६ दिवसात ७०० हून अधिक तक्रारी, संदेशखाली प्रकरणात जनआक्रोश!
24-Feb-2024
Total Views | 235
नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारने सर्वप्रथम पश्चिम बंगालमधील संदेशखालीतून उठलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र आता भाजपच्या संघर्षामुळे ते बॅकफूटवर आले आहेत. भाजपने ज्या पद्धतीने हा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पीडितांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळेच आता स्थानिक लोक टीएमसी नेत्याविरोधात तक्रार करण्यासाठी जमले आहेत. ६ दिवसात ७०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
बहुतांश तक्रारी जमिनी ताब्यात घेण्याच्या आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संदेशखाली येथील टीएमसी नेते शेख शाहजहान शेख, उत्तम सरकार आणि शिबू हाजरा यांच्यावर लैंगिक शोषण आणि जमीन बळकावण्याचे आरोप झाल्यानंतर सरकार आता बॅकफूटवर गेले आहे. डॅमेज कंट्रोलसाठी संदेशखाली येथे अधिकारी नेमून सर्व तक्रारी ऐकून घेण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी सरकारने ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) तैनात केले आहेत. येथे संदेशखालीतील बाधितांना त्यांच्या जमिनी बळकावणे, खंडणी वसूल करणे, मजुरी न मिळणे अशा समस्या येत आहेत. गेल्या ६ दिवसांत ७०० हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५० तक्रारी जमीन बळकावण्याशी संबंधित असून ७० तक्रारी खंडणीशी संबंधित आहेत.
आपली प्रतिमा टिकवण्यासाठी ममता सरकार संदेशखालीतील ताब्यात घेतलेली जमीन लोकांना परत करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. मात्र, हे काम खूपच कठीण आहे, कारण भूधारकांनी या जमिनी सुपीक केल्या आहेत. अशा स्थितीत ग्रामस्थ चिंतेत आहेत. ग्रामस्थांचा आरोप आहे की, त्यांची जमीन ताब्यात घेण्यात आली आणि ज्यांना भाडेपट्ट्याचे आश्वासन दिले होते त्यांना टीएमसी नेत्यांनी कोणतेही पैसे दिले नाहीत.दरम्यान संदेशखाली प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये स्थानिक लोकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. दि.२३ फेब्रुवारी रोजी स्थानिकांनी तृणमूल काँग्रेस नेता आणि या प्रकरणातील आरोपी शाहजहान शेख याचा भाऊ सिराज शेख यांची मालमत्ता जाळली. बेरामजदूर येथील कचारी भागात शाहजहान शेखच्या भावाच्या या मालमत्तेला आग लावण्यात आली. यापूर्वी दि.२२ फेब्रुवारीदेखील सिराज शेख याच्या मालमत्तेला आग लावण्यात आली होती.