ठाणे : भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने आणि लोकायन शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्याद्वारे आयोजित लोककला आणि लोकसाहित्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच आभासी पद्धतीने संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. डॉ. मोनिका ठक्कर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांच्या ‘भुलजा-भुलाबाई के लोकगीतों का उद्देश और अर्थ’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे सदस्य सुजय पतकी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेत दिग्गज अभ्यासकांनी आपली मते मांडली. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी बीजभाषणात अनेक लोककला प्रकारांचा परिचय करून देत करपल्लवी लोककला प्रकाराचे महत्त्व पटवून दिले. डॉ. रवी चतुर्वेदी यांनी लोककलेतूनच नाट्यशास्त्राचा उगम स्पष्ट केला. कथ्थक गुरू राजश्री शिर्के यांनी कथकांची (कथन करणारे) रंगभूमी ही समृद्ध आहे, याचे दर्शन घडवले. डॉ. शैलेश श्रीवास्तव यांनी लोकलेतील देशीयतावादावर अनेक पैलू उलगडले. या परिषदेत पहिल्यांदाच कलावंतांच्या मानसशास्त्राचा विचार करण्यात आला. त्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांनी कलावंताचा मेंदू कसा कार्यक्षम असतो.
याबद्दल मनोवैज्ञानिक बाजू मांडली. चित्रकार वासुदेव कामत यांनी लोकचित्र आणि आधुनिक कला यांच्या गुणवैशिष्ट्यासह तुलनात्मक अभ्यास मांडला. डॉ. रत्नाकर नारळे यांनी कॅनडा येथील लोकसंस्कृती, शिल्प, चित्र, वेशभूषा याबद्दल सचित्र अभ्यास मांडला. संगीत तज्ज्ञ डॉ. केशवचैतन्य कुंटे यांनी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यातील फरक दर्शवून देताना नेपाळी संगीताचे तसेच कर्नाटक आणि केरळी संगीताचे उदाहरण दिले. डॉ. प्रकाश खांडगे यांनी लोककला आणि लोकसाहित्यावर भाष्य केले. सदर परिषदेसाठी ५० हून अधिक अभ्यासकांनी सहभाग घेत आपले शोधनिबंध सादर केले.