नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वे स्थानकाजवळ दि. २ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा रेल्वे अपघात झाला . या अपघातात स्टेशनजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात रेल्वेमध्ये २८८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले.
दरम्यान बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर येथील बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर रूळाच्या दुरूस्तीचे काम जोरात सुरू आहे. आतापर्यत हावडा-चेन्नई मार्गावरील ९० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ४६ गाड्या पुन्हा मार्गस्थ करण्यात आल्या आहेत.अधिकृत माहितीनुसार , सोमवारपर्यत ट्रॅकची दुरूस्ती होणे अपेक्षित आहे. यादरम्यान बालासोरमध्ये एक हजाराहून अधिक मजूर रात्रभर ढिगारा हटवण्याचे काम करत होते. ढिगारा हटवण्याच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेमंत्र्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.