महामार्गावर ये-जा करण्यासाठी खारेगाववासीयांना तात्पुरता रस्ता
कपिल पाटील यांच्या पाहणीनंतर महामार्ग प्राधिकरणाची मंजुरी
31-Dec-2024
Total Views | 32
ठाणे : ठाणे-भिवंडी महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे खारेगाववासीयांना महामार्गावर ये-जा करण्यासाठीचा रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील ( Kapil Patil ) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केल्यानंतर, खारेगाववासीयांसाठी तात्पुरत्या स्वरुपात रस्ता तयार करण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे.
ठाणे-भिवंडी दरम्यान नागरिकांचा प्रवास हा वेगाने व्हावा, यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे माजीवडा-वडपे दरम्यान प्रशस्त आठ पदरी महामार्ग उभारण्यात येत आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे खारेगाव येथील अंडरपासची रुंदीही वाढविली जात आहे. त्यामुळे महामार्गावरून खारेगाव गावात व स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्राटदार आणि ग्रामस्थांच्या प्रतिनिधींसोबत कपिल पाटील यांनी पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यामध्ये अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
खारेगावमधील नागरिकांच्या सोयीसाठी अंडरपासची लांबी वाढविण्यात येणार आहे. मात्र या कामामुळे सध्या अंडरपास बंद आहे. तो तात्पुरता खुला करण्याबरोबरच रस्त्याच्या संरक्षक भिंतीपुढील जागेतून तात्पुरता रस्ता बनविण्याची सूचना माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यावेळी लवकरच तात्पुरत्या स्वरुपातील रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. या ठिकाणी महापालिकेची पाईपलाईन गेली आहे. तिच्या स्थलांतर करण्यासाठी महापालिकेलाही विनंती करण्यात आली आहे.