यावर्षी मार्च महिना खूपच उष्ण होता आणि एप्रिल महिना देखील असाच गेला. 2022 ने उष्णतेचा जणू कहरच केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून भारताने चार उष्णतेच्या लाटा सहन केल्या आहेत. यावर्षी उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताने 122 वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल महिना अनुभवला. त्यानिमित्ताने भारतातील उष्णतेच्या लाटांचा आढावा घेणारा हा लेख..
भारताच्या हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कारण, या आठवड्यातदेखील उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते चार अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे. तसा इशारा ‘भारतीय हवामान विभागा’ने (आयएमडी) दिला आहे. याच ‘न भूतो न भविष्यति’ उष्णतेने लाखो लोकांचे जीवन आणि उपजीविका धोक्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बुधवार, दि. 27 एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीतदेखील या मुद्द्यावर चर्चा केली. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, ‘भारतीय हवामान विभागा’चे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले की, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांना मे महिन्यातदेखील सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण भारतातील काही प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागात मे महिन्यात रात्रीदेखील उष्णता जाणवेल,” असे मोहपात्रा म्हणाले. संपूर्ण भारतात एप्रिलमध्ये सरासरी तापमान 35.05 अंश होते, जे 122 वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान असल्याचे त्यांनी सांगितले. पण हे असे यावर्षी का घडले? चला, याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून त्याच्या कारणांची मीमांसा करुया...

सध्याच्या उष्णतेच्या लाटेचे कारण वातावरणातील काही विशिष्ट घटक आणि घटना असाव्यात. यामधील पहिले कारण म्हणजे, ‘अॅण्टि-सायक्लोनिक’ अभिसरणाची आगाऊ निर्मिती. (’अॅडव्हान्स फॉर्मेशन ऑफ अॅण्टि-सायक्लोनिक सरक्यूलेशन’) चक्रीवादळाच्या परिभ्रमणाच्याविरुद्ध दिशेने अर्थात चक्रवाताविरोधी अभिसरण हे भारतीय हवामान आणि ऋतुचक्राचाभाग आहे. कारण, ते वेळोवेळी ऋतू बदलताना तयार होते. सामान्य नोंदीनुसार, एप्रिलच्या मध्यावर पश्चिम भारतावर चक्रीवादळविरोधी अभिसरण तयार होते. ज्यामुळे वसंत ऋतूचे रूपांतर उन्हाळ्यात होते. परंतु, यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावरच भारतावर चक्रीवादळविरोधी अभिसरणाची पहिली नोंद केली गेली असून ते मार्च महिनाच्या अखेरपर्यंत मजबूत झाले.
तांत्रिकदृष्ट्या ‘अॅण्टि-सायक्लोनिक’ अभिसरण हे असे क्षेत्र असते, ज्यामुळे मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर उच्च दाबाचा पट्टा निर्माण होतो. या उच्च दाबाच्या क्षेत्राच्या गुणधर्मामुळे इथे वातावरणाचा दाब आणि हवेचा वेग जलद गतीने बदलत नाही. या परिसरात वारा नैसर्गिकरित्या सौम्य होतो. जसजसे हे क्षेत्र वाढू लागते तसतसे तेथील हवा गरम होऊ लागते आणि हवामान उष्ण आणि कोरडे होते. उत्तर पश्चिम दिशेने येणार हा वारा, राजस्थानच्या थार वाळवंटातून येत असल्याने तो कोरडा आणि गरम होता. संपूर्ण भारतातील कमाल तापमानात अभूतपूर्व वाढीसह न्यूनतम आर्द्रतेची पातळी दुपारच्या तासांमध्ये अगदी 20 टक्के इतकी खाली गेल्याची नोंद आहे.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ची अनुपस्थिती होय. ‘अॅण्टि-सायक्लोनिक’ अभिसरण तयार झाल्यामुळे वातावरणात अति उंचीवर असलेल जेट प्रवाह उत्तरेकडे सरकले. यामुळे ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चे क्षेत्र देखील उत्तर अक्षांशांकडे वळले आहे. याच्या परिणामस्वरूप म्हणजे साधारणपणे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक पाऊस म्हणजेच 150 मिमी इतका पाऊस पडतो. पण यावेळी फक्त 18.3 मिमी इतकाच पाऊस झाला आहे. अर्थात, सरासरीपेक्षा 88 टक्के कमी. उत्तर-पश्चिम भारतातील बहुतेक भागांमध्ये ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ नसल्याने कमी पाऊस आणि ढगविरहित आकाश दिसले. असे दीर्घकाळ कोरडे हवामान आणि उत्तर-पश्चिम भारतातील ढगविरहित आकाश हेदेखील असामान्यतापमान आणि उष्णतेच्या लाटेसाठी कारण आहेत. तिसरे कारण म्हणजे, भारतात मार्चच्यामध्यापासून ठरावीक ठिकाणी आढळणारा मान्सूनपूर्व वादळांचा अभाव. यावर्षी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशामध्ये मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात गायब आहे. मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या सुरवातीपासूनच मध्य भारतात वातावरणाच्या खालच्या स्तरांवर दिसणारी अस्थिरता यावर्षी दिसून आलेली नाही. मध्यभारतात यंदा सामान्यत: 8.8 मिमी पावसाच्या ऐवजी फक्त 1.1 मिमी इतकाच पाऊस पडला आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस मार्चमध्ये दिवसाच्या तापमानात होणारी वाढ मर्यादित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र, यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचा अभाव हादेखील तापमानात वाढ होण्यास कारण ठरतो आहे.
_202205021117543760_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
शेवटचे कारण म्हणजे, जागतिक स्थरावर ‘ला निना’बरोबर असलेला संबंध. ‘ला निना’ ही जागतिक घटना आहे, जी थंड हिवाळा आणि तुलनेने थंड उन्हाळ्याशी संबंधित आहे. पण हीच जागतिक घटना मार्चमधील उष्णतेच्या लाटेसाठीदेखील विचारात घेतली जाऊ शकते. इतिहासातील ‘ला निना’ वर्षांच्या डेटाचे विश्लेषण केले, तर असाच काहीसा प्रकार दिसून येतो. अगदी गेल्यावर्षीदेखील असाच काहीसा प्रकार दिसून आला होता. थंड हिवाळ्यानंतर मार्च महिन्यात हिवाळा ते उन्हाळी संक्रमण कालावधीत तापमानात अचानक वाढ झाली होती. यंदादेखील तसेच काहीसे झाले आहे. परंतु, यावेळी जोरदार ‘अॅण्टि-सायक्लोनिक’ अभिसरण, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ची अनुपस्थिती इत्यादी घटनांच्या एकत्रित परिणामस्वरूप या उष्णतेच्या लाटा असाव्यात, असे वाटते. एप्रिलमध्ये सामान्य तापमानापेक्षा अधिक उष्णतेचा सिलसिला कायम राहील, असे विश्लेषण सांगते आणि तसेच झाले देखील. मात्र, याचा अर्थ असा नाही की, मे महिन्यात किंवा जूनमध्ये उन्हाळा अधिक तापदायक असेल. सुदैवाने, डेटाच्या आधारे पाहिले, तर ‘ला नीना’ उन्हाळ्यात पाऊस लवकर आणतो अर्थात उन्हाळ्याच्या शेवटी उष्णतेपासून नक्कीच आराम मिळेल. या उष्णतेच्या लाटेने आपण सगळेच त्रासलो आहोत. पण विस्तृत विचार करता, या घटनादेखील का घडाव्या, याचे कारण म्हणजे जागतिक तापमानवाढ, हे तर सर्वश्रुत आहे. यावर उपाय म्हणजे, आपापल्या परीने निसर्गाची काळजी घेणे. प्राणी-पक्षीदेखील त्यांची काहीही चूक नसताना सगळे मुकाट सहन करीत आहेत. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्याच आणि प्राणी-पक्ष्यांसाठी घराबाहेर किवा खिडकीत दाणा-पाणी नक्की ठेवा.
-मयुरेश जोशी