जन्मकथा बौद्ध लेण्यांच्या उदयाची...

    22-May-2024
Total Views | 75
Buddhist caves


आज बुद्धपौर्णिमा. समस्त विश्वाला अहिंसा, शांती आणि समतेचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्ध यांची जयंती. भगवान बुद्ध यांचे ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ हे तत्त्वज्ञान सर्वांना माहीत आहे. आपण सर्वजण जाणतोच की, भारताला जशी तत्त्वज्ञानाची प्राचीन संस्कृती आहे, तशीच स्थापत्यकलेचाही ऐतिहासिक वारसा आहे. भारतातील स्थापत्यकला म्हटले की, लेण्यांचा संदर्भ आल्याशिवाय राहत नाही. भारतातील सर्वाधिक लेण्या या बौद्धलेण्या आहेत. विविध परंपरा असणार्‍या समृद्ध भारत देशात सर्वाधिक बौद्ध लेण्या का आढळतात, त्यामागील इतिहास काय आहे, हे आज बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
 
भारतात आढळणारी सर्वात प्राचीन मानवनिर्मित लेणी ही मौर्यकाळातील. बिहारमधील बोधगया येथील ‘बाराबर’ व ‘नागार्जुन’ या दोन पर्वतरांगांमध्ये या लेण्या आहेत. विशेष म्हणजे, या लेण्या तत्कालीन ‘आजीविक’ नावाच्या पंथाच्या आहेत. या पंथाचा विश्वास ‘दैववादावर’ होता. या लेणी समूहाच्या परिसरात मौर्य सम्राट अशोक व त्याचा नातू दशरथ यांनी या लेण्यांच्या खोदकामासाठी देणगी दिल्याची माहिती सांगणारा ब्राह्मी लिपीतील अभिलेखही उपलब्ध आहे. यामुळेच या लेण्यांचा काळ हा इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकापर्यंतचा आहे.
 
भारतातील बौद्ध लेण्या
 
भारतात जवळपास एक हजार मानवनिर्मित लेण्या आहेत. त्यातील ८० टक्के लेण्या या बौद्ध धर्माच्या आहेत, तर उरलेल्या २० टक्के लेण्या या हिंदू व जैन धर्मांतील आहेत. त्यामुळे भारताच्या इतिहासात सर्वात जास्त लेण्या या बौद्ध तत्त्वज्ञानाशी संलग्न असल्याचे आढळते. बहुतांश बौद्ध लेणीसमूह हे पश्चिम भारतात आहेत. विशेष म्हणजे, आज भारतात उपलब्ध बौद्ध लेण्यांपैकी ९० टक्के लेण्या या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात असलेल्या बौद्ध लेण्या इसवी सन पूर्व दुसर्‍या ते इसवी सन तेरावे शतक इतक्या प्रदीर्घ काळात खोदल्या गेल्या होत्या. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रात प्रदीर्घ काळासाठी बौद्ध धर्माचे आधिपत्य होते, हे लक्षात येते. या भागात आढळणार्‍या बौद्ध लेणी समूहात हीनयान, महायान, वज्रयान या तीन बौद्ध पंथांतील लेण्या आहेत.
 
भारतात मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या का सापडतात?

भगवान गौतम बुद्ध यांच्या काळाविषयी अनेक वाद आहेत. तरीही विद्वानांच्या मते, इसवी सन पूर्व सहाव्या शतकात गौतम बुद्ध यांचा जन्म झाला आणि साधारण याच काळात त्यांनी बौद्ध धर्माचा पाया रचला. सोप्या वा साध्या भाषेत सर्वसामान्य जनतेला समजेल, अशी बौद्ध धर्माची शिकवण दिली. त्यांच्या या शिकवणीने प्रभावित होऊन तत्कालीन समाजातील व्यापारीवर्गाने मोठ्या प्रमाणात या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला होता. इतकेच नव्हे तर हे व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने जेथे गेले, तेथे बौद्ध धर्माची शिकवण आपल्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे बहुतांश लेण्या या व्यापारी मार्गावर आढळतात. केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेर बौद्ध धर्माच्या प्रसाराचे काम याच बौद्ध तत्त्वज्ञान आत्मसात करणार्‍या व्यापारीवर्गाने केले आहे. तत्कालीन समाजातील स्त्रिया या बौद्ध तत्त्वज्ञान अनुसरण्यात अग्रेसर होत्या, हे बौद्ध लेण्यांमध्ये आढळणार्‍या अभिलेखीय पुराव्यांमुळे सिद्ध झालेले आहे. तसेच आपल्या सांसारिक जगाचा त्याग करून बौद्ध दीक्षा घेऊन प्रवेश करणार्‍या बौद्ध भिक्षूंनी केलेल्या प्रसारामुळेच जगाच्या कानाकोपर्‍यांत बौद्ध धर्माची शिकवण पोहोचल्याचे दिसते. त्याचीच परिणती म्हणून भारतात आज मोठ्या संख्येने बौद्ध लेण्या अस्तित्वात आहेत.
 
व्यापार्‍यांची बौद्ध लेण्यांच्या विकासातील भूमिका
 
बौद्ध धर्माच्या नियमानुसार, बौद्ध भिक्षूंना एका ठिकाणी अधिक काळासाठी राहण्याची परवानगी नव्हती. एकाच ठिकाणी जास्त काळ राहिल्यास त्या जागेशी आपली भावनिक बांधिलकी निर्माण होते. बौद्ध भिक्षू त्याच भावनिक जगाचा त्याग करून निर्वाण मिळविण्याकरिता बौद्ध धर्मात आलेले असतात. त्यामुळे हीच भावनिक गुंतागुंत आणि मोह टाळण्यासाठी त्यांना काही नियम पाळावे लागत होते. त्याच नियमांनुसार बौद्ध भिक्षूंना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी एक ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सतत प्रवास करणे अनिवार्य होते. ज्यावेळेस हे बौद्ध भिक्षू महाराष्ट्रात (पश्चिम भारतात) आले, त्यावेळेस त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते आणि याला ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. महाराष्ट्र हा जास्त पावसाचा प्रदेश आहे आणि होता. त्यामुळे या भागात पावसाच्या काळात सतत प्रवास करणे, हे अशक्य होते. त्यामुळे यात गरजेतून बौद्ध धर्मात ‘वर्षावास’ ही संकल्पना मांडण्यात आली.
 
‘वर्षावास’ म्हणजे पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये राहण्याची केलेली तात्पुरती व्यवस्था. पावसाळ्याच्या सहा महिन्यांपैकी पहिले तीन महिने किंवा शेवटचे तीन महिने बौद्ध भिक्षूंना एक ठिकाणी राहण्याची परवानगी होती. या तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या वास्तूला ‘वर्षावास’ असे म्हटले जाते. याच वास्तूच्या निर्मितीतून बौद्ध भिक्षूंसाठी लेण्या खोदण्याची संकल्पना अस्तित्त्वात आली होती. किंबहुना, बौद्ध लेण्यांमधील शिलालेखांमध्ये ‘वर्षावास’ या संकल्पनेचा उल्लेख सापडतो, हे विशेष. प्रारंभीच्या काळात या वास्तूंच्या निर्मितीत बांबू, विटा यांचा वापर करण्यात आला होता. परंतु, बौद्ध भिक्षू हे राहण्यासाठी गावाच्या बाहेर जागा निवडत असत. महाराष्ट्राच्या बाबतीत ही जागा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होती आणि हाच मार्ग तत्कालीन व्यापारी व्यापारासाठी वापरात होते. त्यावेळी आजच्यासारखे रस्ते नव्हते. त्यामुळे दर्‍याखोर्‍यांतून, घनदाट अरण्यांतून बौद्ध भिक्षू व व्यापारी यांना प्रवास करावा लागत होता. या प्रवासात व्यापारी रात्रीच्या वेळेस बौद्ध संघात आश्रय घेत असत. याच गरजेतून या व्यापार्‍यांनी बौद्ध संघाला देणगी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे व्यापार्‍यांना वा त्यांच्या व्यापारी मालाला जंगली श्वापदं, दरोडेखोर यांच्यापासून संरक्षण लाभले. म्हणूनच, व्यापारी व भिक्षू यांच्या संयुक्तिक कार्यकुशलतेतून मोठ्या प्रमाणात लेण्यांची निर्मिती झाली.
 
बौद्ध स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये
 
बौद्ध धर्मात ‘हीनयान’, ‘महायान’ व ‘वज्रयान’ हे तीन प्रमुख पंथ आहेत. या तीन पंथांंंचा विकास हा काळाच्या विविध टप्प्यांमध्ये झाला आहे. त्यामुळे साहजिकच अनेक स्थानिक, परकीय गोष्टी, घटना, प्रथा, परंपरा यांचा परिणाम या धर्मावर झालेला आहे आणि त्यातूनच ‘महायान’, ‘वज्रयान’ या पंथात मूळ बौद्ध तत्त्वज्ञानापेक्षा वेगळेपण जाणवते. तेच वेगळेपण आपल्याला बौद्ध लेणी स्थापत्यातही दिसून येते.मूळ बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये मूर्तिपूजेला प्राधान्य देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्या तत्त्वज्ञानाला अनुसरून निर्माण झालेल्या लेण्यांमध्ये आपल्याला कुठेही बुद्ध मूर्ती आढळत नाहीत. इतकेच नव्हे, तर कुठल्याही प्रकारचे अतिशयोक्त अलंकरण शिल्पस्वरूपात या लेण्यांमध्ये दिसून येत नाही. मात्र, नंतर आलेला ‘महायान’ हा पंथ मूर्तिपूजा मानणारा असल्याने यांच्या काळात घडवल्या गेलेल्या लेण्यांमध्ये बुद्ध, बोधिसत्त्व यांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. ‘वज्रयान’ हा पंथ आधीच्या दोन्ही पंथांपेक्षा बर्‍याचअंशी वेगळा असल्याने त्यांच्या धारणेनुसार अघोरी स्त्री देवता आपल्याला त्यांच्या लेण्यांमध्ये दिसतात. बौद्ध लेण्यांच्या स्थापत्यात विविधता आढळून येत असली, तरी या लेण्या बौद्ध धर्माचा गेल्या हजारो वर्षांचा इतिहास सांगतात. त्यामुळे या बौद्ध लेण्यांचे संवर्धन होणे, आवश्यक आहे.आपण नेहमी विविध लेण्यांना भेट देतो, छायाचित्रं काढतो आणि पोस्ट करतो. पण, आपल्या देशामध्ये या लेण्या का निर्माण झाल्या, त्याचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 
 
वसुमती करंदीकर

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121