’शककर्ते शिवराय’ ग्रंथाची ’लाख’मोलाची ’शिव’आवृत्ती!

    19-Aug-2023
Total Views | 165
Author Vijayrao Deshmukh Shak Nirmata Shivray

विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ या सुमारे १ हजार, २०० पृष्ठांच्या द्विखंडात्मक ग्रंथाच्या एक लाख प्रतींच्या ‘शिव’ आवृत्तीचे प्रकाशन शनिवार, दि. १९ ऑगस्ट रोजी पुण्यात पौड रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानिमित्ताने...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे अर्धात्रिशतसांवत्सरिक (३५०) वर्षे सुरू असताना शिवाजी महाराजांच्या गौरवाचे अनेकानेक उपक्रम केवळ शासकीय स्तरावरच नव्हे, तर सामाजिक-साहित्यिक संस्थांच्या पातळीवरदेखील हाती घेण्यात आले आहेत आणि ते स्वाभाविक आहे. शिवाजी महाराजांचे जीवन हे दीपस्तंभासारखे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत किंवा संकटात मार्गदर्शन करू शकेल, असे सामर्थ्य शिवचरित्रात आहे. यातील ज्या उपक्रमाची अवश्य नोंद घेतली पाहिजे तो आहे-’शककर्ते शिवराय’ या द्विखंडात्मक ग्रंथाच्या ‘शिव’आवृत्तीच्या प्रकाशनाचा...

शिवाजी महाराजांचे चरित्र विविध कालखंडांत वेगवेगळ्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी भिन्न-भिन्न दृष्टिकोनांतून उलगडून दाखविले आहे. निरनिराळ्या भाषांमधून ती चरित्रे प्रकाशित झाली आहेत. यावरूनच सर्व स्तरांत शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी किती कुतूहल आणि जिज्ञासा आहे, हे लक्षात येईल. जेम्स डग्लसपासून यदुनाथ सरकार यांच्यापर्यंत आणि रियासतकार सरदेसाई यांच्यापासून बाबासाहेब पुरंदरे, दि. वि. काळे, त्र्यं. शं. शेजवलकर यांच्यापर्यंत अनेकांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विविधांगी वेध घेतला आहे. यात महत्त्वाची भर सुमारे ४० वर्षांपूर्वी टाकली, ती विजयराव देशमुख यांनी. त्यांनी लिहिलेल्या ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथाने शिवप्रेमींचेच नव्हे, तर शिवाजी महाराजांच्या अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले, ते देशमुख यांनी ज्या मेहनतीने, हे शिवचरित्र लिहिले त्यामुळे! गेल्या ४० वर्षांत याच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत आणि त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, तरीही या ग्रंथाचा लाभ अधिकाधिक वाचक, अभ्यासकांपर्यंत सर्वांना घेता यावा, शिवचरित्रापासून स्फूर्ती मिळावी, या उद्देशाने नागपूरच्या ‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान’ने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ‘अर्धात्रिशतसांवत्सरिक’ वर्षाचे औचित्य साधत एक आगळा उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे, या ग्रंथाच्या एक लाख प्रतींच्या ‘शिव आवृत्ती’चे प्रकाशन करण्याचा!

या ग्रंथाचे लेखन करणारे विजयराव देशमुख आता ‘सद्गुरुदास’ म्हणून परिचित असले, तरी पूर्वायुष्यात त्यांची ओळख ही ‘शिवचरित्रकार’ आणि ‘शिवकथाकार’ अशीच होती. वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी शिवकार्याला प्रारंभ केला. १९८४ साली दत्तयोगी श्री विष्णुदास महाराजांकडून विजयरावांना अनुग्रह प्राप्त झाला आणि १९९० साली त्यांना ’सद्गुरुदास’ असे नामाभिधान प्राप्त झाले. तत्पूर्वीची सुमारे ३० वर्षे शिवचरित्राच्या अभ्यासात, संशोधनात आणि कथनात त्यांनी स्वतःस वाहून घेतले होते. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे त्यांनी देशभर दहा हजारांहून अधिक दिलेली व्याख्याने, १८ वर्षे हजारो शिवभक्तांना घडविलेली शिवदुर्ग यात्रा, सिद्ध केलेले अनेक ग्रंथ. ‘सूर्यपुत्र’, ‘मर्‍हाटी माती’, ‘महाराजांच्या मुलुखात’, ‘सिंदखेडराजा,’ अशा शिवकाळाशी निगडित विविध विषयांचा परामर्श घेणारे त्यांचे ग्रंथ वाचकप्रिय ठरलेच. पण, इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींकडून नावाजले गेले. यांतील कळसाध्याय म्हणजे ‘शककर्ते शिवराय’ हा ग्रंथ मानला पाहिजे.

त्या ग्रंथलेखनाची प्रेरणा विजयरावांना कशी मिळाली, हाही भाग रोचक आणि रोमांचक आहे. १९७४ साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३०० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी आपल्या काही तरुण सवंगड्यांबरोबर नागपूरहून निघून शिवाजी महाराजांचा संबंध आलेल्या ठिकाणांचा प्रवास करीत विजयराव रायगडावर पोहोचले असता, रायगडाने अनुभवलेल्या शिवकाळाने विजयरावांना रोमांचित केले आणि प्रेरित केले. आपल्याला शिवाजी महाराजांनी एकदा तरी दर्शन द्यावे, अशी विनवणी त्यांनी दुर्गदुर्गेश्वर रायगडाला केली आणि जर अंधुकसे का होईना, दर्शन घडले तर तेच शब्दांच्या चिमटीत पकडून रायगडाच्याच चरणी अर्पण करण्याचा संकल्प सोडला. अर्थात, पुढची वाट सोपी नव्हती. त्यासाठी भ्रमण आणि संशोधन, चिकित्सा आणि चिंतन यांची निकड होती. भावुक होऊन किंवा दंतकथांवर आधारित कहाण्यांचा आश्रय घेऊन शिवचरित्राचा वेध घेणे, हे शिवाजी महाराजांच्या चरित्रलेखनास न्याय देणारे होणार नाही आणि आपण रायगडावर सोडलेल्या संकल्पाशी सुसंगत नाही, या जाणिवेने विजयरावांनी ज्ञानसाधनेचा असिधारा व्रताचा मार्ग पत्करला.

अस्सल ऐतिहासिक मूळ कागदपत्रांचा अभ्यास करण्यास त्यांनी प्रख्यात इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली; त्याबरोबरच शिवकाळ घडलेल्या ऐतिहासिक ठिकाणी प्रवास केला. नागपूरपासून तंजावरपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी, असे अस्सल संदर्भ धुंडाळले. ते अस्सलतेच्या आणि विश्वासार्हतेच्या निकषावर तपासून घेतले. सतत सहा-सात वर्षे विजयरावांच्या अथक मेहनतीने आणि शोधक वृत्तीने शिवकाळातील अनेक बाबींवर प्रथमच प्रकाश पडला. जिजामातांच्या जन्मतिथी निश्चितीचे श्रेय विजयरावांच्या संशोधनाला जाते. सिंदखेडराजा या गावाला ’मातृतीर्थ दर्जा’ प्राप्त झाला. त्यात विजयरावांचे योगदान महत्त्वाचे! शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून असलेल्या दुमतांत अखेरीस शासनाने १९ फेब्रुवारी हा दिनांक स्वीकारला, त्यालाही विजयरावांचे संशोधन कारणीभूत आहे. यावरूनच विजयरावांनी शिवकाळाचे केलेले संशोधन किती सखोल, वस्तुनिष्ठ होते, याचा प्रत्यय येईल. याच त्यांच्या संशोधनाचा अविष्कार म्हणजे ‘शककर्ते शिवराय’ हा द्विखंडात्मक ग्रंथ!

या ग्रंथाची वैशिष्ट्ये आवर्जून नमूद करावयास हवी. शिवाजी महाराजांचे वास्तववादी चरित्र विजयरावांनी प्रस्तुत केले आहे, हे प्रमुख वैशिष्ट्य. दोन्ही खंड मिळून सुमारे १ हजार, २०० पृष्ठांचा हा घसघशीत, आशयसमृद्ध ऐवज आहे. दहा विभागांत ७२ प्रकरणांतून विजयरावांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे. शिवपूर्वकालीन भारत आणि महाराष्ट्राचा धांडोळा घेत, या ग्रंथाचा प्रारंभ होतो आणि महाराजांच्या महानिर्वाणाने या ग्रंथाचा समारोप होतो. मात्र, या ग्रंथाचे तेवढेच महत्त्व नाही. हिंदवी स्वराज्याचे प्रशासन, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था अशा अनेक पैलूंवर विजयरावांनी ज्या निगुतीने लिहिले आहे, त्याने वाचक समृद्ध झाल्याखेरीज राहत नाही. महाराजांच्या व्यूहनीतीची माहिती शब्दांत देतानाच तिला अनुषंगिक नकाशाची दिलेली जोड; ४० एक पृष्ठांवरील रंगीत छायाचित्रे त्यांत शहाजीराजांच्या दुर्मीळ पत्रापासून सुरत येथील डचांच्या वखारीपर्यंत आणि श्रीशैलम येथील श्री शिवाजी गोपूरमपासून पन्हाळा येथील शिवा काशीद समाधीपर्यंत असणार्‍या छायाचित्रांचा असणारा समावेश, ग्रंथाच्या परिशिष्टांत हेन्री ऑक्झेनडनची रोजनिशी इत्यादी दस्तावेजांचा समावेश; दोन्ही खंडांच्या अखेरीस दिलेली नाम आणि स्थल सूची; शिवाजी महाराजांच्या कालपटाचा आढावा यातून, या लोकोत्तर महापुरुषाच्या चरित्राचा वेध घेताना विजयरावांनी कोणतीही कसर सोडलेली नाही, याचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही.

विजयरावांची जन्मभूमी असलेल्या गाडेगाव परिसरात ४० हजार शिवभक्तांनी ‘शककर्ते शिवराय’ या महाग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढली होती आणि ३५ हजार शिवभक्तांच्या साक्षीने या ग्रंथाची मिरवणूक रायगडावर चांदीच्या पालखीतून काढण्यात आली होती. ‘’ऐतिहासिक साधनांचा चिकित्सापूर्वक अभ्यास मांडणारे विजयराव देशमुख हे प्रथम स्थानचे शिवचरित्रकार आहेत,” असे प्रशंसोद्गार स्वतः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले होते, हा विजयरावांच्या ग्रंथाचा अलंकारच! गेल्या चार दशकांत या ग्रंथाच्या हजारो प्रतींची विक्री झाली आहे. एवढेच नव्हे, तर हिंदी भाषांतरित ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते अलीकडेच झाले. आता याच ग्रंथाची एक लाख प्रतींची ‘शिव आवृत्ती’ प्रकाशित होत आहे. ग्रंथाच्या मांडणीशी आणि मजकुराशी तडजोड न करता, द्विखंडात्मक ग्रंथाची किंमत अल्प ठेवून हे शिवधनुष्य पेलण्याचा घाट ‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान’ने घातला आहे.

लाखो वाचकांना शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे दर्शन व्हावे, या उद्देशाने हा अमूल्य ठेवा अल्प किमतीत (रुपये ५००) वितरित करण्याचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे. दि. १९ ऑगस्ट रोजी पुण्यात या शिव आवृत्तीचे प्रकाशन पुण्यात झाले असून ग्रंथाची विक्री सुरू आहे. वाचकांना त्यासाठी मंगेश बरबडे, पुणे (९९२१२३७९९९) किंवा प्रसन्न बारलिंगे, नागपूर (९७६४५३५३२५) यांच्याशी संपर्क साधता येईल. एका अलौकिक महापुरुषाच्या चरित्राचा हा अमूल्य असा दस्तावेज संग्रही असावा, असाच!

राहूल गोखले
९८२२८२८८१९

अग्रलेख
जरुर वाचा
पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121