ठाणे : प्रसिद्ध पार्श्वगायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या गीतांवर सुमारे १७ हजारांहून अधिक ठाणेकर थिरकले. रॉक ऑन संगीत, डिस्को गीतांनी जल्लोष साजरा झाला. तर धार्मिक व पारंपरिक शास्त्रीय गीते व हिंदी गीतांच्या लयीवर रसिक भारावून गेले होते. या गीतांबरोबर महाराष्ट्राच्या लोककलेचेही नागरिकांना दर्शन घडविण्यात आले.
भाजप व अर्चना मणेरा फाऊंडेशनतर्फे हिरानंदानी इस्टेट येथे शनिवारी `दीपावली संध्या' कार्यक्रम उत्साहात पार पडला. भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा व समाजसेवक डॉ. किरण मणेरा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी माजी खासदार संजीव नाईक व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सहकार्य केले होते.
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्याबरोबरच शिवम महादेवन, पार्श्वगायिका प्राजक्ता शुक्रे, लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी अडीच तासांमध्ये सर्वोत्तम गीतांचा नजराणा रसिकांपुढे सादर केला. `वक्रंतूड महाकाय'पासून सुरू झालेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. `सूर निरागस हो', `हां मेरा सपना है', `बोल ना हल्के हल्के' अशा गीतांपाठोपाठ `इट्स टाईम टू डिस्को', `मन मस्त मगन', `उफ तेरी अदा' अशा गीताच्या स्वरांवर तरुणाईने जल्लोष केला.
मराठी लोकसंस्कृतीतील गोंधळ व पहिले नमन डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उत्तम पद्धतीने सादर केले. मै कभी बतलाता नही, या गीताने समस्त मातांना वंदन करण्यात आले. तर शंकर महादेवन व शिवम महादेवन या पिता-पुत्रांच्या जोडीने सादर केलेले शास्त्रीय संगीत रसिकांची मने जिंकून गेले. `वल्हव रे नाखवा' या पारंपरिक कोळीगीतावर रसिक थिरकले. अखेर `भारत का बच्चा बच्चा... जय श्रीराम बोलेगा'ने या गीताने `दीपावली संध्या' कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, संदीप लेले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.