...आणि काशीत प्रकटले विश्वनाथ!

सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याने हिंदू पक्षाचा दावा मजबूत

    17-May-2022
Total Views | 179
 
 
 
 
 
kashi
 
 
 
 
नवी दिल्ली : काशीमध्ये शेकडो वर्षांपासून नंदी ज्यांची वाट पाहत होते, ते काशिविश्वनाथ अखेर पुन्हा प्रकटले आहेत. ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाच्या अखेरच्या दिवशी सोमवारी तेथे शिवलिंग सापडल्याचे हिंदू पक्षातर्फे सांगण्यात आले. तेथे शिवलिंग सापडल्याने त्या परिसरास संरक्षण देण्याची हिंदू पक्षाची मागणी वाराणसी दिवाणी न्यायालयाने मान्य केली असून तेथे मुस्लिमांना वजू करण्यापासूनही बंदी घालण्यात आली आहे.
 
 
 
वाराणसी येथील ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाने दिले होते. सर्वेक्षणाच्याअखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारी सर्वेक्षणादरम्यान ज्ञानवापी मशीद संकुलामध्ये शिवलिंग सापडल्याचा स्पष्ट दावा हिंदू पक्षातर्फे करण्यात आला आहे. सर्वेक्षणात पुढे आलेल्या या अतिशय महत्त्वाच्या पुराव्यामुळे हिंदू पक्षाचा दावा अधिक मजबूत झाला आहे. यानंतर आता ’कोर्ट कमिशनर’तर्फे मंगळवारी सर्वेक्षण व अहवाल वाराणसी दिवाणी न्यायालयासमोर सादर केला जाईल. त्यानंतर न्यायालय त्यावर पुढील आदेश देणार आहे.
 
 
 
दरम्यान, दिवाणी न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशास मुस्लीम पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावरही मंगळवारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
 
 
 
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
 
 
हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन यांच्यावतीने अर्ज सादर करण्यात येऊन त्यामध्ये दि. १६ मे रोजी मशीद संकुलात शिवलिंग सापडल्याचे सांगण्यात आले. या खटल्यातील हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांना तो ‘सील’ करण्याचे आदेश द्यावेत. याशिवाय या विशिष्ट ठिकाणी मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालावी. केवळ २० मुस्लिमांना मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी आणि वजू करण्यापासून त्यांना ताबडतोब थांबवावे, असेही अर्जात नमूद करण्यात आले होते.
 
 
 
हिंदू पक्षातर्फे करण्यात आलेल्या अर्जावर न्यायालयाचे पीठासीन अधिकारी रवी दिवाकर यांनी अतिशय महत्त्वाचा आदेश दिला. ते म्हणाले की, न्यायालयाने संपूर्ण पत्रावलीचा अभ्यास केला आहे. संकुलात सापडलेले शिवलिंग जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या स्थानावर शिवलिंग सापडले, ते स्थान तत्काळ सील करण्यात यावे आणि तेथे कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे ‘सील’ केलेल्या स्थानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि ‘सीआरपीएफ’ यांच्याकडे असून त्याचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
 
 
 
शिवलिंग सापडल्याने मंदिर असल्याचे सिद्ध : विहिंप
 
 
 
काशीतील ज्ञानवापी मशीद संकुलात सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याने तिथे मंदिरच होते, हे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि वरिष्ठ अधिवक्त आलोक कुमार यांनी दिली आहे. यासंबंधीचे पत्रक विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी जारी केले आहे. त्यात आलोक कुमार म्हणाले की, “ज्ञानवापी संकुलात शिवलिंग सापडणे आनंदाची गोष्ट असून यामुळे तिथे मंदिर आहे व १९४७ मध्येही मंदिरच होते, हे सिद्ध झाले आहे. तसेच ज्ञानवापी मशीद संकुलाच्या सर्वेक्षणादरम्यानमिळालेले पुरावे समस्त देशवासीय स्वीकारतील आणि त्याचा आदर करतील,” अशी आशाही आलोक कुमार यांनी व्यक्त केली. “शिवलिंग सापडल्यानंतर होणार्‍या भावी परिणामांकडे वाटचाल सुरू होईल,” असे सांगतानाच. “हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयीन निर्णयानंतर विश्व हिंदू परिषद याबाबत विचार करेल, पुढे कोणते पाऊल उचलायचे हे ठरवेल,” असे आलोक कुमार म्हणाले. आम्ही श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्मितीसाठी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू, असे म्हटले होते. आता बदललेल्या परिस्थितीत वाराणसीतील प्रकरणही येत्या दि. ११ आणि १२ जून रोजी होणार्‍या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत संतांसमोर मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
विश्वनाथ मुक्तीसाठी महिलाशक्तीची याचिका
 
 
ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण पाच हिंदू महिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील आदेशानुसार करण्यात आले. वाराणसी न्यायालयात याचिका दाखल करणार्‍या या पाच महिलांमध्ये लक्ष्मी देवी, राखी सिंह, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांचा समावेश आहे. जाणून घेऊया या महिलांबद्दल...
 
 
 
१. राखी सिंह: दिल्लीच्या हौज खासमध्ये राहणार्‍या राखी सिंह यांनी ज्ञानवापी प्रकरणात पुढाकार घेतला आहे. या प्रकरणाला ‘राखी सिंह आणि अन्य विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार’ असे नाव देण्यात आले आहे.
 
 
२. लक्ष्मी देवी: ज्ञानवापी प्रकरणात लक्ष्मी देवी दुसर्‍या याचिकाकर्त्या आहेत. लक्ष्मी देवी वाराणसीच्या महमूरगंजमध्ये राहतात. त्यांचे पती डॉ. सोहनलाल आर्य यांनीही 1996नध्ये ज्ञानवापीबाबत न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यानंतर ज्ञानवापीचे निरीक्षण झाले, पण सर्वेक्षण झाले नाही.
 
 
३. सीता साहू: वाराणसीच्या चेतगंजमध्ये राहणार्‍या सीता साहू या प्रकरणात तिसर्‍या याचिकाकर्त्या आहेत. सीता समाजसेविका आहेत. मी कित्येकदा शृंगार गौरीच्या पूजनासाठी आले, पण शृंगार गौरीचे मंदिर मशिदीच्या आत आहे. मात्र, आम्हाला आत जाण्याची परवानगी नाही. केवळ बाहेरुन नमस्कार करावा लागतो. आमच्या आराध्यदेवीचे मंदिर मशिदीच्या आत आहे. मंदिराला आता कब्जामुक्त करायचे आहे, असे सीता साहू म्हणतात.
 
 
४. मंजू व्यास: ज्ञानवापी प्रकरणात वाराणसीतील मंजू व्यास चौथ्या याचिकाकर्त्या आहेत. मंजू व्यासदेखील समाजसेविका आहेत. दररोज शृंगार गौरीच्या दर्शनाची परवानगी मिळायला हवी. सध्या आम्ही फक्त चौकटीचे दर्शन करून परत जातो, असे त्या म्हणतात.
 
 
५. रेखा पाठक: पाचव्या याचिकाकर्त्या रेखा पाठकदेखील वाराणसीतील आहेत. ज्ञानवापी आमच्या सर्वांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. त्यावर इतरांनी कब्जा केला आहे. त्यांचा कब्जा हटवेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे रेखा पाठक म्हणतात.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121