मुंबई : ९७ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल पॅलेस मध्ये संपन्न झाला. यावेळी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलन भामरे आदी मान्यवर उपस्थित होते. ९७ वे साहित्य संमेलन अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ३ दिवस होत आहे.
साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रत्येक वर्षी स्थानिक संस्कृती आणि वैशिष्टयानुसार स्थानिक कलाकारांकडून बनवले जाते. या बोधचिन्हातून तेथील संस्कृती व कला आणि त्या मातीत होऊन गेलेल्या संत, साहित्यिकांविषयी माहिती मिळते. यावर्षीच्या बोधचिन्हातून खान्देशच्या संस्कृतीवर प्रकाश पडतो.
बोधचिन्हाचे उदघाटन करताना कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी म्हणाले, " तब्बल ७२ वर्षानंतर अमळनेर येथे होणारे साहित्य संमेलन आत्मीयतेचा विषय आहे. समर्पक बोधचिन्ह उपलब्ध करून दिले. अमळनेर सांस्कृतिक राजधानी आहे. संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, सानेगुरुजी कर्मभूमी, प्रताप शेठ व हशीम प्रेमजी यांची उद्योगभूमी शाळेची पायरी देखील न चढणाऱ्या बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला दिले हे जगातली अद्भुत घटना आहे. बहिणाबाईंनी आपल्या कवितांमधून जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे. मातृभाषेतून शिक्षण परिपक्व करते. मातृभाषेचे खूप महत्त्व आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पाच अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध केले आहेत. मराठी साहित्य संमेलन श्वास आहे. खान्देशसाठी अभिमानाची बाब आहे."
तर बोधचिन्हाचे खरे जनक, कलाकार प्राचार्य मिलन भामरे यांनी मी अमळनेरच्या असून मायमराठीनेच ही माझ्याकडून सेवा करवून घेतली असे म्हणून उपस्थितांसमोर विनम्रतेने कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन शरद सोनवणे व आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.