भारत-फिलीपाईन्स तंत्रसहकार्याचे पर्व

    06-Mar-2024
Total Views | 82
 India-Philippine Tech Summit

विस्तारवादी चीनला रोखण्यासाठी, भारत फिलीपाईन्ससोबतच्या धोरणात्मक भागीदारीला बळ देत आहे. चीनच्या अरेरावीला का रे, असा उत्तर देणारा भारत आणि फिलीपाईन्स हे देश एकत्र येणे म्हणूनच गरजेचे. भारताने फिलीपाईन्सला ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे देत प्रदेशात योग्य तो संदेश दिला. म्हणूनच या दोन्ही देशांची तांत्रिक आणि डिजिटल भागीदारी महत्त्वाची...
 
डिजिटल सहकार्य आणि भागीदारीला चालना देण्यासाठी ‘भारत-फिलीपाईन्स टेक शिखर परिषद’ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. फिलीपाईन्समधील भारतीय दूतावासाने फिलीपाईन्ससोबत तांत्रिक आणि डिजिटल भागीदारी वाढविण्याच्या उद्देशाने पहिल्या भारत-फिलीपाईन्स टेक समिटचे उद्घाटन केले. मनिला येथील शिखर परिषदेमध्ये बोलताना भारताचे राजदूत शंभू कुमारन यांनी विकसनशील राष्ट्रांमध्ये, विशेषत: सुरक्षा क्षेत्रांतील संबंध आणि अर्थव्यवस्थेत सहकार्य विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या क्रांतिकारी प्रभावावर भाष्य करताना, कुमारन यांनी भागीदारीच्या गरजेवर भर दिला. ‘एआय’च्या अर्थातच ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या आगमनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी बदल होणार असून, त्यासाठीच या क्षेत्रात भागीदारीची गरज आहे. ही शिखर परिषद त्याची सुरुवात म्हणावी लागेल.भारतीय उद्योजक आणि डिजिटल क्षेत्रातील त्यांच्या यशोगाथा फिलीपाईन्समध्ये आणण्यासाठी, हा कार्यक्रम एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे, ज्यामुळे फिलीपाईन्सला भारतासोबत काम करण्यापूर्वी भारताला समजून घेणे सोपे पडते. फिलीपाईन्समधील भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील वैविध्यपूर्ण कौशल्याचे दर्शन घडविणार्‍या कृषी, आरोग्य सेवा आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोद्योगांसह भारतीय ‘युनिकॉर्न’ म्हणजेच खासगी मालकीच्या नवोद्यागांचा समावेश या परिषदेत करण्यात आला. खासगी क्षेत्राशी भागीदारी कायम ठेवण्याच्या, फिलीपाईन्स सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी त्यांच्या संबंधित मंत्रालयाने केली आहे. ‘सायबर सिक्युरिटी’ आणि ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’शी संबंधित करारांवर उभय देश वाटाघाटी करत आहेत.

याचा उद्देश दोन्ही देशांमधील तांत्रिक आणि डिजिटल भागीदारी मजबूत करणे हा आहे. भारत आणि फिलीपाईन्स यांच्यातील आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट या शिखर परिषदेने ठेवले आहे. हा कार्यक्रम भारतीय उद्योजक आणि नवोद्योगांसाठी, विशेषत: ‘युनिकॉर्न्स’साठी, कृषी, आरोग्यसेवा आणि फिनटेक यांसारख्या क्षेत्रात त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी, एक व्यासपीठ म्हणूनही परिषद काम करेल. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मधील प्रगतीसह विकसित होत असलेल्या डिजिटल लॅण्डस्केपवर काम करण्यासाठी, विशेषतः विकसनशील राष्ट्रांमधील भागीदारीच्या महत्त्वावर यात भर देण्यात आला आहे. कृषी, आरोग्य सेवा, फिनटेक, फिलीपाईन्स सरकारी संस्था, व्यवसाय, गुंतवणूकदार अशांनी यात सहभाग घेतला. संरक्षण, सागरी सुरक्षा आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करणारा फिलीपाईन्स आग्नेय आशियात भारतासाठी महत्त्वपूर्ण भागीदार बनला आहे.

शिखर परिषदेमुळे भारत आणि फिलीपाईन्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक आणि व्यापार वाढू शकतो. भारतीय आणि फिलीपिनो टेक कंपन्यांमधील सहकार्यामुळे दोन्ही बाजारांसाठी नावीन्यपूर्ण उपायांचा विकास करता येईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या अनुभवाचा फिलीपाईन्सला फायदा होऊ शकतो. ज्यामुळे नवी क्षमता निर्माण होण्याबरोबरच ज्ञानही हस्तांतरण होईल. एकंदरीत ‘भारत-फिलीपाईन्स टेक समिट’ हे दोन्ही देशांमधील डिजिटल संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. ज्ञानाची देवाणघेवाण, सहयोग आणि भागीदारी उभारणीवर शिखर परिषदेने लक्ष केंद्रित केले होते.तसेच भारत-फिलीपाईन्स द्विपक्षीय व्यापार सुमारे 1.74 अब्ज डॉलर इतका आहे. मात्र, तुलनेने तो नगण्य आहे. भारताची फिलीपाईन्सला निर्यात आयातीपेक्षा खूप जास्त असून, त्यामुळे व्यापार असमतोल निर्माण होतो. भारत-आसियान मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि आसियान सदस्यांमधील व्यापाराला चालना मिळाली आहे. ज्यात फिलीपाईन्सचा अर्थातच समावेश आहे. फिनटेक आणि सीमाशुल्क बाबींमधील सहकार्यावरील अलीकडील करारांचे उद्दिष्ट उभय देशांमधील व्यापार प्रक्रिया सुलभ करणे हा आहे. मशिनरी, फार्मास्युटिकल्स्, रसायने आणि ऑटोमोटिव्ह भाग ही भारतातून होणारी प्रमुख निर्यात आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादने, फळे आणि सागरी उत्पादने फिलीपाईन्स भारताला निर्यात करते. भारत-फिलीपाईन्स यांच्यात व्यापार वाढीसाठी अधिक संधी उपलब्ध आहेत.

संरक्षण भागीदारीबाबत सांगायचे तर, 2022 मध्ये फिलीपाईन्सने भारताकडून ‘ब्राह्मोस’ सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी करार केला. 374.9 दशलक्ष डॉलर मूल्याचा हा करार भारतासाठी आजपर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण निर्यात करार आहे. ‘तेजस’ लढाऊ विमाने आणि ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरसारख्या इतर भारतीय संरक्षण उपकरणांच्या संभाव्य विक्रीबाबत दोन्ही देशांत चर्चा होत आहे. दोन्ही देशांदरम्यान नौदल कवायती होत असून, लष्करी सराव वाढत्या प्रमाणात होत आहे. भारत आणि फिलीपाईन्स या दोन्ही देशांनी दक्षिण चीन समुद्रात विस्तारवादी चीनच्या आक्रमक भूमिकेविरोधात चिंता व्यक्त केली आहे. तसेच चीनला रोखण्याची गरज अधोरेखित केली आहे. सुरक्षा सहकार्य हा उभय देशांमधील समान दुवा आहे. भारताने म्हणूनच फिलीपाईन्सला ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे देत, प्रदेशात मजबूत संदेश दिला आहे.फिलीपाईन्सची संरक्षणासाठी तरतूद तुलनेने कमी असली, तरी भारतासाठी तो शस्त्रसज्ज असणे, हे गरजेचे आहे. म्हणूनच भारत त्याला बळ देत आहे. चीनला रोखण्यासाठी भारताचा प्रदेशातील तो महत्त्वाचा भागीदार आहे. उभय देशांतील वाढणारे करारमदार, संरक्षण तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील देवाणघेवाण हे म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. सागरी क्षेत्रात ते विशेषत्वाने महत्त्वाचे आहेत.
 
फिलीपाईन्स आणि भारतामध्ये विकसित होत असलेले धोरणात्मक संबंध, प्रदेशातील चीनच्या विस्ताराला रोखण्यासाठीचे एक प्रभावी पाऊल आहे. दक्षिण चीन समुद्रात फिलीपाईन्स आणि भारत या दोन्ही देशांचा चीनशी प्रादेशिक वाद आहे. फिलीपाईन्स चीनच्या विस्तृत दाव्यांना विरोध करतो, तर चीन सीमेवर भारताची आगळीक काढतो. चीन हा उभय देशात धोरणात्मक सहकार्याचा पाया घालणारा ठरला आहे. दोन्ही देशांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या विस्तारवादी कृतींनी आव्हान दिले आहे. चीनची वाढती शक्ती आणि प्रभाव यांचा समतोल राखण्यासाठी हितसंबंध आवश्यक असेच आहेत.भारताकडून फिलीपाईन्सला ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांची करण्यात आलेली विक्री तसेच वाढते संयुक्त लष्करी सराव हे वाढत्या संरक्षण भागीदारीचे संकेत आहेत. भारत-आसियान मुक्त व्यापार करार आणि ‘भारत-फिलीपाईन्स टेक समिट’ सारख्या उपक्रमांचा उद्देश आर्थिक संबंधांना चालना देणे, संभाव्यत: चीनवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. दोन्ही देश क्वाड (भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया) सारख्या प्रादेशिक गटांमध्ये भाग घेतात. जे इंडो-पॅसिफिकमध्ये नियम आधारित रचनेला प्रोत्साहन देतात. फिलीपाईन्स आणि भारताच्या धोरणात्मक संबंधांमध्ये या प्रदेशातील चीनच्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. तथापि, या भागीदारीची परिणामकारकता त्याच्या मर्यादांचे व्यवस्थापन आणि आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याचा मजबूत पाया तयार करण्यावर अवलंबून आहे, असे म्हणता येईल.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121