मुंबई: मोठा गाजावाजा करत सुरुवात केलेली वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांच्या अभावी रिकामीच असल्याचे समोर आले आहे. उदघाटन होऊन दहा दिवस होऊनसुद्धा स्पीडबोटीच्या केवळ दहाच फेऱ्या झाल्या आहेत. दहा दिवसांपूर्वीच या वॉटर टॅक्सी सेवेचे मोठया समारंभपूर्वक उदघाटन करण्यात आले होते.बेलापूर ते भाऊचा धक्का या मार्गावर ही वॉटर टॅक्सीसेवा आहे. या वॉटर टॅक्सीचे दर खिशाला परवडणारे नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेकडे पाठच फिरवली आहे. या अत्यल्प प्रतिसादाबद्दल महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाची २ मार्चला बैठक घेण्यात येणार आहे.
बेलापूर ते भाऊचा धक्का या अर्ध्यातासाच्या प्रवासासाठी प्रती प्रवासी तब्बल ८०० ते १२०० रुपये इतका तिकिटाचा दर आहे. तर मासिक पास १२ हजार रुपयांचा आहे. भाजपने सुरुवातीपासूनच या अवास्तव भाडे आकारणीला विरोधच केला होता. " ज्या नवी मुंबईतील रहिवाश्यांसाठी ही वॉटर टॅक्सी सुरु केली आहे त्या नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय राहतात त्यांना परवडेल अशा दरांत ही सेवा उपलब्ध करून द्यावी" अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली होती. सर्वसामान्यांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळत असल्याने या सेवेचे नेमके होणार? हा प्रश्नच आहे.