अंबरनाथ : अंबरनाथला १२ दिवसांच्या आपदा मित्र निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य आप्पती व्यवस्थापन प्राधिकरण आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी महाविद्यालयात १२ दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराला तहसीलदार माने यांच्या हस्ते मंगळवार १० जानेवारीला उदघाटन करण्यात आले.
शिबिरामध्ये अंबरनाथ , बदलापूर आणि उल्हासनगर येथील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एनएसएस आणि एनसीसी विद्यार्थी आणि तालुक्यातील इतर विभागातील १८ ते ४० वयोगटातील अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध विभागातील नियुक्त केलेले प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. या शिबिरामध्ये ९० आपदा मित्र यांची नोंदणी करण्यात आली असून नसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीपासून संरक्षण , निवारण मदत आणि पुनर्वसन आदी प्रमुख प्रकारचे सर्र्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कोविड १९ आपत्तीमुळे उदभवलेल्या संकटामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि नियंत्रण मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे , आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची भविष्यात मोठी गरज भासणार आहे . यासाठी शासनाने आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण शिबिरांद्वारे जनजागृती करण्याचे ठरवले आहे , याचाच भाग म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने देशभरात आपदा मित्र यासारखा उपक्रम सुरु केला आहे, त्याद्वारे तरुण मोठ्या संख्येने आपत्ती व्यवस्थापन विषयी प्रशिक्षित आणि माहिती असणारे निर्मण झालेल्या मनुष्यबळामुळे फायदा होईल असा विश्वास तहसीलदार प्रशांती माने यांनी व्यक्त केला.