छत्रपती संभाजीनगर : येत्या सोमवारी राजकीय भूकंप होणार, असं वक्तव्यं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषेद केलं होतं. त्यानंतर शनिवारी उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे नाराज असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. यावर आता शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, "येत्या सोमवारी राजकीय भूकंप होणार, या माझ्या विधानाचा अर्थ केवळ छत्रपती संभाजीनगरपुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत ज्यांचा त्यांच्या पक्षात कोंडमारा होत असून ते आमच्याकडे येणार आहेत. सोमवारी याबद्दलचा फैसला होणार आहे. परंतू, मी बोलल्यामुळे उबाठा गटात भांडणं होऊ लागले आहेत. पण त्यांनी माझ्या गोष्टीला सिरियस घेऊ नये. त्यांच्यात असलेले अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला देऊ नये हा उबाठा गटाचा प्रश्न आहे. पण त्यांच्यातल्या वादाचा आणि माझ्या वक्तव्याचा काहीही संबंध नाही."
ते पुढे म्हणाले की, "ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला असून काही दिवसांत ही माहिती सर्वांपुढे येणार आहे. पण आज यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, उबाठा गटात मोठ्या प्रमाणात धगधग वाढली आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत कोण राहतील हे ते स्वत:सुद्धा सांगू शकणार नाहीत," असेही ते म्हणाले.