मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यामार्फत सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार असून ५ सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडले जाणार आहे. दरम्यान, राज्यात ६० हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार असून १५ ऑगस्टपासून पोर्टल सुरू होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान केली होती.
दरम्यान, या भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील अंदाजे २३ हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, राज्यात मागे २०१७मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर टीईटी, टेट होऊनही भरती झाली नाही. विद्यमान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा केली.
त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही सुरु असून नुकत्याच झालेल्या मान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांचाही समावेश यात असणार आहे.