संपूर्ण निसर्गाला, धरतीला चिंब भिजवून पाऊस उन्हाबरोबर जेव्हा लपंडाव सुरू करतो, तेव्हा श्रावण हलकेच आपल्या आगमनाची चाहूल संपूर्ण सृष्टीला देतो. गडद ढगांचा कापूस दूर सारत, सोनेरी मऊ ऊन शिंपडत, कधी ऊन कधी पाऊस यांच्या जोडीने हा श्रावण मोठ्या ऐटीत येतो. त्याच्या आगमनाने झाडे, फुले, प्राणी, पक्षी, सगळे आनंदी होतात, पण त्याहून जास्त उत्साही आणि आनंदी होतात, ते म्हणजे लेखक-कवी. या साहित्यिकांचे आणि निसर्ग-ऊन पावसाचे नाते सगळ्यात अनोखे. आपण सामान्य माणूस जो विचार करू त्याच्या एकदम विरुद्ध अतर्क्य विचार हे साहित्यिक करतात.
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पाचवा महिना।
वाकले माडांचे माथे। चांदणे पाण्यात न्हाते।
‘सृष्टीला पाचवा महिना’ या कविवर्य बा. भ. बोरकरांच्या श्रावण महिन्याचे वर्णन करणार्या कवितेतील या ओळी. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढनंतर येणारा श्रावण हा पृथ्वीला लागलेला पाचवा महिना आहे, असे कविवर्य बोरकर म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या गर्भवती युवतीचे तेज असते, त्याप्रमाणे पावसाने न्हाऊन निघालेल्या पृथ्वीचे तेज श्रावणात पसरते. गोव्याच्या भूमीत जन्म झालेल्या कविवर्य बा. भ. बोरकरांचे या पावसाशी असलेले नाते त्यांच्या कवितांमधून आपणही जोडू पाहतो.
हा श्रावण येताना एकटा येत नाही, तर तो सोबत उत्सवाचे गोकुळ घेऊन येतो. आनंदाचे सण घेऊन येतो. जिथवर दृष्टी जावी तिथपर्यंत निसर्गाचा हिरवागार गालिचा पसरलेला असतो आणि अशा निसर्गरम्य वातावरणात जर बालकवी आठवले नाहीत, तर नवलच!
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरुनि ऊन पडे।
वरति बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे।
हे वर्णन केवळ बालकवीच करू शकतात. जिथवर बघू तिथवर निसर्ग, ऊन-पावसाचा खेळ, वर नभात बघितले तर सप्तरंगाचे विणलेले गोफ आणि त्याला मांगल्याचे तोरण. अशा श्रावणाचे रूप बघून आपण त्या श्रावणाच्या रूपावर भाळलो नाही, असे होऊच शकत नाही. हे कवी जसे छंदात या मासाचे वर्णन करतात तसा श्रावण आपल्या मनःपटलावर उमटत जातो. यातच पुढे बालकवी म्हणतात,
देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात।
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत॥
आणि अशा श्रावणाचे गीत गुणगुणण्यासाठी, धरतीचे शृंगारलेले रूप बघण्यासाठी पुन्हा कृष्णमेघांची गर्दी होते आणि तिच्या मिलनासाठी पुन्हा एकदा बरसात होते. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात-
श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
श्रावणात घननिळा...
कविवर्य पाडगावकर या संबंध हिरवळीला पाचू म्हणजेच माणिकरत्नांची उपमा देतात, तर या पाचूच्या हिरव्या माहेरी आलेल्या उन्हाला हळदीची उपमा देतात, आणि आपल्या अलंकारांनी सृष्टीचे रूप आणखी रुपेरी करत जातात.
या आल्हाददायक वातावरणाला भेटायला हा खट्याळ पाऊस पुन्हा एकदा बरसू लागतो आणि आता या पावसात सर्व भिजून चिंब होत जात आहे. गोपी तर या पावसाने न्हाऊन निघाल्या आहेत. त्यांची नजर कृष्णाचा वेध घेत आहे, वनामध्ये मोर चिंब झाले आहेत, जळामधून मल्हाराची धून उमटली आहे, वेली ऋतुमती झाल्या आहेत, वीजसुद्धा हा आनंद घेत नाचत आहे आणि एवढेच नाही, तर चिमुकली पाने निसर्गाचा हा उत्सव बघून उतावळी होऊन टाळ्या पिटत आहेत. अर्थातच, कवी बा. भ. बोरकरांच्या कवी नजरेने हे दृश्य मनात टिपले आहे. कविवर्य बोरकर लिहितात,
मल्हाराची जळांत धून। वीज नाचते अधूनमधून
वनांत गेला मोर भिजून।
गोपी खिळल्या वनी थिजून
घुमतो पावा सांग कुठून?
कृष्ण कसा न उमटे अजून?
वेली ऋतुमती झाल्या ग।
सरीवर सरी आल्या ग। सचैल गोपी न्हाल्या गं।
आणि हे सर्व वातावरण बघत दशदिशासुद्धा धुंद होऊन गेल्या आहेत, सगळी धरती तृप्त झाली आहे, ही शमलेली तृष्णा बघून मनदेखील शांत झाले आहे आणि हे सर्व रूप डोळ्यांत साठवत आता अनिलगण निघाले आहेत, याचे वर्णन करताना बा. भ. बोरकर म्हणतात,
धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले
शृंगार रसाने ते या पावसाला चिंब भिजवून टाकतात. पाऊस-शृंगाराचे अनोखे नाते रंगवत म्हणतात-
क्षितिजी आले भरते ग। घनात कुमकुम खिरते ग
लाजण झाली धरती ग। साजण काठावरती ग
उन्हांत पान। मनात गान
ओलावून थरथरते ग
कविवर्य बोरकर कविता लिहित लिहित स्वतःच केव्हा पाऊस होऊन बरसतात काळातही नाही. परंतु याही पलिकडे ज्यांनी मोजक्याच कविता लिहिल्या परंतु, त्या कवितांमधून आपला वेगळं ठसा निर्माण करणारे ठरले ते म्हणजे कवी अनिल. ’दशपदी’ लिहून त्यांनी चिंतनाचे गहिरे रांग व्यक्त केले आहेत. कवी अनिल त्यांच्या ’श्रावणझड’ या दशपदीतून व्यक्त होताना बाहेर पडणार्या पावसामधून आपल्या अंतरातल्या पावसात केव्हा घेऊन जातात कळतही नाही, ते म्हणतात-
श्रावणझड बाहेरी मी अंतरि भिजलेला
पंखी खुपसून चोच एक पक्षि निजलेला
हा पक्षी कदाचित कोणत्यातरी अपरिचित दूर झाडावर निजलाही असेल, परंतु त्या झाडाची मूळं त्या कवीच्या मनात खोलवर रुजली आहेत. कवी जेव्हा ’श्रावणझड’ म्हणतात, तेव्हा त्याची ’सर’ किती खोलवर गेली असते, हे कवीमनच जणू शकते. तर एरव्ही जगण्यातली अनामिकता केवळ गूढ प्रतिमांमधून व्यक्त करणारे एक चिंतनशील कवी ग्रेस, श्रावणाचं वर्णन अतिशय हळुवार फुंकर घालत करतात,
हा श्रावण गळतो दूर
नदीला पूर
तरुवर पक्षी
घन ओले त्यांतून
चंद्र दिव्यांची नक्षी...
’चंद्र दिव्यांची नक्षी’ म्हणताना, श्रावणाच्या पावलांनी येणार्या नवनिर्मितीच्या शक्यता कवी ग्रेस यांना जाणवतात का, आभाळातून येणारी किरणे चांदण्याचे दिवे आयुष्यरूपी पात्रात सोडत आहेत का, असे अनेक प्रश्न कवी ग्रेस तरीही मागे ठेवतात.
कवीचे आणि श्रावणाचे नाते असे अतर्क्य आहे. बोरकर पावसाच्या प्रेमात पडतात, तर पाडगावकर श्रावणाच्या प्रेमात पाडतात, तर कवी अनिल, कवी ग्रेस यांसारखी मंडळी आपल्याला त्या पावसाच्या-श्रावणाच्या पलीकडे घेऊन जातात...
- वेदश्री दवणे