मुंबई : बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर आता राज्य सरकार कारवाई करणार असून त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल, अशी ग्वाही फडणवीसांनी अधिवेशनात बोलताना दिली. दरम्यान, हवामान विभागाने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली असून यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आला आहे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याशिवाय, बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.