काँग्रेसला घरचा आहेर

    22-Aug-2023
Total Views | 175
Editorial On INC Leader Acharya Pramod Krishnam Statement

ज्या पक्षाने प्रभू राम ही काल्पनिक व्यक्तिरेखा होती, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते, त्या पक्षाला हिंदूद्वेषी म्हणायचे नाही, तर कोणाला म्हणायचे? मुस्लिमांच्या मतांचे लांगूलचालन करण्यासाठी हिंदूंचे सण, दैवते आणि परंपरांवर सदैव गलिच्छ टीका करणार्‍या काँग्रेसचा हिंदूद्वेषी चेहरा आज त्याच पक्षाच्या एका नेत्याने उघड केला आहे.

काँग्रेसचे एक नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस पक्षाच्या हिंदूविरोधी धोरणावर नुकतीच कडाडून टीका केली आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांना हिंदू परंपरा आणि संस्कृतीबद्दल चीड आहे, असे सांगत आचार्य कृष्णम यांनी काँग्रेसचा हिंदूद्वेषी चेहरा उघड केला. आचार्य कृष्णम यांनी समाजमाध्यमांतून काँग्रेसच्या या हिंदूद्वेषी धोरणाची विस्तृत माहिती दिली. किंबहुना, माझ्या कपाळावरील टिळा आणि भगवे कपडे याला काँग्रेसच्याच काही नेत्यांचा तीव्र विरोध असल्यामुळेच माझी केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झाली नाही, असे आचार्य कृष्णम यांनी म्हटले आहे. कृष्णम यांच्या विधानांनी काँग्रेसला घरचा आहेर तर मिळालाच आहे, पण सध्या या पक्षाचे काही नेते विधानसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी जी हिंदुत्त्ववादी वक्तव्ये करीत आहेत, त्यांचे पितळही उघडे पाडले आहे.

आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यासारखी एखादी हिंदू संन्यस्त व्यक्ती ही काँग्रेस पक्षाची सदस्य असेल, यावर अनेकांचा विश्वास बसणे कठीण आहे. पण, कृष्णम यांनी काँग्रेस हा हिंदूविरोधी पक्ष बनल्याची जी टीका केली आहे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, हे स्वातंत्र्यानंतरची काँग्रेसची धोरणे पाहिल्यावर लक्षात येते. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारास तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कडाडून विरोध केला होता. इतका की प्रत्यक्ष राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनाही या मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यास जाण्यास नेहरू यांनी मज्जाव केला होता. अर्थात, राजेंद्र प्रसाद यांनी त्यास कचर्‍याची टोपली दाखविली, हा भाग अलाहिदा. पण, हिंदूंची गळचेपी करणारे अनेक कायदे नेहरू यांच्याच काळात संसदेत संमत करण्यात आले. हिंदू कोड बिल हे त्याचे आणखी एक उदाहरण. मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजाला त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधून त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यास मुभा देण्यात आली. पण, हिंदूंना त्यांच्या धर्माची शिकवण देण्यास कायद्यानेच मनाई करण्यात आली.

तत्कालीन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्य समुदायाला त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याची मुभा देणारा करार नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली यांच्यात झाला होता. पण, तो करार केवळ एकतर्फी होता आणि पाकिस्तानात तो फक्त कागदावरच राहिला. उलट भारतात मुस्लिमांना अनेक सवलती देण्यात आल्या. सर्वात म्हणजे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी ‘३७०’ व ‘३५ ए’ ही कलमे राज्यघटनेत बळजबरीने घुसविण्यात आली. त्याचे काय परिणाम झाले, हे गेल्या ७५ वर्षांत सर्व भारतीयांनी पाहिले आणि भोगले. हिंदूंची मंदिरे आणि देवस्थाने यांच्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण आणण्यात आले, पण त्यातून मशिदी आणि चर्चेस यांना वगळण्यात आले. म्हणजे मंदिरांमध्ये दानपेटीत जमा होणार्‍या निधीवर सरकारचा हक्क प्रस्थापित झाला. जसजसा काळ सरकत गेला, तसतसे काँग्रेसचे मुस्लीम लांगूलचालनाचे धोरण वाढतच गेले. इंदिरा गांधी यांनी ‘वक्फ कायदा’ आणि अल्पसंख्याक आयोग यांची स्थापना करून मुस्लीम तुष्टीकरणाची परिसीमा गाठली. पुढे तर नरसिंह राव सरकारने प्रार्थनास्थळ कायदा करून हिंदूंच्या आस्थेवरच घाला घातला आणि न्याय्य धार्मिक हक्कांवर गदा आणली.

युपीएच्या काळातही या हिंदूद्वेषाचे टोक गाठले गेले. आसेतुहिमालय भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू राम यांना काल्पनिक व्यक्तिरेखा म्हणण्यापर्यंत काँग्रेस नेतृत्त्वाची मजल गेली. इतकेच नव्हे, तर तसे प्रतिज्ञापत्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. त्याविरोधात जनक्षोभ उसळल्यावर सारवासारव करून ते मागे घेतले गेले. इतके करूनही काँग्रेसचा हिंदूद्वेष कमी झाला नाही. रामजन्मभूमीच्या खटल्यात मुस्लिमांच्या बाजूने काँग्रेसचे सर्व दिग्गज वकील राम जन्मभूमीविरोधात युक्तिवाद करीत होते. राम मंदिराच्या उभारणीला करता येईल तितका विरोध काँग्रेसकडून करण्यात आला. ‘भगव्या दहशतवादा’चे बुजगावणे निर्माण करण्याचा प्रयत्नही काँग्रेसकडून केला गेला. जात्यंधांनी साबरमती एक्सप्रेसचा डबा जाळून तब्बल ५९ रामसेवकांचा बळी घेतला तेव्हा किंवा मुलायम सिंहांनी अयोध्येतील कारसेवकांवर प्रच्छन्न गोळीबार केला, तेव्हाही देशातील सेक्युलॅरिझम धोक्यात आला नव्हता. शैक्षणिक अभ्यासक्रम डाव्या विचारसरणीच्या चश्म्यातून शिकविण्यात आला, तेव्हा सर्व ठीक होते. पण, मोदी सरकारने इतिहास वस्तुस्थितीदर्शक पद्धतीने मांडला, तर शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याची ओरड काँग्रेसकडून केली जाते. काँग्रेसच्या हिंदूविरोधाची यादी मारुतीच्या शेपटीइतकी लांब आहे.

आचार्य कृष्णम यांनी वैयक्तिक आकसातून काँग्रेस नेतृत्त्वावर टीका केली असे गृहीत धरले, तरी त्यांनी जे म्हटले आहे, ते वस्तुस्थितीदर्शकच आहे. त्यामुळे त्यांचा हेतू कोणताही असला, तरी त्यांनी काँग्रेसचा खरा चेहरा जनतेपुढे आणला आहे, असे म्हणावे लागते. योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या संन्याशावर भाजप महत्त्वाची जबाबदारी सोपवितो. पण, काँग्रेसचे नेते मात्र आपल्याच पक्षातील एका हिंदू संन्याशाचा त्याच्या वेषावरून आणि कपाळावरील तिलकावरून अपमान करतात, यावरून या दोन्ही पक्षांच्या दृष्टिकोनात किती फरक आहे, ते स्पष्ट होते. आज हिंदू समाजात धार्मिक आणि पारंपरिक आस्था नव्याने जागृत होत असून बहुसंख्य जनतेची ती आकांक्षा आहे. बहुसंख्याकांच्या आकांक्षांची पूर्ती करणे हेच लोकशाहीचे तत्त्व आहे. निवडणुकीतील मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करताना आपण हिंदूविरोधी कधी झालो, हे काँग्रेसच्या नेत्यांना कळलेले नाही. संकुचित राजकीय दृष्टिकोनामुळे तो पक्ष बहुसंख्याकांच्या आशा-आकांक्षांचा अव्हेर करीत आला आहे. जनतेने या पक्षाचे हे खरे रूप ओळखले असून आता तर स्वपक्षीय नेत्याकडूनच काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121