असे म्हणतात की, शत्रूबद्दलचे अज्ञान किंवा अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असते; म्हणूनच आपण महाराष्ट्रभूमीचाच नव्हे, तर आमच्या मातृभूमीचा शत्रू असणार्या औरंगजेबाचा खरा चेहरा ओळखण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास बिघडवण्याचे मोठे षड्यंत्र सुरू आहे. वेगवेगळ्या गोंडस नावाखाली औरंगजेबाचा उदो उदो करण्याचा डाव मांडला जात आहे. त्यानिमित्ताने क्रूरकर्मा औरंगजेबाचा खुन्शी चेहरा आणि औरंग्याचे समर्थन करुन बुद्धिभ्रम निर्माण करणार्या नेतेमंडळींचाही बुरखा फाडण्यासाठीचा हा लेखप्रपंच...
मराठा ही लढाऊ जमात. महाराष्ट्रभूमीची पुत्र असणारी आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान बाळगणारी मराठा जमात! महाराष्ट्रात राहणार्या अठरापगड जाती ’मराठा’ या संज्ञेत मोडतात. भारताच्या राष्ट्रगीतात तत्कालीन सर्व प्रांताचा उल्लेख येतो. मात्र, महाराष्ट्राचा उल्लेख ’मराठा’ असा येतो. भारताच्या राष्ट्रगीतात उल्लेख असणार्या मराठ्यांनी दिल्लीच नव्हे, तर अटकेपार भगवा झेंडा फडकवला. हिंदुत्वाच्या रक्षणार्थ प्रसंगी प्राणांचीही आहुती दिली. मराठ्यांचे देशासाठी योगदान मांडताना शेजवलकरांनी लिहिले होते की, “जिथे मराठ्यांचे पाय लागले, तो भाग देशात राहिला आणि जिथे मराठ्यांचे पाय लागले नाहीत, तो भाग पाकिस्तानात गेला. मराठ्यांनी पुढे पानिपतावर जाऊन ‘भारतीयांसाठी भारत’ या व्यापक भूमिकेतून संघर्ष केल्याचेही आपण पाहतो. मराठ्यांचा इतिहास हा मातृभूमीसाठी संघर्षाचा इतिहास आहे. हा अनवरत संघर्षाचा इतिहास म्हणजे आमच्या विजयशाली वृत्तीचे प्रतीक आहे.“ महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी पराक्रमाचे आणि शौर्याचे शिवभारत घडवले. या लढ्यातील खलनायक म्हणजेच अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर होय!
छत्रपती शंभूराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली किंवा औरंगजेब कसा सेक्युलर आणि सद्गुणांचा पुतळा होता, अशी मांडणी म्हणजे म्हणजे व्यापक देशविरोधी षड्यंत्राचाच भाग मानली पाहिजे. या विकृत अपप्रचाराने अनायासे राष्ट्रविघातक शक्तींना एक पूरक वातावरण तयार होताना दिसते. औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे झाल्यानंतर या राष्ट्रविरोधी प्रवृत्तींच्या मनातील औरंगजेब आता दबून राहिलेला नाही. नामांतराच्या विरोधात आणि औरंगजेबाच्या समर्थनार्थ हजारो अर्ज सरकारदरबारी दाखल झाले आहेत. अनेकांच्या मनातला औरंगजेब मोबाईल स्टेटसवर उतरला आहे. हे अर्ज आणि स्टेटस म्हणजे औरंगजेबाच्या समर्थकांनी आपल्या राष्ट्रविरोधी मानसिकतेचा दिलेला परिचय आहे. भविष्यात तुम्हाला आम्हाला सीमेवरच नाही, तर तुमच्या आसपासही देशविरोधी प्रवृत्तींशी लढावे लागणार आहे, याचेच हे भयावह चिन्ह आहे!
मागे एका प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीवर मौलाना अन्सार रझा नावाचा मौलवी ’‘औरंगजेब हमारा वली हैं, हमारा हिरो हैं” असे छातीठोकपणे सांगताना देशाने पाहिला आहे. भारतात राहून भारताच्या शत्रूचे गोडवे गाणारी राष्ट्रविरोधी वृत्ती आज दिल्लीपासून आपल्या गावांपर्यंत दिसून येते. या पार्श्वभूमीवर औरंगजेब कोण होता? हे समजून घेणे आवश्यक आहे. वास्तविक, औरंगजेब कोण होता? तो कशासाठी लढला आणि त्याचा हेतू काय होता? याबाबत मुस्लीम समाजात कुठलाही संभ्रम नाही. संभ्रम असेल, तर तो मुस्लिमेतर समाजातच आहे, म्हणून त्यांनी औरंगजेब समजून घेणे गरजेचे आहे. एमआयएमचे नेते नेहमीच औरंगजेबाच्या थडग्यावर जात असतात. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या थडग्याला भेट दिली. प्रकाश आंबेडकर हे स्वतः अभ्यासू आणि मुरब्बी नेते आहेत आणि विशेष म्हणजे, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांनी औरंगजेबाच्या थडग्यावर जाणं हे सर्वस्वी दुर्देवीच! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ’थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकात इस्लामची परखड चिकित्सा केली आहे, हिंदू-मुस्लीम संबंधाच्या बाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाकित आज खरे होतांना दिसत आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ’थॉट्स ऑन पाकिस्तान’ या मौलिक ग्रंथात सुमारे एक हजार वर्षांच्या इस्लामी आक्रमणाचा आढावा घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाने हा ग्रंथ (Dr.Babasaheb Ambedkar -Writing and speeches)च्या ८व्या खंडात छापला आहे. यातील पान क्र. ५९ ,६० वर मुघल बादशाह शाहजहानने बनारस जिल्ह्यात ७६ मंदिरे पाडल्याचा उल्लेख केला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे औरंगजेबाचेही उदाहरण देतात. हिंदूंच्या पाठशाळा आणि मंदिरे पाडण्याचा आदेश औरंगजेबाने सर्व प्रांतांच्या सुभेदारांना दिला. तसेच, काशीविश्वनाथ मंदिर पाडल्याचाही उल्लेख बाबासाहेबांनी केला आहे. सध्या महाराष्ट्रात काही स्वयंघोषित इतिहासकार (?) व राजकीय नेते ’औरंगजेब क्रूर नव्हता’ अशी बालिश विधाने करत सुटले आहेत. मुस्लीम मतपेढीला आकर्षित करण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत. या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचून स्वत:ची माहिती दुरूस्त करण्याची गरज आहे.
छत्रपती शंभुराजांच्या हत्येसंदर्भात केलेली मांडणीही इतिहासाला धरून नाही. वास्तविक अशा प्रकारची मांडणी पहिल्यांदाच झाली, असेही नाही. यापूर्वीही ‘संभाजी ब्रिगेड’, ‘बामसेफ’सारख्या संघटनांच्या व्यासपीठावरून अशी मांडणी झालेली आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात स्वतः औरंगजेब कधीही स्वराज्यावर चालून आला नाही; पण शंभूराजांचा सामना मात्र थेट औरंगजेबाशी झाला. जगाच्या इतिहासात उदाहरण ठरावे एवढ्या धीरोदात्तपणे ते मृत्यूला सामोरे गेले. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तीन लक्ष घोडदळ, चार लक्ष पायदळ, शेकडो हत्ती, हजारो उंट असे प्रचंड मोठे दळबादळ घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला. स्वतः औरंगजेबाने काफीर मराठ्यांविरोधातील या महामोहिमेला ‘जिहाद’ म्हटलेले आहे. मुसलमानांना अल्लाच्या मार्गात ‘जिहाद’ करणे, हे त्याचे आप्तेष्ट, नातेवाईक आणि त्यांचे व्यापारउदीम व मालमत्तेपेक्षाही अधिक प्रिय असते, असे कुराणाच्या सूरह ९ आयत क्र- २४ मध्ये सांगितलेले आहे. कुराणाच्या सूरह २ आयत १९०-१९३ नुसार इस्लामच्या रक्षणासाठी व स्वरक्षणासाठी युद्ध अनिवार्य आहे, अशाप्रकारे ‘जिहाद’ म्हणजे निरंतर इस्लामिक युद्धाचा सिद्धांत आहे.
हिंदवी स्वराज्य म्हणजे काफिरांचे राज्य. या राज्याशी लढणे म्हणजे औरंगजेबासाठी ‘जिहाद’च होता. दि. २१ नोव्हेंबर १६८१ रोजी औरंगजेबाने बुरहानपूरच्या अब्दुल लतिफच्या दर्ग्यास भेट दिली आणि इस्लामचा शत्रू असलेल्या संभाजीविरूद्ध आपल्याला यश मिळावे, अशी प्रार्थना केली. “ही महामोहीम काढण्यात माझा हेतू फक्त जिहाद आहे, माझ्या या सेवेने अल्ला प्रसन्न होवो,” अशी त्याने घोषणा केली. मराठ्यांच्या स्वराज्याचा संपूर्ण नाश आणि काफरबच्चा संभास ठार करणे, हा उद्देश ठेवून औरंगजेबाने ‘जिहाद’ सुरू केला. पण, त्याला शरण जातील ते शंभूराजे कसले? ’अहद तंजावर ते तहद पेशावर’ हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्या पुण्यश्लोक शिवछत्रपतींचे ते सुपुत्र होते. ’आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य’ असे म्हणून आपल्या आबासाहेबांचेच स्वप्न आणि वारसा घेऊन शंभूराजे सर्वशक्तीनिशी औरंगजेबाविरूद्ध उभे राहिले होते.
मुघलांचा सेनानी शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याने छत्रपती शंभूराजांना कैद करण्यात आले. भल्याभल्यांना जमले नाही ते मुकर्रबखानाने करून दाखवले होते. ज्या दिवशी बादशाही छावणी बहादुरगडावर पडली, त्याच दिवशी मुकर्रबखानाने औरंगजेबासमोर शंभूराजे आणि कवी कलशास हजर केले. या दिवशी तारीख होती दि. १५ फेब्रुवारी १६८९. पण, शंभूराजे झुकले नाहीत. तत्पूर्वी बादशाही हुकूमाप्रमाणे त्यांना इस्लामी पद्धतीने ’तख्ते-कुलाह’ चढवून त्यांची अपमानास्पद धिंड काढण्यात आली. साकी मुस्तैदखान आणि ईश्वरदास नागर, मनुची या समकालीन लेखकांनी या विटंबनेचे वर्णन लिहून ठेवले आहे. ’मआसिर-ए-आलमगिरी’ या ग्रंथात साकी मुस्तैदखानाने शंभूराजांच्या अपमानास्पद धिंडीबाबत लिहिले आहे. तो लिहितो, “काफीर संभाची धिंड म्हणजे आमच्यासाठी रमजान ईदचा सण होता. काफिरांवर विजय दिल्याबद्दल औरंगजेबाने अल्लाचे आभार मानले.” इस्लामी पद्धतीने शंभूराजांना हालहाल करून मारण्याचा निर्णय त्याने घेतला. दि. १७ फेब्रुवारी १६८९ रोजी लालबुंद गरम सळ्यांनी शंभूराजांचे डोळे काढण्यात आले. औरंगजेबाचा दरबारी मुहम्मद हाशिम खाफीखान लिहितो, “बादशाहाला असभ्य बोलणार्या त्या दुष्टांच्या (शंभूराजे) जिभा प्रथम उपटून नंतर त्यांचे डोळे काढण्यात आले, शंभूराजांनी अन्नत्याग केला.”
_202307012101539778_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
या सर्व शिक्षा मनुस्मृतीनुसार नव्हे, तर औरंगजेबाच्याच मजहबप्रमाणे देण्यात आल्या. सौदी व अन्य इस्लामी देशांत आजही अशा शिक्षा दिल्या जातात. याचे प्रमाण इंटरनेटवरही वाचायला मिळते. संदर्भ - - https://wikiislam.net/wiki/-mputationšinšIslam
https://www.gatestoneinstitute.org/३४४५/militant-muslims-cutting-out-tongues) दरम्यान, बादशाही छावणीने बहादूरगड सोडून पुण्याच्या दिशेने कूच केले. कोरेगाव-भीमा येथे मुघलांची छावणी पडली (३ मार्च १६८९)छत्रपती शंभूराजांना मृत्युदंड द्यावा, असे औरंगजेबाच्या मनात होतेच; पण हा इस्लामिक ‘जिहाद’ असल्यामुळे मुस्लीम धर्मगुरूंच्या आदेशानेच तो हा दंड देऊ इच्छित होता. औरंगजेबाने सर्व मुस्लीम धर्मगुरूंना बोलावून या संभाजीने अनेक मुसलमानांना ठार मारले आहे. तसेच, इस्लामच्या राजवटीतील शहरे उद्ध्वस्त केली आहेत. तेव्हा काफीरास मृत्यूदंड द्यावा, अशी सूचना केली. यावर लगेच मुस्लीम काजी आणि मुफ्तींनी शंभूराजांच्या हत्येचा फतवा जारी केला, याची नोंद समकालीन ग्रंथ ’मआसिर-ए-आलमगिरी’ या ग्रंथात साकी मुस्तैदखान याने केली आहे.
अखेर मुस्लीम धर्मगुरूंच्या फतव्यानुसार आणि औरंगजेबाच्या आदेशाने दि. ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती शंभूराजे यांना वढू गावच्या रानात ठार मारण्यात आले.औरंगजेबाच्या परंपरेप्रमाणे शंभूराजांच्या मृत्यूनंतरही त्याची वैरभावना नष्ट झाली नाही. शंभूराजांच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करण्यात आले. त्यांचे मस्तक औरंगाबादेहून बुरहानपूरपर्यंत मिरवण्यात आले आणि नंतर दिल्लीला नेऊन शहराच्या दरवाजावर लटकवण्यात आले.
अशाच प्रकारांनी झालेल्या काही हत्या पाहा.
१) अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीच्या राजाच्या जावयाला अशाच क्रूर पद्धतीने ठार मारले. त्याची कातडी सोलून देवगिरीच्या दरवाजावर लटकावले.
२) विजयनगरचा शेवटचा राजा रामराया यांचा पाच पातशाह्यांनी एकत्र येऊन राक्षसतागडीच्या युद्धात पराभव केला. बादशहाने वयोवृद्ध रामरायांचा शिरच्छेद केला. त्यांचे मस्तक भाल्याच्या टोकावर सैन्यात मिरवले गेले. शेवटी अली आदिलशहाने रामरायाचे मस्तक पोखरून काढले आणि ते विजापूरात एका मोरीच्या तोंडाला अशाप्रकारे बसवले की, मोरीतील घाणेरडे पाणी रामरायांच्या तोंडातून बाहेर पडावी.
३) गुरू गोविंदसिंह यांच्या लहान मुलांना भितींत चिणून ठार मारले. बंदा बैरागींनाही असेच हालहाल करून मारले.
४) पानिपत युद्धापूर्वी कुतूबशहाने घायाळ झालेल्या दत्ताजी शिंदे यांचा शिरच्छेद केला आणि ते शीर भाल्यावर सैन्यात मिरवले. (कुतूबशहाने हे कृत्य त्याच्या धर्मग्रंथानुसार केल्याचा भाऊसाहेबांच्या बखरीत स्पष्ट उल्लेख आहे.)
५) कारगिल युद्धाच्या सुरुवातीला कॅप्टन सौरभ कालिया यांचीही पाकिस्तानने अशाच प्रकारे हत्या केली.
महाराष्ट्रातील इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘शिवपुत्र राजाराम’ या ग्रंथातही पान क्र. २० वर छत्रपती शंभूराजांची हत्या मुस्लीम धर्मगुरुंच्या फतव्यानेच झाल्याचे स्पष्ट लिहिले आहे.
महाराष्ट्रातील काही स्वयंघोषित इतिहासकार आणि नेते औरंगजेबाचा बचाव करण्यासाठी छत्रपती शंभूराजांची हत्या मनुस्मृतीनुसार आणि ब्राह्मणांच्या सल्ल्याने केली, अशी मांडणी करतात. या लोकांना खरा औरंगजेब कळलाच नाही. (किंवा कळवून घ्यायचा नाही!) औरंगजेबाने तख्तावर आल्यानंतर सर्व गैरइस्लामिक प्रथांचे उच्चाटन केले, एवढेच नव्हे तर मुस्लिमांची दाढी किती लांब असावी, याचेही त्याने नियम केले होते. मुघलांच्या नाण्यांवर कुराणातील शब्द असत, ती नाणी हिंदूंच्या हाती जाऊन अपवित्र होतात, म्हणून त्याने नाण्यांवर कुराणातील शब्द छापायला बंदी घातली. आपल्या राज्यातील मुस्लिमांचे वर्तन कुराणनुसार होत आहे ना? हे पाहण्यासाठी औरंगजेबाने ’मुहतसीब’ नावाचे अधिकारी नेमले. पालमाऊच्या मोहिमेत पत्र लिहून औरंगजेबाने ’पालमाऊचा राजा मुसलमान होत नसल्यास त्याला ठार करावे’ असा आदेश दिला.असा कट्टर औरंगजेब ब्राह्मणांचे ऐकून मनुस्मृतीनुसार छत्रपती शंभूराजांच्या हत्येचे आदेश देतो, असे म्हणणे वस्तुस्थितीचा विपर्यास तर आहेच; पण हास्यास्पदही आहे.
मराठे आणि मुघलांचा संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता, अशीही मांडणी काही जातीय संघटना करत असतात. त्यांनी स्वतः औरंगजेब या संघर्षाबाबत काय म्हणतो, याचा अस्सल पुरावा वाचला पाहिजे. औरंगजेबाच्या २५ वर्षांच्या दख्खन मोहिमेत वसंतगडाची लढाई चालू असताना त्याच्या अगदी जवळचा अधिकारी साकी मुस्तैद खान याने औरंगजेबाचे स्वतःचे काही शब्द त्याच्या अधिकृत इतिहासात, म्हणजे ‘मआसिर-ए-आलमगिरी’ या ग्रंथात, लिहून ठेवले आहेत. किल्ल्यापासून एका कोसावरून वाहणार्या कृष्णा नदीच्या काठावर त्याचा तंबू उभारायचा आदेश बादशाहाने दिला व म्हणाला की, ‘’या सगळ्यामागे माझा बाकी काही उद्देश नसून, धर्मयुद्ध (घझा) हेच एकमेव उद्दिष्ट आहे, याने अल्ला व प्रेषित प्रसन्न होवोत. उद्या सकाळी आक्रमण करण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन मी निघेन व नीच काफिरांची कत्तल करून माझे निशाण उंचावेन.” )मआसिर-ए-आलमगिरी, साकी मुस्तैद खान, पृष्ठ क्रमांक ४१०-४११) औरंगजेबाने स्पष्ट शब्दांत हिंदू मराठ्यांविरूद्धचा संघर्ष हा ‘जिहाद’ असल्याचे म्हटले आहे. मराठ्यांनी या मायावी संघटनांपासून सावध राहिले पाहिजे. गुढीपाडवा हा हिंदूंचा सण बंद करण्यासाठी अशा भाकडकथा उभ्या केल्या आहेत, यामागचे डाव समाजाने जागृतपणे समजून घेतले पाहिजे.
गुढीपाडवा आला की, मनुस्मृती बाजारात मांडायची, दसरा आला की, रावण किती श्रेष्ठ होता, हे सांगायचं! होळीला महिलेचे दहन म्हणायचे, असे हिंदूद्रोही उद्योग काही लोकांनी सुरू केले आहेत. हिंदूंनीच आपल्या प्रथा-परंपरा स्वहस्ते बंद कराव्यात आणि हळूहळू जातीजातीत संघर्ष निर्माण होऊन जिहादी शक्तींचा फायदा व्हावा, हाच यांचा उद्देश असावा का? अशी शंका येते. म्हणून सर्वांनी या समाजविघातक शक्ती चेहरा ओळखला पाहिजे. औरंगजेबाला दयाळू आणि प्रेमळ दाखवण्यासाठी काही लोक असाही दावा करतात की, औरंगजेबाने शंभूपुत्र शाहू महाराजांना पकडले; पण त्यांचे धर्मांतर करायचे प्रयत्न नाही केला नाही आणि शाहुराजांचा त्याने नातवासारखा सांभाळ केला वगैरे. यामागचे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. औरंगजेबाने शाहू महाराजांच्या धर्मांतराचा आटोकाट प्रयत्न केला आहे आणि त्याला महाराणी येसुबाई आणि राजपुत्र शाहू महाराजांनी प्रखर विरोध केला, हा सत्य इतिहास आहे. त्याचे अस्सल पुरावे मुघल कागदपत्रात उपलब्ध आहेत. याबाबत मुघल दरबारच्या अखबारातील नोंद सत्येन वेलणकर यांनी प्रकाशात आणली होती. ती पुढीलप्रमाणे-
“बादशाहाने हमीदुद्दीन खानांस फर्मावले की संभाचा (छत्रपती संभाजी महाराज) मुलगा शाहू गुलालबारात कैद आहे. त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा की, तू मुसलमान हो. त्याप्रमाणे हमीदुद्दीन खान शाहूकडे गेला आणि त्याने शाहूला बादशहाचा निरोप सांगितला. शाहूने मुसलमान होण्यास नकार दिला. शाहूचा नकार बादशाहाला कळवण्यात आला. ते ऐकून बादशाहा म्हणाला की, नजर ठेवा.”
निरंजन टकले नावाच्या गृहस्थाने तर ‘लाचारी’ हा शब्दही फिका ठरावा अशा प्रकारे औरंगजेबाचे गुणगान केले आहे. तो गणेशमूर्तीसमोर वीणावादन करायचा, अशी लोणकढी थाप मारली आहे. या गृहस्थाने तयार केलेल्या व्हिडिओत शंभुपुत्र शाहू महाराजांच्या नावावर राजर्षी शाहू महाराजांचा फोटो दाखवला आहे. ज्याला शंभुपुत्र शाहू आणि राजर्षी शाहू यातील फरक कळत नाही, अशा व्यक्तीने महाराष्ट्राला औरंगजेबाचा इतिहास सांगावा? खरंच महाराष्ट्रावर इतके वाईट दिवस आले आहेत का?
औरंगजेबाने त्याच्या राज्यात संगीतावर बंदी आणली होती, हे टकलेंना माहिती असण्याचे कारण नाही. किंबहुना, त्यासाठी मूळ संदर्भाचे वाचन करावे लागते, हे टकलेंच्या गावीही नसावे. निरंजन टकलेचे नशीब थोर की, औरंगजेब मातीत गाडला गेला आहे, नाहीतर त्याला गणेशमूर्तीसमोर वीणा वाजवायला लावणार्या निरंजन टकलेंची त्याने काय अवस्था केली असती, याची कल्पनाच करवत नाही!
औरंगजेबाने त्याच्या राज्यात संगीत आणि नृत्यावर बंदी घातल्यावर संगीताची प्रेतयात्रा काढली, याबाबतची माहितीही वेलणकर यांनी दिली होती. या माहितीला खाफीखानाचा संदर्भ दिला आहे. खाफीखान लिहितो, “एके दिवशी काही कलावंत आणि कव्वाल मोठ्या संख्येने गर्दी करून मोठमोठ्याने रडत ओरडत आणि सोबत एक तिरडी घेऊन बादशहाच्या (औरंगजेब) दर्शन झरोक्याच्या पायथ्यापाशी जमा झाले. हे सर्व पाहून औरंगजेबाने विचारले की, “या तिरडीचे आणि आरडाओरड्याचे प्रयोजन काय?” तेव्हा ते कलावंत उत्तरले की, “संगीताचा मृत्यू झाला आहे आणि आम्ही त्याचे प्रेत या तिरडीवर घेऊन निघालो आहोत.” यावर औरंगजेबाने त्यांना सांगितले की, “या (संगीताच्या) प्रेताला अशा प्रकारे पुरा की, त्याचा आवाज परत कधीही वर येता कमा नये!” (मुन्तखबुल्लुबाब, खाफीखान, खंड दोन, पृ. २१३) असा औरंगजेब गणेशमूर्तीसमोर वीणा वाजवतो, हे म्हणणे किती वस्तुस्थितीला धरून ठरेल का?
औरंगजेबाने मंदिरांना दान दिले, असाही दावा काही लोक करत असतात. देवळांना देणग्या देणारा औरंगजेब देवळे कसा पाडेल? असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न यामागे असतो. हा दावाही तसा नवीन नाही. ढोंगी पुरोगामी सोशल मीडियावर आणि पिवळ्या पुस्तकात अशा पुड्या सतत सोडत असतात. याला कम्युनिस्टांनी विळखा घातलेली ‘एनसीआरईटी’ही अपवाद नाही. ‘एनसीईआरटी’ने इयत्ता बारावीसाठी तयार केलेल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात लिहिले होते की, ''Even when temples were destroyed during war, grants were later issued for there repair -as we know from the reigns of Shah jahan and Aurangzeb.''
थोडक्यात, युद्धाच्या दरम्यान मंदिरे उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांच्या दुरूस्तीसाठी शाहजहान आणि औरंगजेब अनुदान देत असे. वरील विधानाचा पुरावा काय, असा प्रश्न शिवांक वर्मा यांनी माहिती आधिकार (Right to Information Act, २००५) नुसार ‘एनसीईआरटी’ला विचारला असता, याविषयी आमच्याकडे काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांनी लिखित स्वरुपात दिले आहे. परकीय आक्रमकांचे महिमामंडन करण्याचा प्रयत्न येथील डाव्या इतिहासकारांनी सतत केला आहे. त्यांची पापे लपवून त्यांना ‘एनसीईआरटी’च्या वॉशिंग मशिनमध्ये घालून ’मिस्टर क्लीन’ करण्याचा हा विषारी उद्योग किती भयानक आहे, हे शिकून जेव्हा आमची मुले आयएएस, आयपीएस होतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि मुघल सारखेच वाटतील यात नवल काय?
दि. २८ एप्रिल १९८९ रोजी प. बंगालमधील मार्क्सवादी सरकारने एक परिपत्रक काढले होते. त्यात लिहिले होते की, “भारतातील मुस्लीम राज्यकर्त्यांच्या कालखंडाची निंदा होता कामा नये. मुस्लीम आक्रमकांनी या देशात मंदिरांचा विध्वंस केला, त्याचा कुठेही उल्लेख नसावा.” (परिपत्रक एसवायएल/८९). कसलेही पुरावे नसताना इतिहासात जागोजागी थापा मारलेल्या आहेत. अशा खोट्या गोष्टी हटवणे म्हणजे पुरोगाम्यांना शिक्षणाचे ‘भगवेकरण’ वाटते. औरंगजेबाने म्हटले आहे की, मुसलमानी धर्मात देवळाकडे पाहाणेदेखील पाप आहे. याबाबतचा अस्सल अखबार सत्येन वेलणकर यांनी समाजमाध्यमांत प्रसारितदेखील केला होता. तो पुढीलप्रमाणे-
बादशहाकडे (औरंगजेब) अर्ज आला. मथुरेत केशवरायाच्या देवळांत दाराशुकोह याने एक दगडी कठडा बांधला आहे. बादशहाने ते ऐकून हुकूम दिला की, मुसलमानी धर्मात देऊळ बघणेसुद्धा निषिद्ध मानले आहे व या दाराशुकोहने तेथे कठडा उभा केला आहे. ही गोष्ट मुसलमानास योग्य नाही. औरंगजेबाने छत्रपती संभाजीनगरच्या राममंदिराला किंवा हिंदूंच्या कुठल्याही देवळांना देणग्या दिल्या असतील का, याचा विचार समाजाने करण्याची गरज आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनीही परकीय मुस्लीम आक्रमकांच्या अत्याचाराचे वर्णन केले आहे. ’शिवाजीचा पवाडा’ नावाने केलेली त्यांची रचना महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले समग्र वाङ्मया’त समाविष्ट केली आहे. त्यात महात्मा फुले लिहितात,
काबुला सोडी। नदांत उडी॥
ठेवितो दाढी। हिंदूस पीडी॥
बामना बोडी। इंद्रियें तोडी॥
पिंडीस फोडी। देवळें पाडी॥
चित्रास तोडी। लेण्यास छेडी॥
गौमांसी गोडी। डुकरां सोडी॥
खंडयास ताडी। जेजूरी गडी॥
भुंग्यास सोडी। खोडीस मोडी॥
मूर्तीस काढी। काबूला धाडी॥
झाडीस तोडी। लुटली खेडीं॥
गडास वेढी। लावली शीडी॥
हिंदूस झोडी। धर्मास खोडी॥
राज्यास बेडी। कातडी काढी॥
गर्दना मोडी। कैलासा धाडी॥
देवळें फोडी। बांधीतो माडी॥
उडवी घोडी। कपाळा आढी॥
मीजास बडी। ताजीम खडी॥
बुरखा सोडी। पत्नीखस पीडी॥
गायनीं गोडी। थैलीतें सोडी॥
पुढे या स्थितीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिक्रिया काय झाली, याबाबत महात्मा फुले लिहितात,
माताबोध मनीं ठसतां राग आला यवनांचा। बेत मग केला लढण्याचा॥ तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा।
स्नेह येशाजी कंकाचा॥मित्रा आधीं ठेवी
जमाव केला मावळ्यांचा।
पूर करी हत्यारांचा॥ मोठ्या युक्तीनें सर केला किल्ला तोरण्याचा।
रोविला झेंडा हिंदूचा॥
याच पोवाड्यात महात्मा फुले यांनी औरंगजेबाचे वर्णन केले आहे.
जीधर उधर मुसलमानी। बिस्मिल्लाहि हिमानी॥
सच्चा हरामी शैतान आया। औरंगजीब नाम लिया॥
छोटे भाईकूं हूल दिया।
बडे भाई की जान लिया॥
छोटेकूंबी कैद किया। लोक उसके फितालिया॥
मजला भाई भगा दिया। आराकानमें मारा गया॥
सगे बापकूं कैद किया। हुकूमत सारी छिनलीया॥
भाईबंदकूं इजा दिया। रयत सब ताराज किया॥
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याचे अत्याचार मांडले, महात्मा फुले यांनी ज्याची कडक शब्दांत निंदा केली, तो औरंगजेब महाराष्ट्रातील ढोंगी पुरोगाम्यांचा आदर्श आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे.
औरंगजेब हा त्याच्या ’मजहबी’ कृत्यामुळे कुणाला आदर्श वाटणे साहजिक आहे. त्यांचा प्रश्नच नाही.औरंगजेबांकडे बघण्याची त्याची दृष्टी आणि आकलन अगदी स्पष्ट आहे. प्रश्न आहे तो मुस्लिमेतर समाजाचा! पाच पाच पातशाह्या हिंदुस्थानच्या छातीवर नाचत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. याच हिंदवी स्वराज्याच्या पवित्र कार्यासाठी मुलाच लग्न टाकून तानाजी मालुसरेंनी सिंहगडावर बलिदान दिले. बाजीप्रभु देशपांडेंनी पावनखिंडीत हजारो वार झेलत मृत्यूलाही रोखून धरले. हिंदवी स्वराज्याचा भगवा तळपत राहावा, म्हणूनच सूर्याजी काकडे, बाजी पासलकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते यांनी रक्त सांडले. अठरापगड लाख मराठे पानिपतावर धारातीर्थी पडले तो हाच दिवस बघण्यासाठी का? त्यांच्याच भूमीत देशाच्या शत्रूचे उदात्तीकरण व्हावे, यापेक्षा दुर्देव ते काय असेल?
रवींद्र सासमकर