मुंबई : "आधी राजकीय नेत्यांची वाङ्मयीन जाण दांडगी असायची. ते पुस्तके वाचायचे, लेखकांचा कल समजून घ्यायचे. आजची राजकीय मंडळी मात्र साहित्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शासन मराठी भाषेविषयही गंभीर दिसत नाही. रोज कुठली तरी एक मराठी शाळा बंद पडत आहे. महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमात मराठीचा मान पहिला हवा, पण ती क्रमात तिसऱ्या स्थानावर आहे. मातृभाषेची ही उपेक्षा संपायला हवी." असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी त्यांनी साहित्य क्षेत्रातील कंपूशाही, समाज माध्यमांवरील लेखन तसेच मराठी माध्यमाच्या शाळांबाबतही आपले विचार मांडले.
ते पुढे म्हणाले, " ‘फेसबुकी’ साहित्याला उधाण आले आहे. ‘ट’ ला ‘ट’ जुळवून कविता केली जाते व ती लगेच ‘फेसबुक’वर टाकली जाते. या ‘इन्स्टंट’ लेखकांना ‘लाईक’, ‘कमेंटस’चा मोह आवरत नाही. एखाद-दुसरा अपवाद सोडला तर या लिखाणाला दर्जा नसतो. पुढे हीच पुस्तके भेट मनु पुढे पाठवली जातात." कंपूशाही बद्दल बोलताना ते म्हणाले, "मागच्या दहा-पंधरा वर्षात साहित्य क्षेत्राचे स्वरूप बदलले आहे. दुर्दैवाने या क्षेत्रातही कंपूशाही निर्माण झाली आहे. सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. हे भाषा, साहित्य व संस्कृतीच्या दृष्टीने हितावह नाही."
"मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात असे लेखक फारच कमी आहेत. समकालीन वास्तव टिपून ते लेखनाचा आधार बनवण्यासाठी जी दृष्टी हवी असते ती विदर्भातील लेखकांकडे दिसत नाही, हे मला खेदाने नमूद करावेसे वाटते." असेही डॉ. शोभणे म्हणाले.