नुकतीच दिल्लीत ‘एका मजबूत भविष्यासाठी बांबू’ अशी संकल्पना घेऊन ‘पृथ्वी वाचवा’ ही परिषद पार पडली. या परिषदेचा हा वृत्तांत...
इंडियन चेंबर ऑफ फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर’, ‘फिनिक्स फाऊंडेशन संस्था’, ‘भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी’ आणि ‘दि आफ्रिकन-एशियन रुरल डेव्हलपमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक वसुंधरा दिना’चे औचित्य साधून नवी दिल्ली येथे ‘पृथ्वी वाचवा परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. राजकारणात गेली तीन दशके काम करताना एक आवड आणि सामाजिक जबाबदारी म्हणून मी नेहमी पर्यावरण या विषयावर काम करत आहे. एक पर्यावरणस्नेही या नात्याने मी दि. 22 एप्रिल रोजी पार पडलेल्या या एक दिवसीय परिषदेस उपस्थित होतो. अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य अशी ही परिषद भारतरत्न सी. सुब्रमण्यम ऑडिटोरियम येथे पार पडली. ’एका मजबूत भविष्यासाठी बांबू’ अशी या परिषदेची संकल्पना होती.
भारतातील केंद्रीय मंत्री, वरिष्ठ धोरणकर्ते, उद्योग नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि विकासतज्ज्ञ ’पर्यावरणीय संवर्धनात बांबूची महत्त्वाची भूमिका’ या विषयावर एकत्र आले होते. या परिषदेत महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बांबू विकासासाठी सुमारे 4 हजार, 300 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. बांबू हा केवळ वेगाने वाढणारा अक्षय ऊर्जास्रोत नाही, तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यास इतर वृक्षांपेक्षादेखील अधिक प्रभावी आहे. वातावरणीय बदलाविरुद्ध लढा देण्याचे बांबू हे एक प्रभावी साधन आहे. बांबू लागवडीमुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढ, रोजगारनिर्मिती असे ग्रामीण विकासाचे नवे मार्ग खुले होतात.
ही परिषद उद्घाटन सोहळा, शाश्वततेमध्ये दूरदर्शी नेतृत्वाची ओळख, तीन पॅनेल चर्चा आणि सांगता समारंभ अशा पाच भागांत संपन्न झाली. रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्रालयाचे राज्यमंत्री भागीरथ चौधरी, पर्यावरण आणि शाश्वतता विकासासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यदल, कार्यकारी समितीचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्याची मला संधी मिळाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जो मुद्दा प्रकर्षाने मांडला, तो मला भावला. ते म्हणाले की, ”ग्रीन हायड्रोजन हे भारताचे भविष्य आहे आणि ते खर्या अर्थाने भारताला जागतिक नेता आणि एक सुपर इकोनॉमी बनवेल.” त्यांनी पाशा पटेल यांना ‘बांबू मॅन’ अशी उपाधी देऊन त्यांच्या 50 वर्षांच्या शेती आणि शेतकरी या क्षेत्रातील कार्याचा केलेला गौरव पाहून माझे मन भारावले. पाशा पटेल यांनी यावेळी हवामानबदलाचे संकट यावर भाष्य करताना सांगितले की, ”पृथ्वी वाचवण्यासाठी बांबू लागवडीशिवाय पर्याय नाही. जग सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने बांबू लागवड केली पाहिजे.” माझ्या स्थानिक विभागाचा विचार डोक्यात ठेऊन पाशा पटेल मांडत असलेले महत्त्वाचे मुद्दे मी लिहून घेत होतो.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या भाषणात बांबू मोहीम ही फक्त लागवडीपर्यंत मर्यादित नसून ती धोरण, भागीदारी आणि मानसिकतेतील बदलाबद्दल आहे. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही परिषद सायंकाळी 6 वाजता संपली. या कालावधीत दिग्गज वक्त्यांना ऐकताना वेळ कसा गेला, हे समजलेच नाही. आपल्या आवडत्या विषयात आपण कसे रमतो, याची प्रचिती या निमित्ताने मला आली. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्यात बांबू लागवड आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याबद्दल शंका नाही.
- नरेंद्र पवार
(लेखक कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा पर्यावरणस्नेही आहेत.)