नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): ‘राष्ट्रीय पंचायती राज दिना’निमित्त दि. 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीर येथे जाण्याची शक्यता आहे. यावेळी ते सांबा येथे काश्मिरी पंडितांसोबतही संवाद साधू शकतात, अशी माहिती जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेश संघटनमंत्री अशोक कौल यांनी दिली.
24 एप्रिल रोजी पंतप्रधानांचा जम्मू-काश्मीर दौरा होणार असल्याचे समजते. जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेश संघटनमंत्री अशोक कौल त्याविषयी म्हणाले की, “देशात 24 एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय पंचायती राज दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ‘पंचायती राज दिना’चा कार्यक्रम साजरा केला जाणार असल्याचे समजते. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच पंचायत निवडणुका झाल्या असून तब्बल 30 हजारांहून अधिक पंचायत सदस्य कार्यरत झाले आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्य जनतेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ‘पंचायती राज दिना’च्या कार्यक्रमात प्रदेशातील पंचायत सदस्यांना पंतप्रधान संबोधित करणार,” असेही कौल यांनी नमूद केले.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम 370’ आणि ‘35 (अ)’ 2019 साली संपुष्टात आणण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी यांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली आहे. मात्र, ‘कलम 370’ संपुष्टात आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरमध्ये आलेले नाहीत. काश्मिरी पंडितांचीही भेट शक्य
“ ‘पंचायती राज दिना’च्या कार्यक्रमासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मिरी पंडितांसोबतही संवाद साधू शकतात,” असे कौल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान काश्मिरी पंडितांसोबत चर्चा करणार की कसे, याविषयी अद्याप अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, पंतप्रधानांशी संवाद साधण्याची येथील काश्मिरी पंडितांची इच्छा आहे आणि प्रदेश भाजपदेखील त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे,” असे अशोक कौल म्हणाले