बिन बैलाची गाडी १७० वर्षांची झाली!

    14-Apr-2023
Total Views | 139
The fire engine turned 170 years old

बैल, घोडा, उंट, हत्ती, खेचर, गाढव यांपैकी कोणतंही वाहन न जोडलेली एक लोखंडी गाडी मुंबईहून धावत-धावत ठाण्याला गेली आणि परतसुद्धा आली. केवढा हा चमत्कार! १५ डब्बे आणि यात सुमारे ५०० माणसं बसलेली ही गाडी ओढायला बैल किंवा कोणतंच जनावर नाही? मग ती कशी ओढली जातेय? ती पाहा, वाफेचे सुस्कारे सोडत आणि शिट्यांच्या किंकाळ्या फोडत ती जी तीन इंजिनं धावतायत ना, ती खेचून नेतायत त्या डब्यांना.

दि. १६ एप्रिल, १८५३ हा दिवस. केवळ तत्कालीन मुंबई इलाख्याच्याच नव्हे, तर एकूण भारताच्या आणि संपूर्ण आशिया खंडाच्या दृष्टीने एक युगप्रवर्तक दिवस होता. बैल, घोडा, उंट, हत्ती, खेचर, गाढव यांपैकी कोणतंही वाहन न जोडलेली एक लोखंडी गाडी मुंबईहून धावत-धावत ठाण्याला गेली आणि परतसुद्धा आली. केवढा हा चमत्कार! १५ डब्बे आणि यात सुमारे ५०० माणसं बसलेली ही गाडी ओढायला बैल किंवा कोणतंच जनावर नाही? मग ती कशी ओढली जातेय? ती पाहा, वाफेचे सुस्कारे सोडत आणि शिट्यांच्या किंकाळ्या फोडत ती जी तीन इंजिनं धावतायत ना, ती खेचून नेतायत त्या डब्यांना. अहो, पण मग इंजिनांना कोण खेचताय? अहो, कसं कळत नाही तुम्हाला? पूर्वापार आपल्याकडे समुद्रावर जहाजे चालायची, ती कशावर? सांगा पाहू बरोबर. जहाजाच्या आकारानुसार, शिडं उभारली जायची. त्या शिडांमध्ये वारा भरला की, तो वारा जहाजांना खेचून न्यायचा. शिवाय गरज पडलीच तर माणसं वल्ही चालवायची. मग या गोर्‍या साहेबाने काय केलं? त्याने दगडी कोळसा जाळून त्याची कृत्रिम वाफ बनवली नि त्या वाफेवर जहाजं चालवायला सुरुवात केली. नैसर्गिक वार्‍याऐवजी दगडी कोळसा जाळून तयार झालेला वारा किंवा वाफ. त्याच्यावर जहाज चालतं म्हणून आपण तिला म्हणतो आगनाव किंवा आगबोट. तशीच ही गाडी म्हणजे तिची ती इंजिनं दगडी कोळशाच्या वाफेवर चालत आहेत. म्हणून तिला म्हणायचं आगगाडी.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. याचं कारण मुंबई हे एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळेच इंग्रजांनी आपला व्यापार हळूहळू सुरत शहरातून मुंबईला हलवला. १६६९ ते १६७७ या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या जेराल्ड अँजियर हा माणूस फार दूरदर्शी आणि पक्का व्यापारी होता. त्याच्या असं लक्षात आलं की, मराठे, पोर्तुगीज, सिद्दी, मुघल आणि आदिलशाही या सगळ्या सत्ताधार्‍यांमधल्या सततच्या लढायांमुळे व्यापारी वर्ग फार हैराण झालेला आहे. व्यापार वाढायला शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता लागते, तरच व्यापार वाढतो आणि व्यापार वाढला तरच महसूल वाढतो. पर्यायाने राज्याचा खजिना वाढतो. हे लक्षात घेऊन अँजियरने आजूबाजूच्या सर्व राज्यांमधल्या व्यापार्‍यांना आवाहन केलं की, तुम्ही मुंबईत या. व्यापार करा. तुमच्या सुरक्षेची हमी आम्ही घेतो. शिवाय आम्ही तुमच्या धार्मिकबाबतीत कोणतीही ढवळाढवळ, जुलुमजबरदस्ती करणार नाही. हे आश्वासन इंग्रजांनी बर्‍यापैकी पाळलं. त्यामुळे आसपासच्या सगळ्याच राज्यांमधले सर्व धर्मांचे व्यापारी मुंबईत इंग्रजांच्या आश्रयाला आले. गुजरातमधून पारशी आणि हिंदू भाटिये आले. ज्यू आणि ख्रिश्चन आले. मोगलाईतून खोबा आणि बोहरी हे शिया पंथी मुसलमान आले. कारण, मोगल हे कट्टर सुन्नी होते. पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारांना कंटाळलेले हिंदूसुद्धा आले.

मुंबईत म्हणजे भारतात रेल्वे सुरू व्हावी म्हणून ज्या द्रष्ट्या महापुरुषाने आटोकाट प्रयत्न केले, त्या जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ नाना शंकरशेट यांचे आजोबा बाबुलशेट मुरकुटे (हे आडनाव मुर्कुटे असं देखील लिहितात) हे अशाच रीतीने तत्कालीन साष्टी बेटातल्या घोडबंदरहून मुंबईला आले. सराफी आणि सावकारी यात उत्तम जम बसल्यावर त्यांनी इतरही व्यापारी व्यवसाय सुरू केले. मुरकुटे घराणं मूळचं ठाण्याजवळच्या मुरबाडचं. पण, बाबुलशेट साष्टी बेटाचं पश्चिम टोक असलेल्या घोडबंदर या गावी स्थायिक झाले.

आजच्या भौगोलिक परिभाषेत सांगायचं तर कुलाबा ते शीव (म्हणजे सायन) आणि कुलाबा ते माहिम हा भाग म्हणजे मुंबईची सात बेटं होती. त्यांच्यावर इंग्रजांचं राज्य होतं, तर कुर्ला ते ठाणे आणि वांद्रे ते भाईंदर हा भाग म्हणजे साष्टी नावाचं बेट होतं. ६६ गावांचा प्रदेश म्हणून ‘सहासष्टी’ किंवा ‘साष्टी.’ हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. ते साष्टीला म्हणायचे ‘सालसेट.’ भाईंदरपासून खाडीच्या मुखावरचा पहिला मोठा किल्ला म्हणजे घोडबंदर. उल्हास नदीच्या खाडीच्या मुखावरचं ते एक नामांकित बंदरसुद्धा होतं. पण, पोर्तुगीजांच्या भयंकर बाटवाबाटवीला कंटाळून अनेकांनी इंग्रजी मुलखात स्थलांतर केलं, तसंच बाबुलशेट मुरकुटे यांनीही केलं.

बाबुलशेट यांचे चिरंजीव शंकरशेट आणि त्यांचे चिरंजीव जगन्नाथ उर्फ नाना यांच्या कारकिर्दीत त्यांच्या घराण्याचं वैभव आणि प्रतिष्ठा इतकी चढती-वाढती होत गेली की, अखेर ‘मुरकुटे’ हे त्यांचं आडनाव मागे पडून ‘शंकरशेट’ हेच त्यांचं आडनाव बनलं. जगन्नाथ उर्फ नाना यांचा जन्म १८०३ सालचा. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी म्हणजे १८२२ मध्ये नानांचे वडील गेले आणि घरच्या अफाट व्यवसायाची धुरा नानांच्या खांद्यावर आली. या आधीच संपूर्ण देशाच्या दृष्टीने एक थारेपालटी घटना घडली होती. १८१८ साली इंग्रजांनी मराठी राज्य साफ बुडवलं आणि पुन्हा बंड-बिंड न व्हावं म्हणून पेशवा बाजीराव याला दूर उत्तर भारतात गंगेकाठी ब्रह्मावर्त उर्फ बिठूर या ठिकाणी हद्दपार केलं. संपूर्ण भारतावर आता इंग्रजांचं निष्कंटक राज्य सुरू झालं. त्यांची राजधानी होती कलकत्ता. पण, कलकत्ता हे बंदर म्हणून मुंबईइतकं सोयीचं नव्हतं. तीच गत मद्रासची होती. एकंदरीत भारताच्या पूर्वेकडला बंगालचा उपसागर हा जास्त वादळी हवामानाचा आहे. कलकत्ता आणि मद्रास ही दोन्ही बंदरं पूर्वेलाच आहेत. तुलनेने पश्चिमेच्या अरबी समुद्रावर वादळी हवामान कमी असतं आणि झालंच वादळ तरी मुंबई बंदर हे नैसर्गिकदृष्ट्याच सुरक्षित आहे. या कारणाने इंग्रजी राज्यात मुंबईचं महत्त्व वाढतच राहीलं.

१८२५साली इंग्लंडमध्ये रेल्वे सुरू झाली. वाफेच्या शक्तीवर समुद्रावर चालणार्‍या आगनावेप्रमाणेच आगगाडी जमिनीवरून दौडू लागली. रेल्वेचे रूळ टाकण्यासाठी जमिनी जातात, या कारणाने आणि कोणत्याही नव्या गोष्टीला विरोधच करायचा, या जनसामान्यांच्या जगभरच्या मानसिकतेमुळे खुद्द इंग्लंडमध्येही रेल्वेला विरोधच झाला. पण, तो देशच मुळी व्यापारी लोकांचा आहे. एका ठिकाणचा माल अल्पावधीत दुसरीकडे नेता येतो, हे पाहिल्यावर विरोध मावळला आणि रेल्वे मार्ग वाढत चालले. अमेरिका हे इंग्लंडचंच स्वतंत्र झालेलं भावंड. तिथे १८३१ साली रेल्वे सुरू झाली. अमेरिकेत मोठमोठ्या नद्या आणि कालव्यांमधून जहाजांतून मालवाहतूक चालायची. रेल्वेने जहाजांपेक्षा वेगाने आणि स्वस्त दरान वाहतूक सेवा द्यायला सुरुवात केली. एकूण मानवजातीच्या व्यापार क्षेत्रात ही एक क्रांती होती. शतकानुशतकं माणूस पाण्यातून जहाजांद्वारे आणि जमिनीवर जनावरांद्वारे खेचल्या जाणार्‍या वाहनांमधून माल किंवा प्रवासी वाहतूक करीत आला होता. आता या दोन्ही साधनांपेक्षा स्वस्त आणि जलद साधन उपलब्ध झालं होतं-वाफेच्या इंजिनाद्वारे खेचली जाणारी, लोखंडी रुळांवरून वेगाने धावणारी रेल्वे!

भारतात रेल्वेचं महत्त्व सर्वप्रथम हेरलं ते जगन्नाथ शंकरशेट या मराठी माणसाने. १८४३ साली त्यांनी आपले ज्येष्ठ मित्र जमशेटजी जीजीभॉय यांच्या सह ’ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ ही कंपनीच स्थापन केली. मुंबई इलाख्यापासून सुरुवात करून एकंदरीत भारतात सर्वत्र रेल्वे मार्ग सुरू करणं, हे भारतातील रयतेच्या आणि राज्यकर्त्या इंग्रजी ‘ईस्ट इंडिया’ कंपनीला किती फायदेशीर आहे, हे पटवून देणारं एक आवेदनच त्यांनी तत्कालीन मुंबई इलाख्याचा गर्व्हनर सर जॉर्ज आर्थर याला दिलं. सर जॉर्ज आर्थर हा इंग्रजच असला, तरी एकंदरीत बरा होता. शिवाय नाना शंकरशेट जी असंख्य लोकोपयोगी कामं स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करीत होते, त्याचं त्याला मोठं कौतुक वाटत असे. त्याने नानांची रेल्वे सुरू करण्याची योजना कलकत्याला गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंजकडे पाठवली. हार्डिंजने अर्थातच ती इंग्लंडला ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’कडे पाठवली, त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की, आपण इथे इंग्लंडमध्ये हाच विचार करून ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जी.आय.पी.)’ ही कंपनी स्थापन केली आहे, तर खुद्द भारतातले व्यापारीसुद्धा त्यासाठी उत्सुक आहेत.

मग पुष्कळ पत्रव्यवहार, खलबतं पहाणी, चाचपणी इत्यादी गोष्टी झाल्या. तेवढ्यात गर्व्हनर जनरल म्हणून हार्डिंजच्या जागी डलहौसी आला, हा फारच कडक स्वभावाचा होता. त्याला पहिला संशय कारण की, रेल्वे सुरू झाल्यामुळे भारतीय लोकांचं एकमेकांशी दळणवळण, संबंध, संघटन वाढेल आणि भारतीय लोक संघटित होणं म्हणजे इंग्रजी राज्याची मृत्यूघंटा. त्यावर पुष्कळ विचार झाला. नाना शंकरशेटांची ’ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ कंपनी ’ग्रेट इंडियन पेनिन्शूला’ कंपनीत विलीन करण्यात आली. शेवटी डलहौसीला पटलं की, व्यापारी मालाप्रमाणेच सैन्याच्या जलद हालचालींसाठीही रेल्वे इंग्रजांच्या फायद्याचीच आहे. मग मात्र तो कामाला लागला. उन्हाळ्यातल्या सिमल्यातच्या एका मुक्कामात त्याने, भारतात रेल्वे कसकशी पसरवली जावी, याचा तपशीलवार आराखडा बनवला. जुलै १८४८ मध्ये मुंबई ते कल्याण हा ३५ मैलाचा (सुमारे ५६.३२ किमी) लोहमार्ग बांधण्याची परवानगी ‘जीआयपी’ कंपनीला देण्यात आली.

यातला पहिला टप्पा म्हणजे मुंबई ते ठाणे हा २१ मैलांचा (सुमारे ३३.७९ किमी) लोहमार्ग बांधण्याची सुरुवात दि. ३१ ऑक्टोबर, १८५० या दिवशी शीव (सायन) इथे झाली. का, कोण जाणे, पण मुंबई इलाख्याचा तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड याला या प्रकल्पात काहीच स्वारस्य नव्हतं. यामुळे गव्हर्नरच्या कायदे मंडळातला एक सदस्य सर जॉन विलोबी याने मुहूर्ताची कुदळ मारली. मग ‘जीआयपी’ रेल्वे कंपनीने झपाट्याने काम सुरू केलं. कंपनीचं कार्यालय नाना शंकरशेटांच्या गिरगाव-ठाकुरद्वारच्या वाड्यातच होतं. दोन-अडीच वर्षांत काम पूर्ण झालं. दि. १६ एप्रिल, १८५३ या दिवशी ५ वाजता आशिया खंडातली पहिली रेल्वे गाडी बोरीबंदर या स्थानकावरून प्रवासाला निघाली. बॉम्बे फोर्टच्या बझार गेटच्या तटांवरच्या तोफांनी प्रचंड धडधडाट करून तिला सलामी दिली. सुमारे ५७ मिनिटांत ती ठाण्याला पोहोचली. आपल्या ठाणे पश्चिमेला स्टेशनबाहेर एक भव्य मंडप घालण्यात आला. तिथे जोरदार मेजवानी होऊन रात्री ८ पर्यंत गाडी मुंबईला परतली, भारतात रेल्वे हे एक नवं युग अवतरलं.


मल्हार कृष्ण गोखले





अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121