‘धनलक्ष्मी’प्राप्तीसाठी स्टार्टअप्सना ‘द लिंक’चा उद्योगमंत्र

    17-Jun-2022
Total Views | 109
 
startup
 
 
 
व्यवसाय-उद्योगांची वाढ खुंटण्यामागची तशी एक ना अनेक कारणे आहेत. जसे की, या व्यावसायिकांना एका टप्प्यावरून पुढे जाण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, त्यासाठी लागणारी गुंतवणूक वगैरे. अशा व्यावसायिकांची हीच समस्या ओळखून त्यांना ‘द लिंक’च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या धनलक्ष्मी पटवर्धन यांची ही मुलाखत..
 
 
‘स्टार्टअप्स’ सुरु करण्यापूर्वी उद्योजकाने स्वतःला कुठले प्रश्न विचारणे गरजेचे आहे?
कुठलाही उद्योग-व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण हा व्यवसाय का करायचा आहे? यातून काय साध्य होणार आहे? यासाठी लागणारी तयारी, इच्छाशक्ती आपल्याकडे आहे का? हे सर्व मूलभूत प्रश्न आपल्याला विचारणे भाग आहे, तरच आपल्याला व्यवसाय सुरू करता येईल. यानंतर बरेच प्रश्न येतात. आपण जो व्यवसाय सुरू करत आहोत, त्यामागची आपली नेमकी कल्पना काय आहे? तिचा व्यवसाय होऊ शकतो का? त्यासाठी लागणारे भांडवल किती आणि आपण ते कसे मिळवणार आहोत? हा व्यवसाय करत असताना येणार्‍या आव्हानांसाठी आपण तयार आहोत का? तडजोडी करण्यासाठी आपण तयार आहोत का? या सर्व गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे, तेही व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच!
 
 
 
 
‘स्टार्टअप्स’च्या प्रगतीसाठी काय करणे गरजचे आहे? ‘द लिंक’ यासाठी कसे काम करते?
आता आपण उद्योग सुरू केला, त्याची प्रगतीही सुरू झाली. एका पातळीपर्यंत आपण व्यवसाय पोहोचवला आहे. म्हणजे समजा, आपला व्यवसाय पाच कोटींपर्यंत पोहोचला, तर या पुढे कसे जायचे? कुठल्याही व्यवसायामध्ये येणारी कुंठितावस्था कशी हाताळायची, हा महत्त्वाचा प्रश्न असतो आणि याच प्रश्नाशी सर्व छोटे उद्योग झगडत असतात. इथे ‘द लिंक’ उद्योजकांना मदत करते. ‘द लिंक’ या उद्योगांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे तसेच त्या उपायांवर अंमलबजावणी करण्याचे काम ‘द लिंक’ करते. सर्वात मुख्य म्हणजे, समस्या ओळखणे. मुख्यतः व्यवसायवृद्धी करताना आपल्या संकल्पनेच्या विरोधात जाऊन किंवा त्याच संकल्पनेला नव्या स्वरूपात पुन्हा मांडणे, हे बर्‍याच उद्योजकांना आव्हानात्मक वाटते. इथे आम्ही त्यांना मदत करतो. आपण जे उत्पादन घेतो आहोत, त्यामध्ये वैविध्य कसे आणता येईल किंवा नवीन एखादे उत्पादन बाजारात आणता येईल का? या गोष्टींवर आम्ही या छोट्या उद्योगांना मार्गदर्शन करतो. नुसते मार्गदर्शन करत नाहीत, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीसुद्धा करतो. यापुढचा मुद्दा म्हणजे आर्थिक पाठबळ कसे मिळवायचे? त्यासाठी कुठल्या योजना आहेत? त्यासाठी कसे काम करायचे? त्यातून मदत कशी मिळवायची, या सर्व गोष्टींबद्दल ‘द लिंक’ व्यावसायिकांना मदत करते.
 
 
 
 
‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ किती महत्त्वाची आहे?
आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला बर्‍याच लोकांच्या सहकार्याची गरज असते. तसेच कुठल्याही व्यवसायाला मोठे होण्यासाठी अनेकांचा हातभार गरजेचा असण्याची गरज असते. त्यामुळेच ‘स्टार्टअप इकोलॉजी’ ही संकल्पना महत्त्वाची ठरते. एका व्यवसायाबरोबर दुसरे अनेक व्यवसाय त्याबरोबरीने जोडणे यालाच ’स्टार्टअप इकोसिस्टीम’ म्हणतात. उदाहरणार्थ, एक छोटा ‘युट्यूब चॅनेल’चा व्यवसाय असेल, तर या व्यवसायातून आपण फक्त व्हिडिओज्च करणे, एवढ्यापुरते मर्यादित न राहता अनेक गोष्टी याबरोबरीने जोडता येतील. जसे की, ‘मार्केटिंग’, ‘अ‍ॅडव्हर्टायझिंग’ या सर्व गोष्टी आपल्याला या माध्यमातून करता येतील. याचाही विचार करता येऊ शकतो. तसे करणेही शक्य होऊ शकते. ‘डिजिटल मार्केटिंग’ हा एक नवीन व्यवसाय या माध्यमातून आपल्याला करता येईल, हाही विचार फक्त ‘युट्यूब चॅनेल’च्या माध्यमातून होऊ शकतो. याचबरोबरीने एकापेक्षा अनेक गोष्टींवर काम करणे आपल्याला शक्य होईल. जसे की, आपण फक्त मनोरंजन याच विषयापुरतेच काम करत आहोत आणि आपला चॅनेल मोठा करण्यासाठी अजून इतरही विषय हाताळणे गरजेचे वाटते आणि त्यापद्धतीचे काम आपल्याला जमत नसेल, तर आपण इतर चॅनेल्सची मदत घेऊन त्या प्रकारचा ‘कंटेन्ट’ करू शकतो. म्हणजे एका व्यवसायाच्या बळावर आपण अजून अनेक व्यवसाय जोडू शकतो आणि एकत्र मोठे करू शकतो. हा या ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’चा भाग आहे आणि अशा प्रकारची ‘इकोसिस्टीम’ बनवणे ही काळाची गरजच आहे.
 
 
 
 
भारतातील स्टार्टअप्सची संख्या अधिकाधिक वाढवण्यासाठी आणखीन काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आपल्याला वाटते?
भारतात सध्या मोठ्या प्रमाणात ‘स्टार्टअप्स’ उदयास येत आहेत. अनेक नवनवीन संकल्पना त्यांच्याकडे आहेत आणि त्या ते राबवतसुद्धा आहेत. पण, बर्‍याच वेळेला या नवीन उद्योजकांमध्ये दूरदृष्टीचा अभाव दिसतो. एखादी संकल्पना सुचली, ती नवीन आहे, यापूर्वी कोणी त्यावर काम केलेले नाही म्हणून त्यातून व्यवसाय उभा राहू शकतोच, असे नाही. बरेचदा असे अनेक व्यावसायिक अशा कल्पनेच्या भरात व्यवसाय सुरू करतात. प्रारंभी यशस्वीही होतात. पण, एकदा हे यश मिळाले की पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो आणि त्याचे उत्तर माहिती नसल्याने ते उद्योग बंद पडतात. असे अनेक उद्योजक भारतात सध्या आहेत आणि झालेही आहेत आणि नेमकी हीच गोष्ट ‘स्टार्टअप’ संस्कृतीला मारक आहे. यामुळे उद्योग सुरू करण्यापूर्वीच आपली व्यावसायिक संकल्पना किती मोठी आहे? ती टिकू शकेल का? असा उद्योग कसा उभा राहू शकतो? तो खरंच नफ्यात येऊ शकतो का? या सर्व गोष्टींचा आधीच विचार करणे गरजेचे ठरेल आणि त्यातूनच ही संस्कृती मूळ धरू शकेल.
 
 
 
 - हर्षद वैद्य
अग्रलेख
जरुर वाचा
दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल;

दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल; 'महाराष्ट्र मेड लिकर' बाजारात आणणार

महाराष्ट्राच्या तिजोरीत थेट १४ हजार कोटी रुपयांची भर घालण्यासाठी महायुती सरकारने मद्य धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मंगळवार, दि. १० जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क ३ पटीवरून ४.५ पट वाढवण्याचा, तर देशी मद्याचा दर १८० रुपयांवरून २०५ रुपये प्रति प्रुफ लिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 'महाराष्ट्र मेड लिकर' या धान्याधारित मद्याच्या नव्या प्रकारालाही मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121