मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शासकीय सोयीसुविधा इंटरनेटच्या पध्दतीने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. याचा फायदा देशभरातील कोट्यवधी नागरिकांना सद्यस्थितीत होताना दिसतो आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून राज्य सरकारने नागरिकांसाठी शासकीय योजना एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
सन २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटलीकरण झाले. याच माध्यमातून आतापर्यंत शासनाच्या नवनवीन योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 'महा ई-सेवा' केंद्र राज्यात ठिकठिकाणी उपलब्ध झाली आहेत. यामार्फत शासकीय योजनांचा लाभ राज्यातील सर्वसामान्य जनतेला मिळत आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच सरकारी काम ऑनलाईन झाले असून आणि सर्वसामान्यांची सरकारी जाचातून सुटका झाल्याची भावना त्यांच्या मनात आहे.
'महा डीबीटी' पोर्टल सारख्या सुविधेतून राज्यातील जनतेला सरकारी लाभांश प्राप्त झाला असून योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. फडणवीसांच्या संकल्पनेतून सरकार आणि जनता यांच्यात कुठलाही दुवा न राहता शासन आणि प्रजा यांच्यात थेट संपर्क होईल, असा उद्देश ठेवून सरकारने यामाध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभांश थेट खात्यात जमा होण्यास चालना दिली. यामुळे सरकार दरबारी हेलपाटे मारणे बंद झाले असून एका क्लिकवर शासकीय लाभ जनतेला मिळण्यास सुरुवात झाली.
'ई महाभूमि' तसेच, 'आपले सरकार'सारखे शासकीय वेब पोर्टल त्याचबरोबर 'RTO' ऑनलाईन सर्व्हिस असो यामाध्यमातून डिजिटल काळात राज्य शासनाने शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा सुउपयोग केला आहे. डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी, तसेच, सर्वसामान्य जनतेचा मंत्रालयातल्या फेऱ्या कमी व्हाव्यात यासाठी म्हणून कमी वेळात जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी फडणवीसांच्या नेतृत्वात डिजिटल वेबपोर्टल सुरु झाल्यामुळे जनतेला शासकीय कामे करणे सहज सुलभ झाले आहे.