व्यावहारिक वेदांत - पूर्वार्ध

    21-Jan-2023
Total Views | 113
विवेकानंद



राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित संस्कृत अभ्यासक आणि ‘संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान’च्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. कला आचार्य यांचे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ठाणे येथे ‘व्यावहारिक वेदांत’ या विषयावर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. कला आचार्य यांनी अतिशय सोप्या शब्दांत स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत ‘व्यावहारिक वेदांता’चा अर्थ यावेळी उलगडून सांगितला. त्यांच्या याच भाषणाचा हा पूर्वार्ध...



विवेकानंदांचा वेदांत


आपण ज्यावेळी स्वामी विवेकानंदांविषयी विचार करतो, त्यावेळी त्यांच्या ’व्यावहारिक वेदांता’चा विचार केला जातो. याविषयी स्वामीजींची दोन अवतरणं मला इथे सांगाविशी वाटतात. विवेकानंद असे सांगतात, “वेदांताचे ज्ञान अरण्यात, दरीकपारीत फार दीर्घकाळ लपवून ठेवलेले होते. ते एकांतून बाहेर काढून घराघरात व समाजाच्या मोकळ्या व विशाल परिसरात नेऊन, सर्वांना त्याचा परिचय करून देण्याचे काम मला करावयाचे आहे. अद्वैत्वाचा डंका मी सर्वत्र वाजवित फिरणार आहे. बाजारांतून, पर्वत-शिखरांवरून, विस्तृतपणे मुक्तपणे वाजवित वेदांताचे परमोच्च ज्ञान सर्व लोकांना समजावून सांगणार आहे,” अशी त्यांनी सिंहगर्जना केली. हार्वड विद्यापीठातील भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतात, “अमूर्त असा जो वेदांत आहे, त्याला जीवंत व काव्यमय बनावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात वेदांताचे चैतन्य संचारले पाहिजे व तो जीवनाचा रसमय भाग बनावयास पाहिजे. अत्यंत क्लिष्ट, दुर्बोधअशा पुराणांत अडकून असलेल्या वेदांताने मूसनीतीचे स्वरुप धारण करावयास पाहिजे.



लोकांना घाबरून टाकणार्‍या योगाच्या जंजाळातून बाहेर काढून पूर्ण वैज्ञानिक व व्यावहारिक उपयोगी मानसशास्त्रीय रुप त्याला दिले पाहिजे.” अगदी थोडक्यात तात्पर्य सांगायचे, तर वेदांताच्या बाबतीत विवेकानंदांचा विचार असा आहे की, वेदांमध्ये जी रुक्ष अशी घटपटाची चर्चा झालेली आहे, त्यामध्ये मग घटाचे निमित्त कारण कोणतं? मातीचा घट पाहिला, तर त्याचे उपदान कारण कोणतं? व त्याचे समवायी कारण कोणतं? असमवायी कारण कोणतं? घट निर्माण होण्यापूर्वी त्यांचा अभाव होता. तो घट नष्ट झाला की पुन्हा अभाव होईल. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव, अन्योन्यभाव या प्रकारच्या भावाचे ज्ञान... यांसारख्या गोष्टींना सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये जरी हे तत्त्वज्ञान विशेष असले, तरी सामान्यांच्या जीवनात काय फरक पडणार आहे? कारण, जर व्यावहारिक जीवनात दिशा लाभणार नसेल, तर मग तो वेदांत कोणासाठी आहे? त्यांच्या दृष्टीने वेदांत हे सर्वत्र अतिशय भरून राहिलेले, ओतप्रोत भरून राहिलेले, रसपूर्ण चर्चा करणारे तत्त्वज्ञान आहे.



 जर ते जीवनाचे अधिष्ठानरूप तत्त्वज्ञान असेल आणि जर ते संपूर्ण जीव व जगतात भरून राहिलेले असेल, तर त्यामुळे आपल्याला आपला ‘मी’पणाचा अहंकार सोडायला पाहिजे. कारण, वेदांताचा उपयोग लोकांसाठी करायचा आहे. केवळ स्वतःसाठी नाही, व्यष्टीसाठी नाही, तर समष्टीसाठी करायचा आहे. माझ्या मते, अगदी थोडक्यात जर विवेकनंदांचे व्यावहारिक वेदांत सांगायचे असेल, तर मी असे सांगेन की, ‘मी’ नाही तर ‘आपण’; ‘माझे’ नाही तर ‘आपले’; ‘माझ्यासाठी’ नाही तर ‘आपल्यासाठी’ आणि ‘मी नाही केले तर परमेश्वराने माझ्याकडून करवून घेतले,’ ही व्यावहारिक वेदांताची चतुःसूत्रीमी मांडलेली आहे. ही चतुःसूत्री मांडताना मी उगाच मला काही स्फुरलं म्हणून काहीतरी काव्यात्मक सांगायचं म्हणून असे सांगितलं असं झालेलं नाही, तर मूळ वेदांत म्हणजे उपनिषदे काय म्हणतात, त्यातील महावाक्ये काय सांगतात तर-‘अहं ब्रह्मास्मि। तत्त्वमसि। प्रज्ञामयब्रह्म ।इदमात्माब्रह्म। सर्वदमखिलं ब्रह्म।’ म्हणजे ‘अहं ब्रह्मास्मि’पासून सुरुवात झाली, तर ‘सर्वदमखिलं ब्रह्म’पर्यंत आपला प्रवास झाला पाहिजे. जर सर्व विश्वच ब्रह्म आहे, हे जाणल्यावर आपल्याला हा विचार करायला पाहिजे. जसे इशोपनिषदात म्हटले आहे,



‘यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद विजानत:। तत्र को मोह: क: शोक एकत्वमनुपश्यत:॥’ सगळ्या विश्वामध्ये मी एकटा नाही, तर हे सगळे जीवसुद्धा त्या ब्रह्माचे, परमेश्वराचे अंश आहेत. मी आणि त्यांच्यामध्ये फरक असू शकत नाही. कारण, ब्रह्म हे एकच आहे. एकमेवाद्वितीयम्। त्यामुळे विचार ठासून भरला, तर मग आपण स्वामी विवेकानंदांचा जो व्यावहारिक वेदांत आहे, त्याच्याविषयी निव्वळ चर्चा न करता आपण तो पुढे नेऊ शकतो.

माया तत्त्व


‘माया’ या तत्त्वाविषयी आद्य शंकराचार्यांचे विचार आणि विवेकानंदांचे विचार यामध्ये थोडा फरक आहे. कारण, वेदांत म्हटल्यावर विवेकानंदांना अद्वैत वेदांत प्रिय होता, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. परंतु, आद्य शंकराचार्यांच्या मते, ‘माया’ म्हणजे ज्या वस्तूचे जे स्वरुप आहे, ते झाकणे आणि वेगळ्या रूपात दाखवणे, हे मायेचे कार्य आहे. माया ही अनेक अंतर्विरोधांनी भरलेली आहे, असे विवेकानंदांना वाटते. ते म्हणतात की, “या जगाला अस्तित्व नाही, असे म्हणता येणार नाही आणि अस्तित्व आहे, असे पण म्हणता येणार नाही. तर ब्रह्माचे गुण या जगामध्ये ठायीठायी आहे. म्हणून ते आहे असे आपण म्हटले पाहिजे.” जगात धर्म आहे. अधर्म पण आहे. जरी ब्रह्म एकच असले, तरी मायेविषयी शंकराचार्यांचे एक विशेष मत असले, तरी विवेकानंद म्हणतात, “या जगात आपल्याला अनुभवयाला काय येते?


सत्-असत्, धर्म-अधर्म, पाप-पुण्य. मग असे जर असेल तर गौण दृष्टीने मायेला महत्त्व आहेच आणि ती सत्य आहे,” असे विवेकानंद म्हणतात. त्यांनी यासंदर्भात समुद्राचे उदाहरण दिले आहे. एखादा समुद्र आहे. समुद्राचे अस्तित्व खरे आहे. ते मान्य करावे लागते. त्याच्यावरच्या लाटा उफाळत असतात आणि पुन्हा विरून जात असतात. या लाटांना लाटा म्हणणेही तेवढेच आवश्यक आहे. आपल्याला मायेचा विचारसुद्धा त्याप्रकारे करायला पाहिजे. अनेकत्व या जगामध्ये आहे आणि ते आपल्याला मान्य करायला पाहिजे. अनेकत्व मान्य करण्यासाठी अनेक उदाहरणं आहेत. मायेचे जे मूळ लक्षण आहे. सद्लक्षण किंवा अनिर्वचनीय ते सगळे निरर्थक नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी उदाहरण दिले आहे की, जिथे जिथे अंतर्विरोध असतो, तिथे तिथे ती गोष्ट निरूपयोगी नसते, असे नाही. उदाहरणार्थ, प्राणवायू आणि हायड्रोजन. यांच्या संयोगामुळे पाणी मिळते.

श्रद्धा आणि श्रद्धावृत्ती


या सर्वांवरून विवेकानंदांची सगळी विचारसरणी ही बुद्धिनिष्ठ होती, हे लक्षात येते. आता बुद्धिनिष्ठ आहे, असे म्हणताना तर्कामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीची अनुभूती येत नाही, असे वाटू शकते. या विचारामुळे अंधश्रद्धेला ‘श्रद्धा’ असे गोंडस नाव दिले, तर काय होईल? मग एखाद्या आंधळ्यानेच एखाद्या आंधळ्याला वाट दाखवायची आणि पुढे काही सापडणार नाही, असे निरर्थक ठरेल. ज्या भारतामध्ये धर्म आणि परंपरा, तत्त्वज्ञान हातात हात घालून चालतात, त्याठिकाणी नुसती श्रद्धा असून चालणार नाही किंवा नुसती डोळस वृत्ती असून चालणार नाही. श्रद्धावृत्ती असावी. कारण, श्रद्धावान मनुष्याला ज्ञानाचा लाभ होतो, असे जरी असले तरी श्रद्धा ही डोळसच असायला पाहिजे. उदाहरणार्थ, मोराच्या पिसार्‍यावर अनेक डोळे असतात. परंतु, त्या डोळ्यांनी बघता येईल का? बघण्यासाठी दृष्टीचीच आवश्यकता असते. मोराच्या पिसार्‍याच्या डोळ्यासारखी श्रद्धा नको. तर दृष्टी जागी करणारी, जागवणारी श्रद्धा आवश्यक आहे. डोळस श्रद्धा माणसाला का आवश्यक आहे? कारण, बुद्धीला मर्यादा आहेत. विवेकानंदांनी बुद्धिनिष्ठ विज्ञानाला अत्यंत महत्त्व दिले, तरी बुद्धीला मर्यादा असतातच.



बुद्धी अंतिम तत्त्वाचे यथार्थ ज्ञान करून देण्यास अपुरी पडते. व्यावहारिक उदाहरण पाहूया. आपण उपाहारगृहात जातो. तिथे ‘मेन्युकार्ड’ असते. त्यामध्ये विविध पदार्थांची नावे असतात. मिसळ, ढोकळा असे पदार्थ असतात. आपण अंदाज करतो की, मिसळ झणझणीत असणार, ढोकळा सौम्य असणार. श्रीखंड वेलची घातलेले असणार. आता सर्व पदार्थांची नावे वाचून आपण केवळ त्या पदार्थांची चव आठवतो. म्हणजे त्याचे ज्ञान होते. परंतु, अनुभूती येत नाही. कारण, ‘मेन्युकार्ड’ वाचून पदार्थांची चव कळत नाही. अध्यात्मातही बुद्धीने ज्ञान होते, पण अनुभूती प्राप्त होत नाही, साक्षात्कार प्राप्त होत नाही. या विषयाचा साक्षात्कार होईलच, या विचाराने केवळ बुद्धीच्या जोरावर म्हणून मनुष्य अध्यात्मामध्ये शिरला, तर कोणीही त्याची शाश्वती देऊ शकत नाही. परंतु, सगळीकडे अंध:कार आहे आणि जर एकदम वीज कडाडली, तर त्या विजेच्या प्रकाशात सगळा आसमंत क्षणभर प्रकाशमय होऊन उजळतो. त्या एकाक्षणी कुठे काय आहे याचे ज्ञान होते. पण, हे भासमान आहे, हे पाहणार्‍याला उमजते. तेव्हा आता याला आपण नुसतं बुद्धी म्हणायचे की प्रतिभा? पण, आपण निश्चितपणे याला ‘प्रज्ञा’ म्हणू शकतो. नुसत्या बुद्धीला महत्त्व नाही, महत्त्व प्रज्ञेलाही आहे.



डॉ. कला आचार्य

 
विवेकानंदांचे धर्मचिंतन



आता धर्माविषयी विचार करताना विवेकानंदांच्या दृष्टीने धर्म हा बाह्योपचारात जो अडकलेला धर्म आहे, जे कर्मकांड आहे ते नव्हे. आपल्याला मीमांसासूत्रांमध्ये आढळते की, ‘ज्योतिष्टोम् स्वर्गकामोयजेत।’ म्हणजे स्वर्गाची इच्छा असणार्‍याने ‘ज्योतिष्टोम’ यज्ञ करावा. पण, समजा एखाद्याने केला आणि त्याला स्वर्गप्राप्ती झाली. परंतु, ती किती काळ टिकणार? तर पुण्य संपेपर्यंत. पुण्य संपल्यावर पुन्हा या मर्त्य जगात जन्म घ्यावा लागेल किंवा शंकराचार्यांनी जसं म्हटलं आहे की, ‘पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्।’ म्हणजेच पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकावे लागेल. त्यामुळे कर्मकांडामध्ये अडकून राहावे, असे कधीही विवेकानंदांना वाटले नाही. विवेकानंद म्हणतात की, “धर्म हे मानवी जीवनाचे विभाज्य अंग आहे. त्यामध्ये धर्माला मर्यादित कुंपणात अडकवू नका. धर्म म्हणजे काय तर मानवी जीवनातला चैतन्याचा आविष्कार.” पुढे विवेकानंद म्हणतात, “रिलिजन इज मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन.” त्यामुळे धर्म हा त्याज्य नाही. फक्त तो कर्मकांडाच्या शृंखलेत बद्ध होता नये.

धर्माविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात, “हे चांगले असो की, वाईट असो, धर्माचा आदर्श भारतात हजारो वर्षे वाहत आलेला आहे. त्याने सर्व वातावरण पुरेपूर भारून टाकलेले आहे. तो धर्म आमच्या रक्तातच भिजून राहिला आहे. आमच्या रक्तवाहिन्यांतील प्रत्येक थेंब त्याने प्रसवित केला आहे. आमच्या प्रकृतीशी एकरुप झालेला आहे आणि आमच्या जीवनाचा तो प्राण होऊन राहिलेला आहे. असा धर्म आमच्या जीवनातून कसा घालवून देता येईल?” ते म्हणतात, “गंगा मातेने आपल्या हिमाच्छादित भूमीत परत जाऊन दुसरा मार्ग नव्याने आक्रमावा, असे तुम्हाला वाटू शकते का? म्हणजे धर्म आहे जो आमच्या नसानसांमध्ये भिनलेला आहे. धर्म जसा आहे, तसा त्याचा स्वीकार करायला पाहिजे. परंतु, त्यातले जे जे त्याज्य आहे, त्याविषयी आपण पुनर्विचार नक्कीच करायला पाहिजे. आत्मपरीक्षण केले पाहिजे.” आता धर्म म्हटला की, विविध संप्रदाय आलेच. मगाशी विवेकानंदांनी दिलेले समुद्राचे उदाहरण पाहिले. याच समुद्राच्या उदाहरणावरून धर्म पाहूया.

समजा, एक समुद्र आहे. या समुद्राची वेगवेगळी रुपं म्हणजे खळखळ वाहणारा झरा, नदी, ओढे, नद. ही सगळी समुद्राची रुपे आहेत. त्यांची नावं फक्त वेगवेगळी आहेत. परंतु, हे सर्व नंतर समुद्रालाच जाऊन मिळणार आहेत आणि सर्व पाणी एकच होणार आहे. याचप्रमाणे आपल्याला आपल्या धर्मातील विविधता नाकारता येणार नाही. तसेच आपल्याला संप्रदायांचेही वैविध्यसुद्धा नाकारता येणार नाही. ते असणारच आहे. विवेकानंदांचे म्हणणे एवढेच आहे की, विचारांमध्ये कलह होणे, भिन्न असणे, हे ठीकच आहे. निदान विचार करण्याची प्रक्रिया तरी जागी राहील. जर पाणी वेगाने वाहत असेल, खळखळ वाहत असेल, तर त्याच्यात जीवंतपणा असतो. जर पाणी वाहणं थांबलं, पाणी तुंबलं की चिखल निर्माण होतो. त्याच्यात भोवरे निर्माण होत नाहीत आणि म्हणून संप्रदायामध्ये वैविध्य असणं, त्यांचे आपापसामध्ये मतभेद असणं, मतभिन्नता असणं, हीच त्यांची ओळख असू शकते. त्यात काही वावगं नाही. आपल्या मनाची दारं सगळ्यांसाठी खुली ठेवली पाहिजेत.




हृदयाकाश पाहिजे. हृदयाकाशाला जागेची मर्यादा नाही. ते अनंत आहे. आकाश अनंत आहे. मग आपण ते खुलं ठेवून सगळ्या संप्रदायांना आपलंसं करणं, हे धर्मधुरिणांचं काम आहे, असं मला वाटतं. मात्र, त्यांच्यात जर वाद असतील, तरीसुद्धा आपण हा विचार केलाच पाहिजे. ‘वादेवादेजायते तत्त्वबोधा:।’ वाद असला तरच तत्त्वाचं ज्ञान होईल. अगदी ‘वाद’ या शब्दाचा शब्दशः अर्थ, व्युत्पत्तीनुसार जर बघितला, तर वाद म्हणजे बोलणे, त्याच्यापासून झालेला वाद म्हणजे बोलणं, बोलण्याची क्रिया. वाद म्हणजे आपलं मत प्रतिपादित करणं. प्रतिवाद, वितंडवाद किंवा प्रसंवाद या सगळ्यानंतरच्या पायर्‍या आहेत. प्रत्येकाला आपलं मत प्रतिपादित करण्याचा एक प्रकारे जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणून विविध संप्रदाय असणार, त्यांची मतं ते मांडणारच. फक्त त्यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ अशा जर पायर्‍या निर्माण होत असतील, तर त्या पायर्‍यांचाही सूक्ष्मपणे विचार करायला पाहिजे, असे मला वाटते.



श्रेष्ठता आणि कनिष्ठता


श्रेष्ठ-कनिष्ठतेचा विचार करताना आपण एक उदाहरण बघूया. आपण सगळे देवळात जातो. आपल्याला देवळापर्यंत जायचे असेल, तर अनेक पायर्‍या असतातच. मग खालची पायरी कनिष्ठ आहे, असा विचार करण्यात काही अर्थ नाही. कारण, तीच आपल्याला वरच्या पायरीकडे नेते. सगळ्यात वरची पायरी आहे, जिच्यामुळे आपण देवळात आपण गेलो. परंतु, नंतर आपल्याला पुन्हा खाली उतरायचे आहेच. खाली उतरताना सगळ्यात जी खालची पायरी आहे, तीच आपल्याला भूमीवरती नेणार आहे. तिलाही तेवढेच महत्त्व आहे. जिथून आपण आलो, त्या पायरीला चरणस्पर्श करताना आपल्याला परत ज्या ठिकाणाहून आलो, त्या ठिकाणी नेणारी शेवटची सगळ्यात खालची पायरी महत्त्वाचीच आहे. सगळे संप्रदाय जरी त्यांच्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा त्यांच्या भूमिका असल्या तरीसुद्धा प्रत्येक संप्रदायाला तेवढे महत्त्व आहे, असे मला वाटते.


याच संदर्भात एक अनुभव सांगते. आम्ही पीठामध्ये असताना एकदा खूप संत-महंत आले होते. इतके संत-महंत एकाचवेळी आम्ही कधी पाहिले नव्हते. इतक्या प्रकारचे, विविध विचारप्रवाहांचे संत-महंत उपस्थित होते. आम्हाला नेहमीप्रमाणे एक तास अगोदर सांगितलं की, असे संत-महंत येणार आहेत, तयारी करा. आम्ही त्या सगळ्यांकरिता चंदनाचे हार आणले. सगळ्या धावपळीमध्ये ते हार पोत्यांमध्ये अक्षरक्ष: आम्ही भरले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. व्यासपीठावर गाद्या पसरलेल्या होत्या आणि त्यावर सर्व विचारांचे संत-महंत एकत्र बसलेले होते. हार घालतानाही एवढी गडबड होत होती की, नाव कोणाचे घेतले जात आहे आणि हार कोणाला घातला जात आहे, याचा पत्ताच लागत नव्हता. परंतु, या कार्यक्रमात माझ्या लक्षात आलं की, इतके सर्व संत-महंत त्यांच्या विचारांमुळे, मतांमुळे असू शकतात. आज ते एका व्यासपीठावर एकत्र याच मतप्रवाहांमुळे बसू शकतात. एका धर्मामुळे त्यांना ही संधी मिळते. त्यामुळे हा प्रसंग मला महत्त्वाचा वाटतो.

त्यानंतर असाच दुसरा प्रसंग मी अनुभवला की, मी आणि ललिता नामजोशी, आम्ही आचार्य सभेमध्ये गेलो होतो. देशभरच्या आचार्यांचे, संत-महंतांचे हे संमेलन होते. यामध्ये बहुतांशी आचार्य हिंदीत बोलत होते. आम्हाला त्याचं इंग्रजीत ‘ऑन दी स्पॉट’ भाषांतर करण्याचं काम आलं होतं. त्यावेळी आम्ही इतके शेकडो संत-महंत पाहिले. निदान १०० तरी नक्कीच होते. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, एवढी सर्व पीठं भारतामध्ये आहेत. म्हणजे एवढे संप्रदाय आहेत आणि हेच भारताचे वैविध्यपूर्ण वैशिष्ट्य आहे.


तिसरा अनुभव म्हणजे, आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो तेव्हाचा. आम्हाला वरिष्ठांनी कुंभमेळ्याला नेले होते. आम्ही सात-आठ जणं एका ठिकाणी मध्यरात्री उतरलो. रात्र असल्यामुळे कुठे उतरलो आहोत, कळायला मार्ग नव्हता. सकाळी सगळं आवरताना आम्ही मागे राहिलो आणि बाकीच्या लोकांसोबत आमची चुकामूक झाली. त्यात आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो तिथे एवढी गर्दी होती की, आम्ही भिंतीत दबले गेलो असतो. त्यात मला अस्वस्थ वाटायला लागलं. मग त्या पोलिसांना विनंती केली आणि समोर रस्ता ओलांडून पायर्‍यांवरती त्यांनी मला बसवलं. त्यात गंमत अशी की, तिथे पोलिसांनी एका साखळी चोराला पकडून ठेवलं होतं आणि ते त्याला काठीने अधूनमधून मारायचे. या सर्व प्रकारांमधून बाहेर येत येत शेवटी आम्ही सगळे संत-महंत, त्यांच्या मिरवणुका, आखाडे, कुमुख पाहिलं. हे सगळं बघितल्यावर माझ्या मनामध्ये असा विचार आला की, भारतामध्ये एवढे संत-मंत आहेत. या सगळ्यांना आज विवेकानंद असते, तर नक्की वाटलं असतं की, ‘सूत्रे मणी गणा इव।’ म्हणजेच एका सूत्रामध्ये, दोर्‍यामध्ये मणी जसे बांधले जातात आणि त्यामुळे ते एकत्र राहतात, याप्रमाणे या संत-महंतांना, विविध संप्रदायांना बांधणारे एक सूत्र निर्माण केले पाहिजे. ते काम आपल्या सर्वांचे आहे. (क्रमश:)



-डॉ. कला आचार्य



(शब्दांकन :
वसुमती करंदीकर)


अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121