मोठ्या पडद्यावर मराठी चित्रपटांची जादू रंगत जात असताना, दुसरीकडे ‘ओटीटी’वर मराठी कलाकार हिंदी कलाकारांच्या साथीने कल्ला करताना दिसतात. प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, अमेय वाघ, सचिन पिळगांवकर, अमृता सुभाष, उपेंद्र लिमये अशा अनेक मराठी कलाकारांनी मराठी चित्रपट किंवा मनोरंजनसृष्टीचा वारसाच खरंतर ’ओटीटी’ वर इतर भाषिक आशयनिर्मितीच्या गर्दीत पुढे नेला. इतकेच नाही, तर हिंदीतील ताकदीच्या कलाकारांसोबत आपला अभिनय कुठेही फिका पडणार नाही, याची खबरदारीदेखील मराठी कलाकार क्षणोक्षणी घेताना दिसले.
मराठी कलाकारांच्या अभिनयाला रंगभूमीची पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांचे अभिनय कौशल्य अधिक प्रभावीपणे प्रत्येक माध्यमांत उठून दिसते. हावभाव, संवादफेक, परिस्थितीनुसार अभिनय कौशल्य या सर्व बाबी खरं तर रंगभूमी अधिक शिकवते, असे प्रत्येक मराठी कलाकार कायमच म्हणतो. त्यामुळे अलीकडचे प्रभावी माध्यम ठरलेल्या ‘ओटीटी’वर विविध प्रकारच्या विषयांना अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक दिग्दर्शक करत असल्याचे दिसून येते. ‘ओटीटी’ माध्यमाचा प्रभाव हा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांवर फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. काळानुरूप मनोरंजनाची माध्यमे बदलत गेली आणि त्यानुसार सद्यःस्थितील आघाडीच्या माध्यमावर मराठी कलाकार मराठी मनोरंजनसृष्टीचे आणि भाषेचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतात. तेव्हा, ‘ओटीटी’वर झळकणार्या अशाच काही मराठमोळ्या कलाकारांचे याविषयीच्या भावना दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतल्या....
अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडला पाहिजे
कोणत्याही कलेच्या सादरीकरणाला खरं तर भाषेचं बंधन नसतं. जसे नाटक, मालिका, चित्रपट आणि आता ‘ओटीटी’. जसा काळ बदलत जातो, तशी माध्यमं बदलत जातात आणि त्याप्रमाणेच मराठी कलाकार काळानुरूप बदलत गेले. माध्यमांनुसार प्रेक्षक बदलला आणि त्यांच्या मागण्याही बदलल्या आणि त्या मागण्या पूर्ण करण्याचे काम प्रामाणिकपणे प्रत्येक कलाकार करत आहे. मनोरंजनाचे माध्यम कोणतेही असो, आपला अभिनय हा प्रेक्षकांच्या मनाला भिडला पाहिजे, हे फार महत्त्वाचे आहे.
-अतुल कुलकर्णी, अभिनेता
अधिकाधिक तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी ‘ओटीटी’ महत्त्वाचे
आताची तरुण पिढी ही घरबसल्या किंवा कोठेही प्रवास करताना वेबसीरिज किंवा चित्रपट ’ओटीटी’वर पाहण्याला जास्त प्राधान्य देते. त्यामुळे ’ओटीटी’वर काम करून अधिकाधिक तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी हा आम्हा कलाकारांसाठी फार महत्त्वाचा काळ आहे. परंतु, मराठी मनोरंजनसृष्टीत अधिक मोकळेपणाने काम करता येतं, हेदेखील तितकंच खरं आहे; पण हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करताना भावना सारख्याच असतात, त्यामुळे काम करणं तसं सोप्प जातं.
- अमेय वाघ, अभिनेता
स्वैराचार वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी
कलाकृती कोणत्याही सेन्सॉरशिपमध्ये अडकू नये, अशाच भावना कलाकार म्हणून आहेत. परंतु, कुठेही स्वैराचार वाढणार नाही, याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
- उपेंद्र लिमये, अभिनेता