते. सातत्याने घडत असणार्या अनेक प्रक्रिया यांची मिळून बनलेली असते. राजकारण ही अशा प्रक्रियांपैकी एक प्रक्रिया असते. तिला विशिष्ट सामाजिक संदर्भ असतो. राज्याचे संविधान किंवा राज्यातील राजकीय संस्था किंवा शासकीय संस्था यांच्या निर्मितीमागे निश्चित अशी मानवी प्रेरणा आणि हेतू असतो. त्या सर्वांचा विचार केल्याशिवाय त्या संस्थांचे कामकाज समजून येत नाही, हा विचार मान्य झाला. ज्या सामाजिक परिस्थितीत राजकीय प्रक्रिया किंवा राजकीय घटना घडतात, त्या परिस्थितीचे ज्ञान असल्याशिवाय ती घटना योग्य रितीने समजू शकत नाही. हे मोठ्या प्रमाणात मान्य झाले. अहिल्यादेवी होळकरांनी सामाजिक परिस्थितीचे चिंतन करून राजकीय सत्तेचा उपयोग लोककल्याणकारी राज्य निर्मितीसाठी केला, स्त्री व पुरुष यांमध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
समाजप्रवर्तक अहिल्यादेवी
अहिल्यादेवींनी ज्या शतकात सामाजिक कार्य व विचार मांडला, ते 18वे शतक अत्यंत विषमतेतून वाटचाल करीत होते. स्त्रियांकडे पाहण्याचा कुटुंबाचा किंवा समाजाचा दृष्टिकोन विषम होता. पुरुषांना समाजात जे स्थान होते, ते स्त्रियांना नव्हते. तत्कालीन कालखंडात एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे सासू, सासरे, घरातील इतर आप्तजन यांची सेवा करणे, हे स्त्रीचे आद्यकर्तव्य मानले जाते. बहुपत्नीत्व, बालविवाह, वैधव्य, केशवपन, सतीचाल, पडदा पद्धत, हुंडा पद्धत अशा अनेक जटिल प्रथा अस्तित्वात होत्या. अहिल्यादेवी होळकरांनी त्यातील काही प्रथा मोडीत काढून, कल्याणकारी सामाजिक कार्य केले. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी त्यांच्या राज्यात 200 वर्षांपूर्वी हुंडाबंदीचा आदेश काढला होता. स्वतः सती न जाता तत्कालीन स्त्रियांपुढे आदर्श निर्माण केला. स्त्रीचा पती वारल्यावर ज्या स्त्रीच्या संपत्तीला वारस नाही, त्यासाठी स्त्रीला मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार त्यांनी दिला. विधवा स्त्रियांना संरक्षण मिळवून दिले.
अहिल्यादेवींच्या राज्यात जे भिल्ल, गोंड यात्रेला जाणार्या यात्रेकरूंची लुटालूट करत व ‘भिलकवडी’ हा कर यात्रेकरूंकडून घेत. त्याबाबत त्यांच्याकडे तक्रार येताच, त्याचा बंदोबस्त केला. त्यांच्या भिलकवडी कराला मान्यता दिली. त्या लोकांना उदरनिर्वाहासाठी शेती देऊन, त्यांचे पुनर्वसन केले. त्यांना त्या बदल्यात तेथील भागातील देवीचे संरक्षण करण्यास सांगितले. अशा प्रकारे अहिल्याबाईंचे प्रशासन लोकाभिमुख होते. तत्कालीन समाज हा धार्मिक प्रथा, परंपरेवर आधारित होता. तीर्थयात्रा, धार्मिक स्थळांना भेटी देणे तेव्हा मोठ्या प्रमाणात होत होते. त्यांच्या सोयीसुविधांसाठी आजच्यासारखी व्यवस्था नव्हती. तत्कालीन राजे, संस्थानिक, धनिक, व्यापारी त्यांच्या सोयी-सुविधांचे काम करत असे. यात्रेकरूंची व नगरवासीयांची सोय व्हावी म्हणून, त्यांनी घाट, धर्मशाळा, वाडे, पाणपोया, रस्ते, कुंड, तलाव, अन्नछत्र सुरू केले. धर्मशाळा व अन्नछत्रामुळे अनेक गरीब यात्रेकरूंची राहाण्याची व जेवणाची सोय होत असे. त्यांनी केलेली कल्याणकारी कार्य केवळ आपल्या राज्यात न करता संपूर्ण भारतभर केले. हे कार्य श्रीमंत लोकांसाठी न करता, या संपूर्ण देशातील सामान्य कष्टकरी, गरीब लोकांसाठी केले. याठिकाणी अहिल्याबाईंचा राष्ट्रनिर्मिती हा उद्देश दिसून येतो.
नवनिर्मितीचा ध्यास
200 वर्षांपूर्वी त्यांनी बांधलेल्या विहिरी, तलाव आजही लोकांच्या उपयोगी पडतात. चांदवड, जेजुरी येथील विहिरींचा उपयोग, त्या शहरातील लोकवस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी होत आहे. शासन जे रोजगार हमी योजनेंतर्गत ज्या योजना राबवित आहे, त्या योजना अहिल्यादेवींनी 200 वर्षांपूर्वी राबविल्या. तत्कालीन कालखंडात दळणवळणाची व प्रवासाची साधने अत्यंत मर्यादित होती. अशा परिस्थितीत प्रवासांच्या सोयीसाठी कोलकातापासून काशीपर्यंतचा रस्ता अहिल्यादेवींनी तयार केला. महत्त्वाच्या ठिकाणी नदीवर पूल बांधले. त्यात प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, मालेगाव येथील नद्यांवर पूल बांधलेले पूल अहिल्यादेवींच्या घाट स्थापत्यशास्त्राचे आदर्श नमुने आहेत.
तत्कालीन कालखंडात जे विद्वान, शाहीर, पंडित कवी होते, त्यांच्या ज्ञानाला वाव मिळावा, त्यांच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा, समाजामध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून बुद्धिजीवी वर्गाला अहिल्यादेवींनी इनामे दिली होती. यामध्ये शाहीर अनंत फंदी, कवी मोरोपंत, ‘अहिल्याकामधेनू’ हा संस्कृत ग्रंथ लिहिणारे खुशालीराम, यांचा उल्लेख करता येईल. अशाप्रकारे ज्ञानाबद्दल उदात्त दृष्टिकोन त्यांनी दाखविला होता. 18व्या शतकातील अनेक प्रथा-परंपरा मोडीत काढून विविध क्षेत्रांत त्यांनी सामाजिक कार्ये प्रत्यक्ष कृतीतून करून दाखविली.
प्राचीन कालखंडापासून धर्माला राज्यसंस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. धर्म हा केवळ महत्त्वाचा घटक नसून, तो नियंत्रक होता. धर्म दोन प्रकारच्या भूमिका बजावितात, एक भूमिका माणसांना जगण्याचे प्रयोजन शिकविणारी, जीवनसंघर्षात हतबल झालेल्या दु:ख आणि दारिद्य्राने पिचून गेलेल्या, अविश्रांत श्रमांनी थकलेल्या उदास एकाकी आणि भयग्रस्त बनलेल्या माणसांचे सांत्वन करणे, ही धर्माची महत्त्वाची भूमिका आहे. धर्माची दुसरी भूमिका ही राजकीय तत्वप्रणालीची जागा घेण्याची आहे. मुस्लीम राजवटीत हिंदूंच्या मनावर फार मोठ्या प्रमाणात आघात झाले होते. आक्रांतांनी हिंदूंची धार्मिक स्थाने, मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांची तोडफोड केली होती, या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून तत्कालीन समाज मोठ्या प्रमाणात धार्मिकतेकडे वळला होता. छ. शिवाजी महाराजांपासून मराठा कालखंडात अनेक मंदिरे बांधली होती. 18व्या शतकात छ. शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव, चिमाजी अप्पा, नानासाहेब पेशवे, नाना फडणीस यांनी अनेक मंदिरे बांधली. यांच्या प्रेरणेने अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण भारतभर मंदिरे बांधली. मंदिरे बांधण्यामागील उद्देश असा की, मंदिरातून लोकांचे प्रबोधन होत, कथा, कीर्तन, भजन, प्रवचन धार्मिक ग्रंथाचे पारायण, धर्मसभा, संस्कृत पाठशाळा, चर्चा यामुळे ही मंदिरे पुढे सार्वजनिक संस्कार केंद्रे बनली होती. तत्कालीन कालखंडात सार्वजनिक कार्यक्रमांना दुसर्या सोयी नव्हत्या. त्यामुळे सामान्य, गरीब लोकांची त्यातून सोय होत असे.
अहिल्यादेवींनी बांधलेल्या मंदिरामुळे नृत्य, गायन, वादन, शिल्पकला, वास्तुकला, चित्रकला, मूर्तीकला अशा कला सादर करणार्या कलाकारांच्या कलेला या मंदिर बांधणीतून वाव मिळाला. कारागिरांना काम मिळाले. मुस्लीम आक्रमणाला बळी पडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. तत्कालीन कालखंडात मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावितात. मंदिरे हे केवळ देवांचे निवासस्थान न होता, समाजातील व्यक्ती, घटना या त्याच्याशी निगडित असत. मंदिर बांधणीतून अनेक तीर्थक्षेत्रे निर्माण झाली व तीर्थक्षेत्रांमुळे अनेक शहरांचा विकास झाला. तेथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरू लागल्या, यातूनच व्यापार, पर्यटन इत्यादी क्षेत्रे विकसित झाली आहेत. त्यातून अनेक लोकांना रोजगार मिळाला. ज्याठिकाणी यात्रा भरते तेथे लोक जात, धर्म विसरून एकत्र येऊ लागले. त्यातून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागली.
अहिल्यादेवींवर गो. स. सरदेसाई यांनी आरोप केला की, अहिल्याबाईंनी धार्मिक दानधर्मात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला व सैन्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, शोधाअंती असे दिसून आले की, 18व्या शतकात एकमेव त्यांच्या राज्यातील जनताच शांततापूर्ण व सुरक्षित जीवन जगत होती. त्यांच्या 30 वर्षांच्या कालखंडात त्यांनी जो पैसा धार्मिक लोककल्याणात खर्च केला, तो पैसा सार्वजनिक नव्हता. त्यांची ती खासगी दौलत होती. त्यातून तो पैसा त्यांनी खर्च केला होता. जर सैन्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला असता, तर 30 वर्षे त्यांच्या कालखंडात जनता कदाचित शांततेने राहिली नसती. कारण, सातत्याने राज्यात युद्धाचे प्रसंग उद्भवले असते. त्यांनी धार्मिक कार्य करताना सर्व धर्मीयांना समतेची वागणूक दिली. त्यांनी जे धार्मिक लोककल्याणकारी कार्य केले, ते सर्वसामान्य व गरीब लोकांच्या सोयी सुविधांसाठी केले. याबाबत इंग्रज सेनानी सर जॉन माल्कम म्हणतात, “प्रजाप्रेमाच्या बळावर दवनी राज्य करणे हे उत्तम राज्यकर्त्याचे लक्षण.” ते अहिल्यादेवींनी आचरणात चांगले दिसते. बुद्धीची कुशाग्रता, नीतीचे आचरण या गुणांमुळे अहिल्याबाई प्रजेच्या प्रशंसेस पात्र झाल्या. अहिल्याबाईंवरील आरोपाचे खंडन एम. डब्ल्यू. बर्वे यांनी लिहिलेल्या अहिल्यादेवी होळकर या जीवनचरित्रात खुलासेवार केले आहे.)
निष्कर्ष
अहिल्यादेवींच्या राज्यकारभारविषयक लिहिलेल्या विविध पुस्तकांतून त्यांच्या नेतृत्वगुणात त्यांच्या स्वभावातील गांभीर्य, राजकारणातील मुत्सद्दीपणा, मनाची थोरवी, कर्तव्यदक्षता, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य इत्यादी गुण दिसून येतात.
मल्हारराव होळकरांनी अत्यंत संघर्षातून माळवा प्रांतात मराठा साम्राज्य वाढविले. मुलगा खंडेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींच्या असणार्या राजकीय नेतृत्वगुणांमुळे सर्व राज्यकारभार अहिल्यादेवींच्या हाती सोपविला.
अहिल्यादेवींच्या राज्यातील प्रशासन व्यवस्था पारदर्शक होती म्हणून त्या विश्वासाने म्हणत की, “राज्यकारभारात पैशांच्या हिशोबात एक कवड़ी माझ्याकडे निघाली, तर त्या व्यक्तीस पाच कवड्या देईन,” अशा प्रकारे आजच्या प्रशासनव्यवस्थेला हा अहिल्यादेवींचा विचार आदर्श आहे. राज्यकारभारविषयक आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणतात, “ईश्वराने सोपविलेली जबाबदारी मला पार पाडायची आहे. प्रजेला सुखी करणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्या प्रत्येक कामाची जबाबदारी माझ्यावरच आहे. सामर्थ्य आणि सत्ता यांच्या बळावर मी जे करत आहे, त्याचा जाब मला परमेश्वराच्या दरबारात द्यावा लागणार आहे.”
अहिल्यादेवींनी सामाजिक प्रश्नांचे सर्व बाजूंनी चिंतन केले. आपली सर्व संपत्ती दुर्बळ जनता, उपेक्षित स्त्रिया, शेतकरी यांच्यासाठी खर्च केली व त्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले. सामान्य माणसाचे संरक्षण केले. स्त्री व पुरुष यांच्यामध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला व समतेवर आधारित समाज उभा राहावा, यासाठी प्रयत्न केला. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र ग्रंथात ‘प्रजेच्या सुखात आणि हितामध्ये राजाचे सुख आणि हित सामावले आहे,’ असे म्हटले आहे. अॅरिस्टॉटलच्या मते, “मनुष्याचे जीवन सुखी करण्यासाठी राज्याची निर्मिती केली आहे. यातूनच राज्याचे कल्याणकारी स्वरुप स्पष्ट होते. या तत्वाप्रमाणे अहिल्यादेवींनी आपल्या हाती असणार्या सत्तेचा उपयोग राज्यातील जनतेच्या लोककल्याणासाठी केला. समाजकल्याण हे साध्य व राजकारण हे साधन मानले. आजच्या लोकशाही व्यवस्थेत काही राज्यकर्ते सत्तेचा वापर व्यक्तिगत स्वार्थ, नातेवाईक, जातीधर्म यासाठी करताना दिसतात व जनतेच्या कामांना दुय्यम स्थान देतात. पण, अहिल्याबाईंच्या कार्यातून हे लक्षात घ्यायला हवे की, कोणत्याही समृद्ध देशाचा इतिहास हा त्या देशातील सुशासन, जनकल्याण, शेती, उद्योगातूनच आकारास येत असतो.
सुनील मतकर