पुणे : राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणतेही आरोपपत्र नाही; ते दोषी आढळले नाहीत, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राठोड यांच्यावरील आरोपाबाबत आपली भूमिका मांडली.
संजय राठोड यांच्यावर हा आरोप कित्येक महिन्यांपूर्वी झाला होता, व त्याबाबत जी चौकशी झाली, त्यात राठोड कुठेही दोषी आढळलेले नाहीत. महिलांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भावना आहे. जर चित्रा वाघ म्हणत असतील की, या प्रकरणात अधिक चौकशी झाली पाहिजे तर, ती चौकशी देखील होईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडू यांच्याबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, आमच्याकडे दोन अपक्ष मंत्री होते, त्यातील एकालाच मंत्रीमंडळात स्थान दिले असते, तर वेगळा संदेश जाऊ शकला असता. बच्चू कडू हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसर्याे टप्प्यात ठेवला जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
संभाजीराजे राज्यभर दौरे करत आहेत. किल्ल्यांचे संवर्धन करत आहेत. महाराष्ट्राचे जे वैभव आहे ते जगासमोर आले पाहिजे. जयपूरमध्ये पिंक स्टोन आणि कोल्हापूरमध्ये ब्लॅक स्टोन आहे, एवढाच फरक आहे. आपण आपला इतिहास विसरल्यासारखे होईल. इतिहास जपला तर इंग्लंड, फ्रान्ससारखे होईल.
जे कोणी राज्याचे पर्यटन मंत्री होतील. मी स्वत: पर्यटन मंत्र्यांकडे संभाजीराजेंसोबत जाईन हे जर पर्यटन झाले, तर हजारो लोकांना रोजगार मिळतील, असे केसरकर म्हणाले. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी केसरकर यांची पुण्यात भेट घेतली.