सोलापूर,दि.८ : प्रतिनिधी जम्मू काश्मीरच्या निवडणूकीमुळे देशात लोकशाही आहे, हे सिद्ध झाले आहे. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर काही लोकं म्हणायचे की, जम्मू काश्मीरमध्ये खून की नदीयां बहेंगी. परंतू, आता तिथे लोकनियूक्त सरकार सत्तेवर येणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांचे निकाल येत आहेत. दरम्यान, यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कलम ३७० हे भाजपने स्वत:च्या फायद्यासाठी रद्द केलेले नाही तर भारताच्या फायद्यासाठी रद्द केले आहे. भाजपने एकसंघ भारत निर्माण केला आहे. आमच्या देशात लोकशाही किती मजबूत आहे हे जम्मू काश्मीरच्या निवडणूकीमुळे सिद्ध झाले आहे. आम्ही लष्कराच्या भरवश्यावर काश्मीर आमच्याकडे ठेवलं आहे, असा पाकिस्तानने केलेला प्रचार खोटा असून तिथे लोकशाही कशी नांदते, हे आम्ही आज दाखवून दिलं. जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक झाली, प्रचंड मतदानही झालं आणि संपूर्ण प्रक्रिया शांतपणे पार पडली आहे. भाजपचा नेता म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे. आम्ही कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर काही लोकं म्हणायचे की, जम्मू काश्मीरमध्ये खून की नदियां बहेंगी. परंतू, आता तिथे लोकनियूक्त सरकार सत्तेवर येणार आहे," असेही ते म्हणाले.