रत्नागिरी : महाराष्ट्राच्या अनेक भागात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सावित्री, अंबा, गांधारी, कुंडलिका, पाताळगंगा आणि काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी नदी पात्राबाहेर येऊन काही सखल भागांमध्ये शिरले आहे.
नदीचे पाणी नाईक कंपनी, मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी एक फूटापर्यंत पाणी भरलेले आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नगरपालिकेच्या बोटी, तलाठी, पोलीस आणि एनडीआरएफची पथके सहा ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.
पूराचे पाणी काही घरांमध्ये शिरल्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.