मुंबई: शिवाजी पार्कमधील रस्त्यात पर्यावरणास हानिकारक घटक वापरण्याच्या विरोधात मनसेने बुधवारी आंदोलन करून सुद्धा पालिकेने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. शिवाजी पार्क मैदानातील मीनाताई ठाकरे स्मारकापासून ते उद्यान गणेश मंदिरापर्यंत हा रस्ता बांधला जातोय. बुधवारी या रस्त्याच्या बांधकामांविरोधात मनसेने जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात या रस्त्याचे कामकाज पूर्ण करण्यात आले.
शिवाजी पार्कातील रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी नेमलेल्या सल्लागाराने या रास्ता बांधकामात खडीचा, वाळूचा वापर करण्यास विरोध केला होता. हा विरोध डावलून पालिकेने हे काम पूर्ण केलेच आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बांधकामाविरोधात मैदानात उपोषण सुरु केले होते. "मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी महापौर किशोरी फोनवरून चर्चा केली होती आणि चर्चेतून या प्रकरणी मार्ग काढण्याचे ठरवले होते पण महापौर संध्याकाळपर्यंत आल्याच नाहीत." असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. या रस्त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा विचार सुरु आहे असे मनसे कडून सांगण्यात आले.