नवी दिल्ली : “माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी एडविना माऊंटबॅटन आणि अन्य व्यक्तींना लिहिलेली पत्रे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ताब्यात आहेत. ती पत्रे परत करण्यात यावीत,” असे पत्र पंतप्रधान संग्रहालयाने ( PM Museum ) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लिहिले आहे.
पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सोसायटीचे सदस्य रिझवान कादरी यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची पत्रे परत करण्यास सांगितले आहे. ही ऐतिहासिक महत्त्वाची कागदपत्रे आहेत आणि ती संग्रहालयात असणे, असे ‘पीएमएमएल’चे मत आहे. ही पत्रे ‘जवाहरलाल नेहरू मेमोरिअल’ने १९७१ मध्ये ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अॅण्ड लायब्ररी’ला (आताचे पीएमएमएल) दिली होती. काँग्रेसप्रणित संपुआच्या काळात २००८ मध्ये ५१ खोक्यांमध्ये असलेली केलेली नेहरूंची वैयक्तिक पत्रे सोनिया गांधींना देण्यात आली होती. नेहरूंनी ही पत्रे एडविना माऊंटबॅटन, अल्बर्ट आईनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजया लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद बल्लभ पंत इत्यादींना लिहिली होती.
‘पीएमएमएल’ सदस्य रिझवान कादरी यांनी दि. १० डिसेंबर रोजी राहुल गांधी यांना पत्र लिहून ही पत्रे परत करण्यास सांगितले होते. याआधी सप्टेंबरमध्ये सोनिया गांधी यांनाही पत्र लिहिले होते. आता राहुल गांधींना सोनिया गांधींकडून मूळ पत्रे किंवा त्याची छायाप्रत किंवा डिजिटल प्रत देण्यात यावी, असे कादरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
भाजपतर्फे हा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला. भाजप खा. संबित पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधून या प्रकरणामागील काँग्रेसच्या हेतूवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी ही पत्रे देशाला परत करण्यासाठी सोनिया गांधींशी बोलतील का, हा प्रश्न आहे. नेहरूंनी एडविना माऊंटबॅटन यांना काय लिहिले, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. २०१० मध्ये ही सर्व कागदपत्रे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय झाला, तेव्हा सोनिया गांधींनी ही पत्रे डिजिटल होण्यापूर्वीच का घेतली, या पत्रांमध्ये असे काय होते, जे गांधी परिवार देशाला सांगू इच्छित नाही?” असा सवाल पात्रा यांनी केला आहे.