शनिवार, दि. ६ मेच्या वैशाख ज्येष्ठ कृष्ण पक्षातील प्रतिपदेला आपण ’नारद जयंती’ साजरी केली. मुखी नित्य नारायणऽऽ नारायणऽऽ असा मंत्रोच्चार, नामसंकीर्तनात गढलेली आनंदमयी मुद्रा, वीणेचा टणत्कार, हातातील चिपळ्यांचा छुळछुळ-खळखळ असा नाद, गळी पुष्पमाला असे नारदमुनी नुसते मनात जरी आले तरी आपले चित्त नकळत प्रसन्न होत असतं, अशा नारदाची महती या निमित्ताने नारदपूराणाच्या वाङ्मयभांडारातले मोजकेच पैलू बघत या लेखात आपण वर्णूया.
श्रीगणेशाय नमः । नारद उवाच ।
असा प्रारंभ करत आपण
प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
असे ॥ इति श्री नारदपुराणे संकटनाशन-गणपती स्तोत्रम् सम्पूर्णम ॥ हे स्तोत्र पठण करतो, काही श्लोक म्हणतो. नारदाचा उल्लेख असलेल्या गणेश वंदनेनं आपण आपल्या कार्यांचा श्रीगणेशा करतो. १८ मुख्यपुराणे व उपपुराणे अशा पौराणिक वाययांसमवेतच सत्यनारायणादी व्रतवैकल्ये यांसारख्या पोथ्या, रामायण, महाभारत, श्रीमद् भागवत अशा कथा, अख्यायिका यांत नारदांचं स्थान अनन्यसाधारण असलेलं आपण बघतो. ज्यांचे त्रैलोक्यांत येणं-जाणं सतत होत असते अन् ते देखील निमिषार्धात; असं अन्य व्यक्तिमत्त्व कथा-पुराणांतही शोधून सापडण अवघडच आहे.
मानसपूत्र नारद...
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरमश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् स्मरेन्नित्यम् मार्कंडेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोऽपि सर्वव्याधिविवर्जितः॥
या श्लोकात जे सात चिरंजीव आहेत त्यात नसूनही महाभारतात हरिवंशपर्वात नारदाचे वर्णन व्यासांनी केले आहे त्यात नारदांना ‘चिरञ्जीव’ म्हणून गौरविलेले आहे. आज आपण ओळखतो ते नारद हे ब्रह्मदेवाच्या मरीची, अत्री, अंगिरा, पुलह, ऋतू, पुलस्त्य, प्रचेता, भृगु, नारद आणि वसिष्ठ अशा दहा मानसपुत्रांमधील एक असून वर उल्लेख केल्याप्रमाणे असलेल्या अष्टचिरंजिवांपैकी एक आहेत. ‘नारदांचे चरित्रवर्णन भागवत’, ‘वराहपुराण’, ‘ब्रह्मवैवतपुराण’, ‘लिंगपुराण’, ‘हरियज्ञ’ व ‘नारद पंचरात्र’ या ग्रंथात दिलेले असून त्यातील ‘भागवत’ व ‘वराहपुराण’ यांतील भाग आत्मचरित्रात्मक असून इतर पुराणांमधील भाग चरित्र म्हणून आला असल्याचे पुराणांचे अभ्यासक सांगतात.
पुराण मालिका
१८ महापुराणांपैकी भागवतपुराण हे सर्वाधिक लोकप्रिय असे महापुराण म्हणून ओळखले जाते. ते संस्कृतात आहे. हे नुसते भागवत वा ‘श्रीमद्भागवत’ या नावाने प्रसिद्ध आहे. याची रचना १२ स्कंधांत करण्यात आली आहे. विष्णूचा अवतार कृष्ण हा भागवताचा नायक असून त्याच्या भक्तीचे गुणगान त्यात केलेले आहे म्हणून हे एक वैष्णव पुराण मानले जाते. या महापुराणानुसार ते वासुदेवाने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासांना, व्यासांनी शुकदेवाला आणि शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितले, अशा साखळीत नारदाचे महत्त्वाचे स्थान आढळते.
नारद एक ऋषी ...
गमनार्थक ‘ऋष’ धातूपासून ‘ऋषि’ हा शब्द येतो. भटकणारा, असा त्याचा व्युत्पत्त्यर्थ. वेदमंत्रांचा द्रष्टा म्हणजे कर्ता असा मूळ रूढार्थ. त्रिकालदर्शी अशी विद्यातपःसंपन्न व्यक्ती म्हणजे ऋषी, असा अर्थ नंतर सामान्यपणे रूढ झाला आहे. विद्यातपःसंपन्न अशा पुरातन विशिष्ट व्यक्तींचा निर्देश ऋषी शब्दाने होतो. मनुष्यजीवनाच्या सर्वांगी ज्ञानाचा संप्रदाय परमेश्वराने ऋषींद्वारा प्रवृत्त केला. ऋषींचे सात प्रकार आहेत : ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, परमर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी आणि राजर्षी. त्यातील देवजातीचे जे ऋषी ते देवर्षी. या गटात धर्म, पुलस्त्य, क्रतू, पुलह, नर-नारायण, वालखिल्या, नारद इ. ऋषी येतात.
नारद एक ’देवर्षी’...
ज्याच्या ठिकाणी देवत्व आणि ऋषित्व या दोहोंचा समन्वय असतो त्यास देवर्षी म्हणतात. असे एकूण आठ देवर्षी असल्याचा उल्लेख वायुपुराणात (अध्याय ६१ ङ ८३ -८५) येतो. त्यातील नारद हा अग्रगण्य आहे, असे ‘देवर्षीणां च नारदः’ या गीतावचनावरून (१०ङ२६) दिसते. अध्यात्मात अनन्यसाधारण महत्त्व असणार्या भक्तीचे महत्त्व देवर्षी नारदांनी त्यांच्या सुत्रांमध्ये सहज सुलभ तर्हेने प्रतिपादन केले आहे. आपण नारदांना देवर्षी नारद म्हणून संबोधतो. ऋग्वेद, अथर्ववेद, छांदोग्य उपनिषद यामधून नारदांविषयक माहिती मिळत असली तरी भागवतात त्यांची सविस्तर माहिती मिळते. एका क्षुद्र दासीचा पुत्र म्हणून नारद त्याच्या पूर्व जन्मामध्ये जन्मला होता. तो पाच वर्षांचा असताना काही संन्यासी सत्पुरुषांची सेवा करण्याची संधी त्याला प्राप्त झाली. त्यांनी या मुलाला श्रीविष्णूचा नाममंत्र दिला. पुढे त्याच्या मातेच्या मृत्यूनंतर त्याने वनात जाऊन त्या मंत्राच्या आधारे तपश्चर्या केली. भगवंताचे दर्शन होऊन अखेरपर्यंत भगवंताचे गुणगान करत तो फिरत राहिला. मृत्यूनंतर नारद ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून जन्मला आणि त्याला देवर्षीपदही प्राप्त झाले. एकूण नारदाने अत्यंत क्षुद्र अवस्थेतून ईश्वरभक्तीच्या, श्रद्धेच्या बळावर ’देवर्षी’ ही उच्चतम अवस्था प्राप्त केली. नारद ऋषी हे ‘नारद भक्तिसूत्रे’, ‘नारद स्मृती’, ‘नारदीय शिक्षा’, ‘नारद परिव्राजकोपनिषद’, ‘नारदीय पुराण’ आणि ‘नारद पंचरात्र’ अशा ग्रंथांचे कर्ते मानले जातात.
देवर्षी नारद पंचरात्र...
पंचरात्र किंवा पांचरात्र म्हणजे एक वैष्णव भक्तिसंप्रदाय असून तो अनेक तंत्रमार्गांपैकी एक मार्ग आहे. याला ‘सात्वत’, ‘भागवत’, ‘नारायणीय’ अशाही संज्ञा आहेत. विष्णूच्या सहस्त्र नामांमधील एक नाव असलेल्या वासुदेवाची भक्ती व पूजा ज्या शास्त्रात सांगितली आहे, त्यास पांचरात्र तंत्र म्हणतात. या शास्त्राचे ज्ञान, योग, क्रिया आणि चर्या असे इतर तंत्रांप्रमाणेच चार पाद म्हणजे भाग आहेत. ‘पांचरात्र’ ही संज्ञा एका संप्रदायास दिली याचे कारण असे असणे शक्य आहे की, पाच दिवसपर्यंत ओळीने वार्षिक समारंभ या संप्रदायात चालत असावा, अशी कल्पना करता येते. ‘पांचरात्र’ ही संज्ञा का पडली, यासंबंधी निरनिराळ्या उपपत्ती सांगितल्या आहेत त्यापैकी एकात सांगितलं आहे की, एका प्रातःकालापासून दुसर्या प्रातःकालापर्यंतचे पाच विभाग पाडून क्रमाने भक्तियुक्त अंतःकरणाने अभिगमन, उपादान, इज्या, स्वाध्याय व योग अशी पाच कर्मे करावयाची. प्रातःकाली ब्राह्म मुहूर्तावर उठल्यानंतर जप व ध्यान करीत, स्तोत्रे म्हणत, देवापाशी जायचे, यास अभिगमन म्हणतात. नंतर फुले -फळे व इतर पूजासामग्री गोळा करावयाची, याला उपादान म्हणतात. त्यानंतर पूजेत वेळ घालवायचा, या पूजेस इज्या म्हणतात. त्यानंतर धर्मग्रंथांचे पठण, श्रवण व चिंतन करणे, यास स्वाध्याय म्हणतात.
संध्याकाळी पुन्हा पूजा करून योगाभ्यास करायचा व ध्यान करीतच निद्रावश व्हावयाचे. या पाच कालखंडांना पंचरात्र आणि या पाच कालखंडात जी धार्मिक कृत्ये करावयाची त्यांस पांचरात्र म्हणतात, असा हा प्रतिदिन आचरावयाचा मार्ग होय. दुसर्या ठिकाणी सांगितलं आहे की, संप्रदायाच्या भारद्वाजसंहितेमध्ये म्हटले आहे की, ब्रह्मरात्र, शिवरात्र, इंद्ररात्र, नागरात्र आणि ऋषिरात्र अशा पाच रात्री होत. म्हणून यास पांचरात्र म्हणतात. पांचरात्र तत्त्वज्ञानाचा महाभारतामध्ये (शांतिपर्व ३४८ङ६२-६३ आश्वमेधिक पर्व ११८ङ३३) उल्लेख आहे. विष्णूपुराणासारख्या पुराणांमध्येही याचा निर्देशआहे. महाभारतात म्हटले आहे की, या पांचरात्र विद्येचा साक्षात भगवान नारायणाने नारदास उपदेश केला हे महान उपनिषद आहे याच्यात चारही वेद व सांख्य आणि योग यांचा समावेश झाला आहे. रा.गो. भांडारकर यांनी हा वासुदेवभक्तिसंप्रदाय इसवी सनाच्या चौथ्या शतकापूर्वीपासून भारतात प्रचलित आहे, हे सिद्ध केले आहे.
नारद-कीर्तन नातं
इतर ग्रंथांत जे सांगितलं आहे त्याचा आधार घेत समर्थ रामदासांनी आपल्या सार्थ श्रीदासबोधातील चौथ्या दशकात भगवंताची नवविधाभक्ती कशी करावी हे सांगितलं आहे. श्रवण, कीर्तन, विष्णूचे स्मरण, पादसेवन, अर्चना, वंदन, दास, सख्य आणि आत्मनिवेदन. त्यात कीर्तनभजननिरुपण नामक दुसरा समास आहे.
सदा सर्वदा हरिकीर्तन। ब्रह्मसुत करी आपण।
तेणें नारद तोचि नारायण। बोलिजेत आहे ॥
नारदऋषी सर्वदा हरिकीर्तन करीत असतात. त्यामुळेनारद तोच नारायण, असे म्हटले जाते. कीर्तनाची थोरवी समर्थांनी गायली आहे. समर्थ सांगतात की, भगवंताची कीर्ति वाढवण्यासाठी सगुणाचे कीर्तन करावे. जो कीर्तनकार असतो त्याचे पाठांतर उत्तम असते. त्याचे अर्थ सगळ्यांना समजतील असे त्यांना ज्ञात असतात. आपल्या कीर्तनात भाषण, नामघोष, ताळ्यांचा नाद, टाळ, चिपळ्या, मृदंग, संगीत, नृत्य, ताना इत्यादी गुणांनी युक्त अनुसंधान तो तुटू देत नाही. प्रसंगाप्रसंगाने अनेक कल्पित आणि घडलेल्या गोष्टी तो कीर्तनकार सांगत असतो. हे सगळे नारदात आपल्याला आढळते म्हणून नारदाचं आणि कीर्तनाचं नात अतूट मानलं जातं, असे ते आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात.
नारदाची उज्वला भक्ती...
नारद आपल्या भक्तिसुत्रात मधुरा वा उज्ज्वला भक्तीचा दाखला देतात. प्रियकर-प्रेयसी ह्यांचं एकमेकांवरील प्रेम जसं उत्कट असतं त्याप्रमाणे आपलं ईश्वरावरील प्रेम उत्कट हवं आणि असे मानून केल्या जाणार्या भक्तीच्या प्रकारास मधुरा वा उज्ज्वला भक्ती म्हणतात. गोपींनी कृष्णाची प्रेमस्वरूप भक्ती केली आणि त्यामुळे त्यांचा उध्दार झाला त्या प्रेमास मधुरा भक्ती अथवा उज्वला भक्ती असं मानलं जातं आणि तसे विवेचन भागवतात आहे. अशात आत्यंतिक उत्कटता व माधुर्य आढळत असल्यामुळे अनेक भक्तांनी ईश्वरभक्तींची अनुभूती घेण्यासाठी हे नाते स्वीकारल्याचे दाखले आहेत. नारद हे त्यांच्या भक्तीसूत्रांत भक्तांचा आदर्श म्हणून ब्रजगोपिकांचा निर्देश करताना मधुरा व उज्वला भक्तीची महती सांगताना आपल्याला आढळतात.
आणि नारदाच्या भुमिकेत..
.
धन्य धन्य तो नारदु । ज्यासी सर्वां सर्वत्र गोविंदु ।
सर्वथा हरिनामाचा छंदु । तेणे परमानंदु सदोदित ॥
जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा।
ज्याचेनि संगे तत्त्वतां । नित्यमुक्ततां जडजीवा ॥
एकनाथी भागवतात नारद आणि श्रीकृष्णाचं प्रेम आपल्याला आढळतं. असे सख्य भागवत कथेत असो अथवा रामायण, महाभारत तसेच संगीतनाटक, चित्रपट अशा अनेक कथानकांत असो, नारदाचे पात्र सतत लोकप्रिय असल्याचे आपण बघत आलो आहोत. नारद हे त्रिभुवन संचारी जसे होते तसेच ते एकाच वेळी देव, दानव, गंधर्व, नाग, मनुष्य अशा सर्वांना प्रिय होते. प्रत्येकाच्या घरी-दारी-दरबारी नारदांना मुक्त प्रवेश होता. कुशल संवादपटू, थोर विद्वान व व्यासंगी तत्त्वचिंतक ग्रंथलेखक असे सर्वकाही असलेले ते थोर सल्लाकारही होते. अशा नारदाच्या कथानकाच्या पात्रात नारदाची भुमिका अनेक दिग्गज नट नट्यांनी वठवल्या आहेत.
नाटकांतील नारद...
बळवंत पांडुरंग किर्लोस्कर अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत सौभद्र पासून ते आजपर्यंत नारदाची पात्र सतत लोकप्रिय होत गेली. देवांना कधिही वार्धक्य येत नाही आणि अशा देवकोटीला पोहोचलेल्या मराठी नाटकांमध्ये संगीत सौभद्र मधील नारदाचं पात्र चिरतरुणच ठरते. १८४३च्या त्याकाळात मराठी संगीत नाटकाचं खरं युग सुरु झालं होत. तेंव्हापासून भागवत आणि महाभारतातल्या कथांवर आधारित ती नाटकं प्रसिद्ध होत राहिली आणि यापुढेही राहतील. भालचंद्र पेंढारकर, अर्जुनाचंही काम करणार्या बालगंधर्वांबरोबरदेखील नारदाची भुमिका केलेला नट. लग्नाला जातो मी, राधाधर मधुमिलींद जयजय अशी स्मरणीय नाट्यगीतं आपल्याला नारद ऐकवत असतात. १९४० साली मुंबईच्या ऑपेरा हाऊस मध्ये सत्तेचे गुलाम या नाटकाचा प्रयोग लावण्यात आला होता. हा प्रयोग एका धर्मांर्थ संस्थेला देणगी देण्याच्या आग्रहातून लावण्यात आला होता. या प्रयोगाला प्रमुख उपस्थिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लावली होती. या प्रयोगाच्या वेळी सावरकर यांच्या हस्ते अनंत दामले यांना ’नूतन पेंढारकर’ ही पदवी प्रदान केली होती.
मराठी संगीत रंगभूमीवर आपल्या गायनाने आणि अभिनयाने अनंत दामलेंनी अनेक नाटकांमध्ये अभिनय करत अनेक भूमिका वठवल्या पण ते प्रामुख्याने लक्षात राहीले ते नारदाच्या भूमिकेसाठी. बर्याच ठिकाणी नारदाच्या भूमिका झाल्या असतील पण अनंत दामलें सारखी भूमिका कोणाला जमली नाही. १९३९ साली न.चि. केळकर हे अनंत दामलेंचं कृष्णार्जुन युद्ध या नाटकाचा प्रयोग बघायला आवर्जून गेले होते. ते देखील त्या नारदावर खूष होते. स्वयंवर, सुवर्णतुला, जय जय गौरी शंकर, अशी नारदाची भुमिका असलेल्या अनेक नाटकांमधील ही काही नाटक होत. अनेक रंगकर्मी पुरुष नटांसारखेच नाट्यकलेत प्रसिद्ध असलेल्या जयमाला शिलेदार ह्यांच्यासारख्यांनी देखील नारदाचे पात्र रंगवलं आहे. ह्यानंतर चित्रपटांतील नारद बघण्याआधी आपण जरा नाटक आणि नारदाचं अतुट नात असलेल्या ’किर्तन’ ह्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध जाणून घेऊ.
किर्तन आणि नाटक....
किर्तन जेंव्हा सादर केले जाते तेंव्हा सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते. नाटकातदेखील अशी काही अंग दिसतात. असे कीर्तन आणि नाटक ह्यात साधर्म्य दिसते. त्याचा थोडा इतिहास बघता असे समजेल की ५ नोव्हेंबर १८४३ला सांगलीत सीता स्वयंवर ह्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. सांगलीचे राजे आप्पासाहेब पटवर्धनांनी आर्थिक मदत तेंव्हा देऊ केली होती. ते स्वतः कीर्तनकारी परंपरेचे होते. कीर्तनाच्या स्वरुपात तो नाट्यप्रयोग होता. किर्तन परंपरेने मराठी नाट्यसंगिताचा उगम झाला असे आपण म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. तोच ५ नोव्हेंबरचा दिवस आपण रंगभुमीदिन म्हणून साजरा करतो. विष्णुदास भावे जसे कीर्तन परंपरेतील होते तसेच आण्णासाहेब किर्लोस्करदेखील कीर्तन परंपरेतील होते. त्यामुळे त्यांच्या नाटकांमध्ये कीर्तनातील सगळे प्रकार असायचे. शास्त्रीय संगीत, कंठ संगीत, हिंदूस्तानी, दाक्षिणात्य, शास्त्रीय संगीत, जुगलबंदी, गायन, वादन, धृपद वगैरे अन्य प्रकार जसे नाट्य संगीतात वापरले जात तसेच ओव्या, साथी, दिंडी असे सगळे किर्तनातील गायनप्रकार त्यात गायले जातात.
कामदा, ओवी हे सगळे किर्तनातून नाटकात आले. साथी हा देखील तसाच प्रकार. त्या ’साथी’त जे गद्यातून सांगायचं ते पद्यात उत्कष्टपणे सांगीतले जातं त्यामुळे नाटक झर् कन चार पाच पान पुढे सरकून जायच. ’झंपा’तला गीत हा प्रकार कीर्तनकार बुवा रंगवतात तो देखील नाट्यसंगीतात उतरला. कीर्तनातील सगळे प्रकार संगीत नाटकांत उपयोगात आणत. गायनकलेतही नारद आपल्या सगळ्यांच्या मुखी किर्तन व नाट्यसंगीतातून सतत असतो तसाच हा नारद भक्तीगीतांमधूनही आपल्या मुखी असतो. नारदा मुनिवरा । तुझे मी गाता गौरवगीत । रंगले हरी भजनी संगीत । सुधीर फडके ह्यांनी गायलेल्या अण्णा जोशी ह्यांच्या शब्दांना नीळकंठ अभ्यंकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल हे भक्तीगीत ऐकतांना नारदाची आठवण आपल्याला झाल्यावाचून राहवत नाही. तसेच शाहीर साबळेंनी गायलेल ’बरी नव्हे थट्टा, भलभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा’ नावाचं संत एकनाथाचं एक प्रसिद्ध भारुड आहे. त्यात त्यांनी ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी । थट्टेने हरवली बुद्धी । केली नारदाची नारदी । अशी ही थट्टा असं नारदाच उदाहरण देत समाजाने थट्टेला भिऊन चालावे अन्यथः विनाशाला आपणच कसे पाचारण कराल हे दाखवून दिलं आहे.
चित्रपटात नारद....
नाट्य क्षेत्रासमवेतच चित्रपट क्षेत्रालाही नारद आपली मोहिनी घालत असतो. १९४४-४५साली ‘वाल्मीकी’ ह्या चित्रपटात राज कपूरला भालजी पेंढारकरांनी छोट्या नारदाची भूमिका दिली होती. त्या चित्रपटात वाल्मीकीची भूमिका पृथ्वीराज कपूर करत होते. त्यात एक प्रसंग असा आहे की, वाल्मीकी नारदाच्या पाया पडतात. त्या छोट्या नारदाला भालजींनी पाच हजाराची बिदागी देऊ केली होती. तो नारद पुढे भारतीय चित्रपटसृष्टीत ’शोमन’ बनण्यासाठी मुंबापुरी गेला आणि नारदाच्या पहिल्या कमाईवर स्वतःचा स्टुडिओ स्थापन केला. नंतर हिंदीमधे अनेक सामाजिक, पौराणिक चित्रपट निघू लागले. मराठीचा विचार करता एका चित्रपटाचा वानगीदाखल उल्लेख करता येईल, तो म्हणजे १९५७ मधे पौराणिक/विनोदी असलेला ’उतावळा नारद’. पं. महादेवशास्त्री जोशी ह्यांची कथा, राजा ठाकूरांच दिग्दर्शन, यशवंत देवांचं संगीत, सुधीर फडके, सुमन कल्याणपूर, यशवंत देव ह्यांचे स्वर असलेल्या त्या चित्रपटात नारदांच्या मनात संसाराविषयी मोह उत्पन्न होतो आणि ते लग्न करण्याचं ठरवतात. हे पाहून त्यांचा परममित्र पर्वतमुनी अतिशय चिंतातूर होतो आणि त्यांचं मन वळवायचा प्रयत्न करतो.
तेव्हा नारदमुनी आपल्यासाठी बायको शोधण्याची जबाबदारी कृष्णावर टाकतात. तेव्हा कृष्णाने त्यांना एक अतिशय सुंदर मुलगी उत्पन्न करून दिली.उतावळा नारद तिच्याशी लग्न करून मोकळा झाला खरा पण काही दिवसातच तो संसारातील कटकटींना कंटाळला आणि त्याने बायको व संसार सोडून दिला. असं कथासूत्र असलेल्या मराठी चित्रपटात नारद होता. १९६८ ’बलराम श्रीकृष्ण’ ह्या हिंदी चित्रपटात दारासिंग व शाहू मोडक ह्यांची प्रमुख भुमिका होती आणि त्यात नारदाची भुमिका वटवली होती बाबू राजे ह्या कलाकाराने. १९७२ला ’नारद लिला’ नावाचा चित्रपट होता त्यात जिवन हा नारदाच्या भुमिकेत तर शाहू मोडकही त्यात होते. तशाच ’नारद विवाह’ ह्या चित्रपटात नारदाची भुमिका सादर करणार्या असरानी आणि कृष्णाची भुमिका सादर करणार्या विक्रम गोखले ह्यांनी अभिनय केला. मायेच्या मोहात पडताना मनुष्य कसा भरकटतो, त्याला मुक्ती तर हवी असते पण मायेचं बंधन तोडणं त्याला कठीण होतं असतं, आपल्या ईच्छा विसरुन भगवंताच्या चरणी जाणे हा मुक्ती मिळवण्याचा कसा एकमेव उपाय आहे, हे त्या चित्रपटातून सांगीतलं आहे.
अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्ति शार्ङ्गधन्वनः ।
गायन्माद्यन्निदं तन्त्र्या रमयत्यातुरं जगत् ॥
‘अहो ! हे देवर्षि नारद धन्य आहेत. जे आपली वीणा वाजवीत भगवद-गुणगायनात तल्लीन होतात व संसारदुःखाने तप्त जीवांना सदा आनंदित करतात - श्रीमद्भागवत, स्कंध १-६-३९ ह्यातील विचार नाट्य-चित्रसृष्टीही आपल्याला नारदरुपाने देत असते.भगवंतानी रचलेली लिला, नारदाची नारदी ही अर्धांगगिनी त्यांची ’सप्तसुर’ अशी अपत्ये कशी ओळखली जातात आणि भगवंताची व नारदाची जन्मोन्जन्माचा भक्तीसूत्रातला अध्यात्म अशा माध्यमांतून समाजापूढे मांडण्याचा प्रयत्न नाटक व चित्रपटकलेतून केला जातो.
नारदाचे भक्तीसूत्र...
नवविधाभक्तितली समर्थाना अपेक्षित असलेली भक्ती म्हणजे काय, भक्ती प्राप्त होणे, त्याची लक्षणे, त्याचे परिणाम, भक्ताची आंतरिक आणि बाह्य आवस्था व वर्तणूक इत्यादी संबंधी विवेचन नारदांच्या भक्तिसूत्रातदेखील केलेलं आहे.
पद्मपुराणात एक श्लोक आहे :
अल्पाक्षरं असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम् ।
अस्तोभमनवद्यंच सूत्रं सूत्रविदो विदु: ॥
ह्याचा अर्थ ज्या वचनांत कमीत कमी शब्द असंदिग्ध अर्थ, पुनरुक्ती रहित पण खूप महान व मोठा अर्थ दडलेला असतो त्याला ’सूत्र’ म्हणतात. ’सूत्र’ ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे ’धागा’. सूत्राने त्यामध्ये दडलेला खूप मोठा अर्थ सुसूत्रपणे बांधलेला असतो. नारद भक्तिसूत्रात ८४ सूत्रे आढळतात. प्रतिपादित विषयाबद्दल सर्वांगाने सूत्रातून माहिती स्पष्ट केली जाते. सूत्रामध्ये निरर्थक वर्णनात्मक शब्द कधिही नसतात. नारद भक्तिसूत्रातील सूत्रे भक्तिमार्गातून चालणार्यांना सुस्पष्ट मार्गदर्शन करणारी असून त्या मार्गांवरील धोक्यांचीही नेमकी जाणीव करुन देणारी आहेत.
वार्तावली...
नारदाची पत्रकारीता मुळतः अध्यत्मावर आधारित आहे. त्यांची निःस्वार्थी पत्रकारीता जातीभेद विरहित आहे. नास्ति तेषु जातिविधारूपकुल धनक्रियादि भेदः ॥ म्हणजेच जात, विद्या, रूप, कुल, धन, कार्य अशा कशाहीवर ती अवलंबून नसते. त्यात लिंगभेदही नसतो. अशा पुराणकाळातील नारदापासून आपण आजच्या युगातल्या नारदाला बघत आलो आहोत. लोकतंत्रात चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेत आपण नारदाच्या शिकवणुकीनुसार वागत आहोत का! हा विचार आपला आपणच करणे इष्ट ठरेल. नुकतेच चांगल्या पत्रकारितेतील विवीध व्यक्तींना पुरस्कार दिले जात आहेत. त्यातील नारदाला आवडेल अशी पत्रकारिता करणार्यांचे आपण येथे मनापासून अभिनंदन करु.ह्या लेखात आपण नारदाला विविध अंगाने समजुन घेण्याचा प्रयत्न केला. आता पुढील भागात नारदाच्या मंदिरांचा धांडोळा घेत त्यांच्या दर्शनास जाऊन त्यांच्या मंदिरांना प्रदक्षिणा घालु. (क्रमशः)
इति।
॥ जय जय रघुवीर समर्थ॥
-श्रीपाद पेंडसे