
मुंबई : मुंबईतील चाळींमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पालिकेने कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. या मागणीला आता पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या वसत्या-वसत्यांमध्ये कंपोस्ट खत प्रकल्प उभारले जातील असा अभिप्राय दिला आहे. मात्र यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे.
२ ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिकेने सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले होते. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठया गृहनिर्माण सोसायटया आणि १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रकल्पाला ५ वर्षे उलटून गेले तरीही या नियमांची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आलेली नसल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबईतील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जलसंधारण सारख्या योजना प्रभावी पणे आमलात आणण्याची गरज आहे. यासाठी पालिकेने स्वावलंबी होणे गरजेचे आहे.