महिलेचा बळी घेणाऱ्या वृक्ष पडझडीचे खापर गृहसंकुलावर - मनपा वृक्षप्राधिकरणचा अजब न्याय
16-Sep-2022
Total Views | 67
1
ठाणे: गणेशोत्सवात अनंत चर्तुदशी दिवशी गणेश मंडपावर भला मोठा पिंपळ वृक्ष कोसळुन महिलेचा बळी गेला होता. या प्रकरणात ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागावर दिरंगाईचे आरोप झाले होते.मात्र, वृक्ष प्राधिकरणाने याचे खापर गृहसंकुलावरच फोडले असुन तसा अहवाल मनपा आयुक्तांना सादर केला आहे. दरम्यान, संबधित सोसायटीला एपिल महिन्यातच वृक्षाच्या फांद्या छाटण्याची परवानगी दिल्याचा दावा पालिकेने केला असला तरी सोसायटीने पुन्हा जून महिन्यातदेखील याच वृक्षाबाबत तक्रार अर्ज दिल्याचे समोर आले आहे.
ठाण्यातील कोलबाड, जागमाता मंदिर परिसरात अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळी वृक्ष कोसळल्याची दुर्दैवी दुर्घटना होऊन सौ.अर्पिता वालावलकर यांचा मृत्यु झाला. यामध्ये त्यांचा मुलगा प्रतिक याच्यासह किमान चार ते पाच लोक जखमी झाले होते. वारंवार मागणी करूनही ठाणे महापालिकेचे अधिकारी,कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या जीविताकडे यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला होता.
तसेच, शासनाने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.दरम्यान, पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने पालिका आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात एपिल महिन्यातच संबधित वृक्षाच्या फांद्या छाटण्यासाठी सोसायटील परवानगी दिल्याचा दावा करून एकप्रकारे सोसायटीवरच खापर फोडले आहे. पालिकेने परवानगी दिली असली तरी चार ते पाच मजली उंचीवरील फांद्या छाटण्याची यंत्रणा नसल्याचे सांगत सोसायटीने जून महिन्यात पुन्हा पालिकेकडे अर्ज करून फांद्या छाटण्याची विनंती केली होती.दरम्यान, महापालिकेकडेही इतक्या उंचीवरील फांद्या छाटण्यासाठी कोणतीही तजवीज नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे संबधित मृत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता दुरावली आहे.
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे फांद्या छाटणीसाठी वर्षभरात सुमारे ६०० अर्ज येतात. पालिका या सोसायट्यांना परवानगी देते मात्र सोसायट्यांकडे यंत्रणाच नसल्याने वृक्षांचा पसारा वाढत जातो. त्यातच हवेतील आर्द्रतेमुळे जमीन भुसभुशीत होते.तर,झाडांच्या बुंध्याशी काँक्रीट,पेव्हर ब्लॉक,डांबर आदींचा थर जमा झाल्याने वृक्षांची पाळेमुळे कमकुवत बनून सरतेशेवटी वृक्ष कोसळतात.७० ते ८० टक्के वृक्ष कोसळण्याचे प्रकार सोसायट्यांमध्ये घडतात. असा निष्कर्ष ठाणे महापालिकेने नेमलेल्या सत्यशोधन समितीने काढला आहे.