मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ४ मे ला भोंग्यावरून अजान देणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असा इशाराही दिला. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी या वादात उडी घेत रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मेपर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली होती. यानंतरही कारवाई झाली नाही, तर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. यानंतर ४ मे रोजी, राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीमध्ये भोंग्याशिवाय अजान देण्यात आली. यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच राज्य सरकारवर निशाणा साधताना रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
आ. नितेश राणे राणेंनी आपल्या ट्विटमधून रझा अकादमी आणि पीएफआयला लक्ष्य केले. ते म्हणतात, "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही. खरी समस्या समाजात विष कालवणाऱ्या रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्याविरोधात एकत्रपणे लढा देणे हीच काळाची गरज आहे. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे. तेव्हाच शांतता प्रस्थापित होईल."
पुढे राज्य सरकारवर निशाणा साधताना ते म्हणतात, "रझा अकादमी ही एक दहशतवादी संघटना असून तिची कोणत्याही धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद झालेली नाही. अर्थात त्यांच्याकडे कोणताही नोंदणी क्रमांक नाही. तरीदेखील राज्य सरकार त्यांना आंदोलन करण्याची आणि काम करण्याची परवानगी देते. त्यांना कुठून निधी मिळतो हे आपल्याला कसं कळणार? त्यांचे सर्व कामकाज ताबडतोब बंद व्हायला हवं."
तसेच, "एक सच्चा मुसलमान कधीही त्याच्या देशाविरुद्ध किंवा राज्याविरुद्ध जाणार नाही. मुस्लीम समाज हिंदू किंवा इतर कोणत्याही समाजासारखंच आपल्या मायभूमीवर प्रेम करतात. पण रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनाच द्वेष आणि भेदभाव पसरवततात. अमरावती, नांदेडमधील दंगली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांना संपवण्याची वेळ आली आहे", असेही नितेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.