‘व्होट जिहाद’ला उत्तर ‘व्होट महादेव’ने द्यावे लागेल : डॉ. उदय निरगुडकर
ठाण्यात ‘सजग रहो’ अभियानांतर्गत जाहीर व्याख्यानातून १०० टक्के मतदानाचे आवाहन
08-Nov-2024
Total Views | 23
ठाणे : “लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता व्होट जिहाद... यामागे प्रचंड मोठी विदेशी ताकद आहे. तेव्हा, सकल हिंदू समाजाने एकत्र व्हायला हवे. या ‘व्होट जिहाद’ला उत्तर ‘व्होट महादेव’ने द्यावे लागेल,” असे परखड मत ज्येष्ठ संपादक, राजकीय-सामाजिक विश्लेषक, व्याख्याते, डॉ. उदय निरगुडकर ( Uday Nirgudkar ) यांनी व्यक्त करून या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
ठाण्यातील नौपाडा, घंटाळी येथील सहयोग मंदिर सभागृहात दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ७ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आलेल्या ‘१०० टक्के मतदान’ या व्याख्यानात डॉ. निरगुडकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते, कार्यवाह मकरंद मुळे, कौपीनेश्वर न्यासाचे संजीव ब्रह्मे, तर श्रोत्यांमध्ये ‘टीजेएसबी’चे वैभव सिंगवी, प्रा. नरेंद्र पाठक, प्रा. प्रदीप ढवळ, दिनकर दामले, उत्तमराव जोशी, पुरुषोत्तम आगवण, अरविंद जोशी, अच्युत दामले, दिलीप सुळे, अश्विनी बापट, मातंग समाजाचे दीपक आवारे आदींसह शेकडो सजग नागरिकांची उपस्थिती होती.
प्रारंभी पक्षीय राजकारणापासून वेगळे मात्र, लोकशाहीच्या कर्तव्याचे स्मरण करून देणार्या या व्याख्यानाचे महत्त्व तसेच राज्यस्तरीय ‘शिवप्रेरणा’ उपक्रमांतर्गत ‘सजग रहो’ अभियानाची माहिती मकरंद मुळे यांनी दिली. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ.उदय निरगुडकर यांनी, देशाभिमान राष्ट्राभिमान जागृत करणारी विविध क्षेत्रांतील यशस्वी प्रभूतींची उदाहरणे दिली. तसेच मागील काळातील काही लोकसभा निवडणुकांचा आढावा घेत विजय आणि पराजय हे दोन्ही कसे फसवे असतात, हे पटवून देताना, प्रत्येक निवडणुकीत जे निकाल लागतात, त्याचे संदर्भ आपण तपासून बघण्याची गरज असल्याचे सांगितले.
“१९७७ प्रमाणेच २०१४ साली जे मतदान झाले, ते काँग्रेसला हरवण्यासाठी झाले. भाजपला तेव्हा ३१ टक्के मतदान होऊन २८२ जागा निवडून आल्या होत्या. २०१९ साली भाजपच्या मतदानात सात टक्के वृद्धी होऊन ३०६ जागा म्हणजे फक्त २६ जागा वाढल्या. मात्र, २०२४ ला मतांमध्ये १.३ टक्क्यांनी घट झाली आणि जवळपास ६६ जागांचा फटका बसून भाजपच्या २३९ जागा आल्या. याचा अर्थ २०२४च्या लोकसभा निवडणुकीत फाजील आत्मविश्वास नडला, बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख गाफील आणि निर्धास्त राहिल्याचा फटका बसला. लोकसभेत ठरवून केलेल्या मतदानामुळे विरोधकांचे फावले. त्यांच्या ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि आता ‘व्होट जिहाद’ यामागे प्रचंड मोठी विदेशी ताकद आहे,” हे डॉ. निरगुडकर यांनी अधोरेखित केले.
“भूतकाळात वावरणारा समाज वर्तमानकाळ विसरतो आणि भविष्यकाळ अंधार करून टाकतो. तेव्हा, सावध व्हा. हे दूर करायचं असेल तर, सकल हिंदू समाजाने एकत्र व्हायला हवे. लोकसभेवेळेस पाच मते कमी पडलीत, आता पाचच्या बदल्यात ५० मते द्यायचीत. या ‘व्होट जिहाद’ला उत्तर ‘व्होट महादेव’ने द्यावे लागेल,” असे सांगून प्रत्येकाने आपल्या इमारतीत, आपल्या गल्लीत १०० टक्के मतदान झाले, असे फलक स्वखर्चाने लावण्याचे आवाहन डॉ. निरगुडकर यांनी केले.
या प्रसंगी ‘विकसित महाराष्ट्र आणि एक गठ्ठा मतदान’ या पुस्तकाचे प्रकाशन करून उपस्थित श्रोत्यांना दोन्ही पुस्तके आयोजकांमार्फत मोफत देण्यात आली. संजीव ब्रह्मे यांनी आभारप्रदर्शन केले. व्याख्यानाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.