नवी दिल्ली : भारताचे जी२० अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहे, जेथे ग्लोबल साउथचा आवाज ठामपणे उमटतो. त्यामुळे जी२० शिखर परिषदेद्वारे मानवकेंद्रीत आणि सर्वसमावेश विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे दि. ०९ आणि १० सप्टेंबर जी२० शिखर परिषद पार पडणार आहे. ही बैठक जागतिक विकासासाठी महत्त्वाची ठरेल असेल मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, नवी दिल्ली जी२० शिखर परिषद मानव-केंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवीन मार्ग तयार करेल. ‘वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ असे भारताचे धोरण आहे. भारताचे जी२० अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहे. आम्ही ग्लोबल साउथच्या विकासात्मक चिंतांना सक्रियपणे आवाज दिला आहे. त्यामुळे आता मानवकेंद्रीत विकासाचे पर्व सुरू होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
जगातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्व जी२० देश एकत्रित काम करतील, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, लैंगिक समानता, महिला सक्षमीकरण आणि जागतिक शांतता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. आपल्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘वन अर्थ’, ‘वन फॅमिली’ आणि ‘वन फ्युचर’ या सत्रांमध्ये शाश्वत आणि सर्वसमावेशक चर्चा होणे अपेक्षित आहे. शाश्वत भविष्यासाठी हरित विकास कराराच्या प्रगतीला गती देण्याचा आणि एकविसाव्या शतकासाठी बहुपक्षीय संस्थांना बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
विकसनशील देशाच्या आकांक्षांचे प्रतिबिंब घोषणापत्रात असेल – अमिताभ कांत
आजपासून होणाऱ्या जी२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयातर्फे शुक्रवारी पत्रकारपरिषद घेण्यात आली. यावेळी भारताचे जी२० शेर्पा अमिताभ कांत, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ आणि जी२० चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला उपस्थित होते.
अमिताभ कांत म्हणाले की, भारताने विकासाला गती देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे अद्वितीय मॉडेल तयार केले आहे. जी२० शिखर परिषदेचा जाहीरनामा हा जागतिक दक्षिण आणि विकसनशील देशांचा आवाज असेल. देशभरातील ६० शहरांमध्ये २२० हून अधिक बैठका झाल्या, ज्यात भारताची विविधता आणि संघराज्य संरचना प्रतिबिंबित होते. नवी दिल्ली जी२० शिखर परिषदेचा जाहीरनामा जवळपास तयार झाला असून तो जगासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे कांत यांनी यावेळी नमूद केले आहे.
प्रत्येकासोबत काम करण्यास भारताची क्षमता
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग या परिषदेला उपस्थित नसल्याबद्दल अमिताभ कांत म्हणाले की, चीन हा बहुपक्षीय खेळाडू आहे. बहुपक्षीय चर्चेतील मुद्दे द्विपक्षीय मुद्द्यांपेक्षा खूप वेगळे असतात. चिनी लोक त्यांच्या दृष्टीकोनातून वाढ आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करतात. कोणत्याही बहुपक्षीय चर्चेचे आव्हान हे आहे की तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावर सहमती मिळवावी लागेल, प्रत्येक देशाला व्हेटो पॉवर आहे. आम्ही प्रत्येक देशासोबत काम करू शकतो, असेही ते म्हणाले.