मुंबई : सध्या संपूर्ण राज्यामध्ये भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असतानाच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले.
"पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. तसेच मातोश्री आमच्या हृदयात आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्या मनात आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी चालिसा न वाचणे हे या सरकारचे पाप आहे. आमची मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी ही कायम राहणार आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत," असे राणांनी सांगितले.
"मला आणि नवनीत राणांना विरोध करणे हे योग्य नाही. आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आले. आमच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं. पश्चिम बंगालसारखी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील. मुख्यमंत्र्यांचा अहंकार त्यांच्या डोक्यात गेल्यामुळे हे घडत आहे," अशा शब्दात रवी राणांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.